मंगळवार, २४ जून, २०१४

भीमरूपी महारुद्रा …

समर्थ रामदासांनी मारुती स्तोत्राची रचना केली आहे. पहिल्या श्लोकातील प्रत्येक शब्द अतिशय सूचक वापरला आहे. 'भीमरूपी' म्हटले की समुद्रोल्लन्घनावेळी मारुतीने धारण केलेला प्रचंड आकार लक्षात येतो. रामायणकाली विमान होते, पण राम वा राममित्र सुग्रीवाकडे ते नव्हते. लंकेच्या मार्गाने, सीतेला नेले आहे ही निश्चित माहिती मिळाली होती. आता तिला लंकेतच ठेवले आहे का, हे शोधायचे होते. ' शंभर योजने' सागर उल्लंघून जायचे होते. मध्येच दम संपला तर सर्वच संपणार होते. एवढेच नव्हे तर समुद्र ओलांडल्यानंतरही शत्रूराज्यात येणाऱ्या संकटांना तोंड द्यायचे होते. अशा वेळी मनाची व शरीराचीही तितकीच तयारी असणे आवश्यक होते. एकदा हे करावयाचे असे ठरले की मानसिक तयारी होते पण शारीरिक तयारी कशी काय इतक्या लवकर केली असेल? असा प्रश्न उभा राहतो.

रामसैन्यात उड्डाण करू शकणाऱ्या वानरांचे एक पथक होते. त्यांचा प्रमुख ऋषभ असून मारुती हा त्यापैकी एक होता. आपल्याला आठवेल की आधी ऋष्यमूक पर्वतावरील वानरांत चर्चा झाली होती, कोण किती लांब जाऊ शकेल त्याची. मारुतीला मात्र त्याच्या शक्तीची आठवण करून द्यायला लागली व मगच तो उड्डाणाला सिद्ध झाला. या उड्डाण पथकातल्या वानरांजवळ उडता यावे अशी काही सामग्री असावी. त्यांचा उपयोग व शरीरसामर्थ्य यांच्या बळावर मारुती एवढे अंतर आकाशमार्गे पार करू शकणार होता. स्वाभाविकच ही सामग्री शरीरावर चढवली की शरीराचा आकार मोठा दिसत असणार. पाणबुडे नाही का, पाणबुड्यांचा वेश चढवल्यावर लठ्ठ दिसतात.

महारुद्रा' -राम - रावण युध्दात एकदा मारुती व रावण एकमेकांस भिडले. बुद्धिमतां वरिष्ठं' मारुतीने रावणाला आठवण दिली, 'वानरांपासून तुला मृत्युभय आहे. तुझा पुत्र अक्ष मीच मारला'. शत्रूचे मानसिक धैर्य खच्ची करण्याचा हा प्रयोग. चिडून रावणाने प्रहार केला अन मारुतीने ठोशास ठोसा दिला, तो इतका जोराचा की महाबलाढ्य रावण कोलमडून पडला.

'वज्रहनुमान' - पुढे सविस्तर वर्णन आहे 'आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा '- आरक्त फळ समजून जन्मताच सूर्याला खाण्यासाठी मारुती धावला. सूर्य अस्त झाला तर पृथ्वीवरील जीवनच संपणार. सर्व सजीव संपणार. म्हणून इंद्राने वज्राचा प्रहार केला तो मारुतीच्या हनुवटीवर, म्हणून तो वज्रहनुमान. इंद्राने वायुसुतावर केलेल्या प्रहाराने वायु रुसला व दरीत जाऊन बसला. पुन्हा प्रश्न आला. वायुशिवाय जीवन अशक्य. मग इंद्राने वर दिला की वज्राने हनुमानाला मृत्यू येणार नाही.

मारुती -मरुत =वायु. त्याचा पुत्र मारुती, वायुसारखाच वेगवान. लंकेपासून हिमालयात औषधी वनस्पती आणायला जायचे. स्वाभाविकच कोटीच्या कोटी उड्डाणे करावी लागली. 'झेपावे उत्तरेकडे। मंद्राद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे।' ज्या वनस्पती आणायच्या त्या रात्री चमकणार, दिवसा कशा सापडतील? थांबायला तर वेळ नव्हता, मग पर्वतच उपटून उड्डाण केले. वेग किती?
'आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती ।
मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे।' म्हणूनच प्रभंजना.
 
मनाचा वेग कधी मोजता आलाय का? आता हे चमकणाऱ्या वनस्पतीचे वर्णन वाचता वाचता मन दक्षिण अमेरिकेतील पेरूमधील विलक्षण चमकणारा व रामायणात ज्याचे वर्णन सापडते तो 'त्रिशूल' बघायला धावले नसेलच असे सांगता येणार नाही.

वरारि - पोचलो न आपण लंकेतील वनात. सीतेची भेट झाली, पण रावण दरबाराची माहिती मिळवायची राहिली अन आपल्याला ज्याच्याशी युध्द करायचे आहे त्याच्या मनात थोडी भीती, थोडीशी आशंका निर्माण करता आली तर अधिकस्य अधिक फलं! मग झाली योजनापूर्वक अशोकवनाच्या विध्वंसाला सुरुवात.

अंजनीसुता -वीरमाता अंजनीचा हा पुत्र. वीरकन्या, वीरभगिनी, वीरपत्नी बनणे हे तसे सोपे पण वीरमाता हे पद महत्प्रयासाने प्राप्त करावे लागते. रावणविजय प्राप्त करून राम परत निघाले आहेत. वाटेत अंजनीमातेची भेट घेण्यासाठी थांबले आहेत. प्रत्यक्ष भेटीत राम उद्गारत आहेत,"हनुमंताच्या मदतीमुळेच मला हा विजय मिळालाय." पुत्राच्या कौतुकाने निथळण्याऐवजी अंजनी संतापली आहे. ती म्हणते आहे, "हनुमान प्रत्यक्ष असताना तुम्हाला एवढे कष्ट पडण्याची आवश्यकता नव्हती. माझे दुध जो प्यायला आहे त्याला अशक्य काहीच नाही."

अशी शिकवण, असे संस्कार ज्याला दुधाच्या घोटाबरोबर मिळाले आहेत तो हा अंजनीसुत स्वाभाविकच.
"ब्रम्हांडाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके।
तयासी तुलना कैसी ब्रम्हांडी पाहता नसे।"
रामदूता- हे तर हनुमंताचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य. रामरक्षेत एका श्लोकात वर्णन आहे. 
"मनोजवं मारुत तुल्यवेगं
जितेन्द्रियं बुध्दिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयुथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।"

यातील एकेक विशेषण लक्षात घेतले तरी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र सत्ता स्थापन करणे हनुमंताला सहज शक्य होते. पण रामकार्यात एक सेवक म्हणून सहभागी व्हायचे त्याने मान्य केले. शक्ती होती,बुध्दी होती, चपळाई (वेग) होती, इंद्रिये जिंकलेली होती, वायुसारखा समर्थ पिता होता, हाताशी वानर समूह होता; पण त्याचसोबत लीनताही होती. स्वत:चे स्वतंत्र साम्राज्य स्थापन न करता, चाललेल्या लोककल्याण कार्यात म्हणूनच तो सहभागी झाला.

या स्तोत्राचा जनकही तसाच 'रामदास' बनला. समर्थ रामदास म्हणजे समर्थ असूनही दास व दास असूनही समर्थ! अशा या रामदुताचे स्मरण सगळ्यांना सामर्थ्य प्रदान करणारे -सकळा उठवी बळे -सौख्यकारी, दु:खहारी न बनले तरच नवल!!!