वेचलेल्या विचार कणिका - भाग 16
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
--------------
काही विशेष गोष्टी
ईच्छा कराल ते देणारा कल्पवृक्ष, सुगंध देणारा चंदन, हे प्रसिद्ध आहेत, पण मी अश्वत्थ आहे.
प्राणी
घोड्यांमध्ये श्रेष्ठ ऊच्चैश्रवा, राजांना भूषणावह असणार्या हत्तीतील ऐरावत आहे.
धेनूंमध्ये कामधेनू, सर्पात वासुकी, नागात अनंत मी आहे. चतुष्पादात सिंह, पक्ष्यांमध्ये गरूड, जलचरात मकर आहे.
यात भेद नाही.
वायूला डावे उजवे नाही. सूर्याला पाठपोट नाही. या गोष्टी जाणून घ्याव्या असे ठरवले तर आपली दृष्टी चक्रावेल!
--------------------------
सहलीसाठी काल निघालो आज ऊटीला पोचलो आहोत. खूप विस्तीर्ण अशा गुलाबबागेत फिरत आहोत. वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या आकारांची, काही एकेकटी, काही समूहाने राहणारी, काही एकेरी, काही भरगच्च अशी फुले पाहून डोळे तर चालून व ऊभे राहून पाय दुखायला लागले आहेत. मनालाही जराशी विश्रांती हवीशी वाटते आहे म्हणून एका बाकावर जरा टेकलो. समोर एका फलकावर काही लिहिलेले दिसले. भोवती लोकांची गर्दी होती. ऊत्सुकता बसू देईना. ऊठलो परत! अन् वाचायला सुरुवात केली.
गुलाब काय दर्शवतो?
गूलाबाच्या पाकळ्या आशा दाखवतात. कळ्या तारूण्य व सौंदर्य दर्शवितात. तर कळ्यांचे गुच्छ प्रेमाची कबुली देतात.
उजव्या बाजूला झुकलेले फूल ' मी तुझ्यावर प्रेम करतो ' असे सांगते तर डाव्या बाजूला झुकलेले' तुमचे माझ्यावरचे प्रम दर्शवते. पूर्ण फुललेले सांगते' मी तुझ्यावर अजूनही प्रेम करत आहे तर पूर्ण फुललेल्या फुलांचा गुच्छ कृतज्ञता दर्शवतो.
-------------------------------------
सहल संपली. परततांना विचारांना फुटले फाटे.
फूल पाहतांना लक्षातच आले नाहीत गुलाबाचे काटे!
झाडे वाढत गेली वरवर
मुळे जमिनीत गेली खोलवर!
जाईजुई चा आधी येतो सुगंध! मग लक्षात येते सौंदर्य!
गुलाबाचे मात्र आधी सौंदर्य, मग सुगंध!
हळूहळू गळू लागलेल्या पाकळ्यांचा करावा गुलकंद!
उन्हाळ्यात ऊष्णता कमी करून देईल आनंद!
गुलाबांची बाग छान छान!
मनात स्फुरते गान व वाटते छेडावी एक सुंदर तान!
-------------------------------------------------------
आज सुभाषचंद्र बोस यांची जयंती ! अभिवादन करू या! मिशनरी शाळेत शिक्षण चालू असता गोरे काळे अश्या केल्या जाणार्या भेदाने मन दुखावले गेले होते. तशातच एका गोऱ्या शिक्षिकेने उर्मटपणे केलेल्या अपमानाने बरेच विद्यार्थी दुखावले गेले. हरताळ घालायचा असे ठरले. या हरताळाचे नेतृत्व सुभाष यांनी केले व नेताजी ही पदवी मिळवली.
आयसीएस साठी इंग्लंडला गेले होते. ब्रिटीशांनी क्रूरपणाने जालियनबागेत जमलेल्या लोकांवर गोळ्यांचा वर्षाव केला. लाखो लोक रणगाड्यांखाली चिरडले गेले अन् पदवीधर झाल्यावर मिळालेल्या इंग्लंडमधील नोकरीचा राजीनामा देऊन सुभाष भारतात परतले. (१९२१)
लहानपणी रामकृष्ण व विवेकानंद याचा मनावर प्रभाव पडला होताच! आता महात्माजी व पंडित नेहरू यांनी सुरू केलेल्या काँग्रेसच्या कामात सहभागी झाले. सरचिटणीस झाले.
१९३० मधील कायदेभंग चळवळीत अटक
१९३१ - सुटका
१९३२ सशस्रक्रांती चळवळ
-----------------------------
विस्मृतीत गेलेला वीर असे ज्याचे वर्णन काल दूरदर्शनवर केले गेले, त्या सुभाषचंद्राना १९४० मध्ये स्थानबद्धतेची शिक्षा झाली. त्यांनी अन्नत्यागाची धमकी दिली तेव्हा त्याना राहत्या घरी नजरकैदेत ठेवले गेले. सरकार आता नाईलाजाने थोडे मवाळ झाले होते.
२६ जानेवारी ( लक्षात घ्या या तारखेचे महत्व) १९४१ - एक अत्यंत धीरोदात्त घटना! नजर चुकवून ते गुपचुपपणे पेशावरला पोचले. तेथून काबूल व मग जर्मनीत पोचले.
आझाद हिंद सेना व सरकार
ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकाना एक होण्याचे आवाहन केले गेले. सेना तयार झाली.
२१-१०-१९४३ - जर्मनीतून जपान - टोकियो, तेथून सिंगापूर व आझाद हिंद सरकारची स्थापना झाली. या सरकारला ११ राष्ट्रांनी मान्यता दिली होती.
सुभाषबाबूंची मुत्सद्देगिरी, चातुर्य, आपले विचार सर्वांना पटवून देण्याची क्षमता ( सु+ भाष हे नाव सार्थ ठरले) यामुळेच हे शक्य झाले होते.
--------------------
गुलाबाच्या फुलाबरोबर असतो एक तरी काटा!
फुलाच्या रक्षणात, त्याचा असतो सिंहांचा वाटा!
शब्दगंध, सिंगापूर
थोर व्यक्तींची जीवने, त्यांचे कार्य,आपले मानसिक धैर्य ऊंचावते.
जगण्यासाठी आवश्यक असतो समोर एक आदर्श. जेव्हा संधी आपले दार ठोठावते, तेंव्हा एकतर आपण ' बाहेर गेलेले असतो नाहीतर ' आत' झोपलेले असतो.
प्रेम देणे म्हणजे खरे स्वातंत्र्य तर प्रेमाची अपेक्षा करणे ही शुद्ध गुलामगिरी!
- स्वामी चिन्मयानंद
------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा