सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

वेचलेल्या विचार कणिका - भाग ९

 वेचलेल्या विचार कणिका - भाग ९

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


कोणाला कसे रोखावे?

थोर ऐरावत - त्याला अंकुशाने रोखता येते. 

भयंकर व्याघ्र - त्याला सापळ्यात अडकवता येते. 

सर्पाचे विष - मंत्रशक्तीने उतरवता येते. 

तीव्र जठराग्नीला अन्नपाण्याने शांत करता येते. 

प्रपंचातील महादु:खे विठ्ठलभक्ती करून त्याच्या कृपेने नष्ट करता येतात. 

जीवनातील ठरवलेले ध्येय परिश्रमातून साध्य करता येते. 

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ हे लक्षात ठेवून कार्य करीत राहू या!

---------------------------------------

 

अनेक क्रांतिकारकांनी फासावर जातांना हातात गीता घेतली होती, असे वर्णन आहे. असे का? 

कारण " स्वधर्मे निधनं श्रेय: " हा गीतेने दिलेला संदेश त्यांनी अनुसरलेला होता व सर्वांनी तो आचरणात आणावा असे 

त्यांना वाटत होते. 

स्वधर्म - येथे धर्मचा अर्थ तुम्ही आम्ही समजतो तसा हिंदू धर्म, मुस्लीम धर्म असा नसून कर्तव्य असा आहे. प्रत्येक व्यक्तीला तिच्या वेगवेगळ्या भूमिकेनुसार वेगवेगळी कर्तव्ये असतात. उदाहरणार्थ, एक स्त्री कन्या, भगिनी, सून, पत्नी, माता, गृहिणी, समाजघटक वगैरे भूमिका एकाच वेळी वठवत असते. या सर्व भूमिकांना योग्य न्याय द्यावा लागतो. अशा वेळी कधीकधी दोन भूमिकांमध्ये विरोधही निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी श्रेष्ठ कर्तव्य कोणते ते लक्षात घेऊन ते कठोरपणे पाळावे असेच गीता " स्वधर्मे निधनं श्रेय: " या वचनाने सांगते. 

-----------------------------------------------------

षोडश संस्कार 

गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन, जातकर्म, मेधाजनन, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, जावळ, कान टोचणे, उपनयन, वेदव्रत समावर्तन, विवाह,अग्न्याधान( अग्निहोत्र ), औपासन, श्रौताधान, अंत्येष्टी. 

चार

चार पुरूषार्थ, चार वर्ण, चार आश्रम, चार ऋणे, चार दिशा.

--------------------------------------------------------- 

 

जुनी नावे

अफगाणिस्तान - गांधार

कास्पियन सी - कश्यप समुद्र

काशघर - शैलेंद्र देश

सयाम - श्याम

व्हिएतनाम - चंपा

कंबोडिया - कंबुज

काम्पुचिया - कौंडिण्य

बर्मा - ब्रम्हदेश

रशिया - त्रूक्ष

ताश्कंद - तक्षखंड 

पेशावर - पुष्पकलावर्त

संस्कृत भाषा - थायलंड, लाओस, बाली, मलाया, सैबेरिया, द.अमेरिका, ऊत्तर अमेरिका या देशांमध्ये प्रामुख्याने बोलली जात असे. 

-----------------------------------------------


गायत्री मंत्र

गय_ महाप्राण, त्रै_ रक्षण

साधकांचे व उपासकांचे, तामस अज्ञानापासून शाश्वतपणे रक्षणकर्ता असा हा मंत्र. 

छंदामध्येही श्रेष्ठ आहे. गीतेत ‘छंदसाम् अहं गायत्री’ असे म्हटले आहे. 

ब्रम्हदेवाला स्फुरण होऊन दोन शक्ति प्रकट झाल्या. संकल्पशक्ती व परमाणूशक्ती. त्यातून आद्यशक्ती गायत्री प्रकट झाली. 

गायत्रीचे चरण तीन आहेत. ती त्रिपदा आहे. 

प्रात:कालीन श्रीगायत्री, माध्यान्ही मार्तंड सावित्री, संध्याकाळी सरस्वती. 

सकाळी तिचे वाहन आहे हंस, माध्यान्ही वृषभ, संध्याकाळी गरूड. 

गायत्री समान दुसरा मंत्र नाही. 

उपनिषदे वेदांचे सार आहेत तर गायत्री उपनिषदांचे सार आहे. 

सर्व चराचर ब्रम्हांड गायत्री रूपाने साकार झाले आहे. 

-------------------------------------------


ब्राम्हण

जो ब्रम्ह जाणतो ब्राम्हण

दशलक्षणे

शम - मनावर विजय

दम - बाह्येंद्रियांवर ताबा

तप - आत्मरूपी मग्नता

शुद्धाचार - शुचिर्भूत वर्तन

शुचिता - शुद्ध व्यापार 

धृती - सर्व प्रसंगात धैर्य बाळगणे

शांती - विकारशून्यता

ऋजुत्व - भूतदया

ईशता - सर्वांवर प्रेम

-------------------------------------


सहस्त्रार्जुनाला १००० हात होते. त्यांचा उपयोग तो फक्त युद्धाचे वेळी करत असे. एरव्ही ते हलके असत‌, असे वर्णन आहे. 

याचा अर्थ त्याला सहस्त्र मित्र होते. समरप्रसंगी ते मदतीला बोलावले जात. 

हलके असत याचा अर्थ सहस्त्रार्जूनापेक्षा ते कमी बलवान असल्यामुळे ते त्याची जागा घेण्याची शक्यता नव्हती. म्हणजेच ती संघटना व्यक्तिनिष्ठ होती. 

परशुरामाने क्षात्र संघटना निर्माण केली. त्या संघटनेद्वारा सहस्त्रार्जुनाचा पराभव केला. ती भूमी कश्यपांना दान दिली व स्वत: अपरान्त भूमीत जाऊन राहिले. 

जुलुमाला जशास तसे उत्तर, हातात सत्ता आली असतानाही तिचा मोह न धरता समाजशिक्षणासाठी तत्पर अशा ऋषींकडे ती सोपवण्याची निरिच्छ वृत्ती, पुन्हा नवीन क्षेत्र ऊभवण्याचे कार्य या सर्व गोष्टींमुळे आपल्या मनात एक आदर्श निर्माण झाला आहे. 

अशा क्षात्रतेजधारक व मुनीविचारांनी युक्त अशा परशुरामांना वंदन!

---------------------------------------------------


तुळशी

काही नावे

ग्राम्या - गावात सर्वत्र येणारी

सुलभा - सर्वांना सहज उपलब्ध होणारी

भूतघ्नी - रोगजंतूंचा नाश करणारी

बहुपत्री - भरपूर पाने असणारी

सुगंधा - सुगंध पसरणारी 

वृंदा - एकत्र फुले येणारी

सुमंजिरी - जिला मंजिरी येते अशी. ( या मंजिरीतच असंख्य बारीक फुले असतात.)

विष्णुवल्लभा - विष्णुपत्नी

पूतपत्री - शरीर पवित्र करणारी, पाने असलेली. शरीरावर उन्हाळ्यात येणारे घामोळे, बारीक पुरळ, गोवर यावर पाने चोळतात. त्याने आग कमी होते व पुरळ नाहीसे होते. 

शतघ्नी - वेदनाशामक

सरला - कोणतेही संस्कार न करता खाता येते

पूतिगंधहा - दुर्गंधीचा नाश करणारी

सुरेज्या - देवांनी पूजलेली

अमृता - क्षीरसागरमंथनातून निघालेल्या अमृताचे काही थेंब पृथ्वीवर सांडले त्यातून निर्माण झालेली. 

तुलसी हे संस्कृतीचे अचररूप आहे. 

तुलसी तिच्यातील गुणधर्मामुळे चरचराचे रक्षण करते. म्हणून प्पृथ्वीचा रक्षणकर्ता जो विष्णू याच्याशी तिचा आत्मीयतेचा संबंध आहे. विष्णूला तुलसीपत्र प्रिय आहे. 

लक्ष्मी व तुलसी दोघीही अमृत मंथनातून निघाल्या, म्हणून त्यांना बहिणी मानले जाते. 

------------------------------------------------


तुलसीकवचम्, श्रीतुलसी स्तोत्रम्, ही संस्कृत स्तोत्रे आहेत. तुलसीऊपनिषदही आहे. 

ज्ञानेश्वर म्हणतात,

‘प्रतिपाळू तरी पाटाचा

झाडी कीजे तुलसीचा

परी फला फुला छायेचा

आश्रयो नाही’

तुलसीपासून‌ फळे फुले मिळत नाहीत तरीही तिचा प्रतिपाळ करावा. निरपेक्ष कर्माचा संदेश मिळतो. पण तुलसी हवा शुद्ध करण्याचे काम करत असते. 

संत नामदेव लिहतात,

‘तुलसीवृंदावन ज्याचे घरी

त्यासी प्रसन्न श्रीहरी’. 

संत एकनाथांनी वर्णन केले आहे,

‘तुळसीचे पान त्रैलोक्यासमान’

तुकाराम महाराज म्हणतात,

‘कंठी मिरवा तुलसी

व्रत करा एकादशी’ 

भारतीय युवतीही म्हणते

‘पहिली माझी ओवी, रामाला गाईली

विष्णुपदावर लक्ष तुळस वाहिली’

तुळशीला वंदन करून तिने दिलेल्या प्राण वायुने निरोगी राहू या!

--------------------


जालंदर दैत्याची पत्नी वृंदा! तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे देव त्याचा पराभव करू शकत नव्हते. 

विष्णुने जालंदराचे रूप धारण करून तिचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. हे लक्षात आल्यावर वृंदेने चिताप्रवेश केला. विष्णु तिच्यावरील प्रेमामुळे चितेशेजारीच बसून राहिला. तेव्हा देव पार्वती, लक्ष्मी, सरस्वती यांना शरण गेले. पार्वतीने तुलसी, लक्ष्मीने मालती व सरस्वतीने आवळी अशी तीन बीजे दिली व ती वृंदेच्या चितेवर पेरण्यास सांगितले. बीजे उगवली. विष्णुला तुलसी आवडली. 

पार्वतीने म्हणजे गौरीने दिलेल्या बीजापासून उत्पन्न झाल्यामुळे तुलसीलाही गौरी नाव मिळाले. 

 वृंदेच्या चितेतून उत्पन्न झाल्यामुळे तुलसीस्थानालाही वृंदावन नाव मिळाले. 

 आजपासून तुलसीविवाहाला प्रारंभ झाला. पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह होत असतात. मग चातुर्मास संपतो. 

याच अनुषंगाने आपण ही माहिती घेतली. 

(संवाद मध्ये प्रा. नीला कोर्डे यांच्या लेखावरून)

-----------------------------------------------

1 टिप्पणी: