दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 13
श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
राष्ट्र सेविका समितीमुळे मिळालेल्या अनेक संधी
ठाण्याला वर्ग होता. बहुदा प्रवेश असावा. त्यावेळी वर्ग महिन्याचा असे. तेव्हा मी शिक्षार्थी होते. वर्ष आठवत नाही. पण सिंधी निर्वासितांच्या छावण्या मुंबईत झाल्या होत्या. त्यातील वीस-बावीस जणी वर्गाला आल्या होत्या. त्यांना मराठी बौद्धिक फारसे समजत नसे. म्हणून त्यांना त्यातील आशय हिंदीत समजावून सांगायची जबाबदारी शिक्षार्थी असूनही माझ्यावर सोपवली होती. मी हिंदीच्या कोविद परीक्षेत भारतातून पहिली आले होते, हे माननीय बकुळ ताईंना ( त्या वेळच्या कार्यवाहिका- यांचे सासर वाईचे होते ) माहिती होते.
पण मला त्या कामाचा फायदा असा झाला की बौद्धिक मुद्दे काढण्याची, हिंदी बोलण्याची सवय झाली. पुढे भारतभर प्रवास करताना त्याचा फायदा झाला. अखिल भारतीय बैठकीत फेब्रुवारीत वर्गावरचा प्रवास ठरत असे. त्यावेळी राजस्थानच्या कार्यवाहीका आग्रहाने माझा प्रवास मागून घेत. हिंदी चांगले आहे म्हणून!
बौद्धिक कार्यवाहीका म्हणजे विषयांचा अभ्यास व मुद्देसूद बांधणी, तसेच भाषेवर प्रभुत्व या गोष्टी आवश्यकच. लहानपणापासून वाचनाचा असलेला नाद उपयोगी पडला. दक्षिण भारतात त्यावेळी हिंदीला काही प्रांतात विरोध होता. इंग्रजीतून विषय मांडणी करावी लागे. जरा कठीण जाई. इंग्रजी चांगले होते तरी सराव करावा लागे.
वर्गांवरचा प्रवास असला की वर्गाकडून पुष्कळदा वेगवेगळे विषय दिलेले असतात. त्यामुळे अभ्यास वाढला.
प्रवीण वर्ग केंद्रात होईल त्यावेळीही एक दोन दिवस असेच अभ्यासपूर्ण विषय मांडावे लागतात.
पूर्वी भारतातच विश्व विभागाचे वर्ग होत. त्यावेळी अर्थातच विषय मांडणी इंग्लिश मधून करावी लागे. पुण्याला झालेल्या वर्गात अष्टभुजा विषय मांडलेला आठवतो तर नागपूरच्या वर्गात भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार हा विषय मांडला होता. इंग्लंडच्या कार्यवाहिका त्या मांडणीने प्रभावित झाल्या होत्या.
समाजावर आघात झाले अशा प्रसंगी थोडीबहुत सेवा करायला मिळाली. किल्लारी येथील भूकंप, गुजरात मध्ये पुराने केलेला विध्वंस, पडलेले दुष्काळ, काश्मीर मध्ये आलेले विस्थापित, पाकिस्तान, बांगला व 1971 आणि कारगिल या सर्व प्रसंगी समितीने उचललेल्या जबाबदारी मधे खारीचा वाटा उचलायला मिळाला. विस्थापितांसाठी तयार झालेल्या अनेक ठिकाणच्या वस्त्यांना व महिलांसाठीच्या वसतिगृहात भेटी देऊन त्यांचे सांत्वन व मदत करता आली.
मी एक गृहिणी आहे याचे भान ठेवून प्रत्येक ठिकाणी थोडीशी आर्थिक मदत करायची असे ठरवले होते. प्रचंड मोठी रक्कम देणे फारसे जमले नाही पण खारीचा वाटा नक्कीच उचलता आला. आज जे छात्रावास समितीतर्फे चालवले जातात, काश्मीर असो, गोहाटी असो, गुजरात, औरंगाबाद अशा जवळजवळ सर्वांशी संपर्क झाला आहे.
साठे साठ्ये गोंधळेकर मेळावा
परशुरामाने समुद्र हटवून कोकणाची निर्मिती केली. तिथे वस्ती वाढत गेली. त्यांना कोकणस्थ म्हटले जाऊ लागले. त्यातील ही तीन घराणी.
कुणाच्या डोक्यातून कल्पना निघाली माहिती नाही, पण असा मेळावा पुणे येथे आयोजित केला गेला. तत्पूर्वी साठे कुलवृत्तान्त तयार झाला होता व परशुराम हा त्रैवार्षिक अंक ही निघत असे. सकाळी दहा ते पाच अशी मेळाव्याची वेळ होती. परस्पर परिचय हा मुख्य हेतू. तत्पूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांची माहिती मागवली गेली होती. नाश्ता झाल्यानंतर अकराचे सुमारास जाहीर कार्यक्रमास सुरुवात झाली. वसंतराव साठे त्यावेळची एक राजमान्य व्यक्ती, श्री.रामभाऊ साठे, संघ प्रचारक हैदराबाद व सौ सुमित्रा महाजन ज्या नंतर लोकसभा अध्यक्ष झाल्या हे व्यासपीठावर विराजमान झाले. ज्या व्यक्तींचे कार्य उल्लेखनीय होते अशांना व्यासपीठावर बोलावून त्यांचा सत्कार केला गेला. परशुराम, परशुराम क्षेत्र येथे असलेली शिवपिंड व साठे कुलस्वामिनी अंबाबाई यांचे फोटो असलेली एक प्रेम व शाल दिली गेली. मला मिळालेली फ्रेम बिंदाकडे, तीही साठे असल्याने मी ठेवली. आजही त्यांच्या देव्हाऱ्यात आहे. मला हा सन्मान मिळण्याचे कारण म्हणजे माझे समितीचे काम हेच आहे.
माझे हृदय कमकुवत झाले. हार्ट अटॅक येऊ लागले. एक दोनदा प्रवासातही आला. म्हणून जबाबदारी सोडायची असे ठरवले. तसेच केंद्र बैठकीतही सांगितले. पण त्या वेळी अखिल भारतीय संमेलन दिल्लीला होते. ते झाल्यानंतर मग पाहू असे सर्व जणी म्हणाल्या.
त्या संमेलनात मुख्य भाषण माझे ठरवले गेले. विषयही निश्चित झाला आणि गंमत म्हणजे त्या विषयाला योग्य अशी पुस्तके माननीय शांताक्का ह्यांनी काढून दिली. एक दोन दिवस नागपूरला जास्त राहून विषय तयार केला. प्रमिलाताई, रुक्मिणी अक्का, चित्राताई वगैरे त्यावेळी कार्यालयात असलेल्या अधिकाऱ्यांना मुद्दे दाखवले व आवश्यक त्या सुधारणा विचारल्या. घरी परतल्यानंतर विषय सखोल तयार केला.
बौद्धिक झाले व सर्वांचे अभिप्राय बौद्धिक सुरेख झाले आला असे आले. हे भाषण ऐकायला प्रेक्षकात
मा. सुदर्शनजी, मा. राम नाईक, मा. सुषमा स्वराज, मा. सुमित्रा महाजन असे अनेक विद्वान लोक होते. त्यावेळी निवासाची व्यवस्था थोड्या अंतरावर होती. गाडीने जावे लागे. सर्वांच्या शुभेच्छा घेत बाहेर आले. त्यावेळी सुमित्रा महाजन घाईगर्दीने निघालेल्या होत्या. पण त्या जवळ आल्या व म्हणाल्या," सुशीलताई, मला आधीच निघायचे होते पण तुमचे बौद्धिक ऐकायला थांबले. खूप आनंद झाला"
दिल्लीच्या प्रवासात रेखा राजने सुषमा स्वराज यांच्या घरी नेले होते. त्यावेळी त्या उदयन्मुख पुढारी होत्या.
अखिल भारतीय समन्वय समितीच्या बैठकीनाही जायला मिळाले.
श्री.राम भाऊ साठे व प्रल्हादजी अभ्यंकर यांच्यामुळे अनेक थोरामोठ्यांच्या भेटी होत होत्या. समितीमुळे ही अनेकांच्या भेटी झाल्या.
लहानपणापासून आपला भारत पाहिला पाहिजे अशी इच्छा होती. लग्न झाले. नंतर वय प्रौढत्वकडे झेपावू लागले तेव्हा ठरवले ही इच्छा पूर्ण करायची. यात्रा कंपन्यांबरोबर सर्व भारत पाहिला. समितीमुळे पुन्हा एकदा भारताचे दर्शन झाले. पूर्वांचल, कर्नाटक, हिमाचल, पंजाब अशा काही भागात एकदाच प्रवास झाला तर इतर भारतात दोन तीन वेळा झाला.
कोणातर्फे नक्की आठवत नाही पण अहमदाबादला बहुतेक भारतीय संस्कृती प्रचार समितीतर्फे 34 प्रांतांचा मिळून एकत्र कार्यक्रम होता. मला बोलायचे होते. इंदुमती काटदरे अध्यक्ष होत्या. भाषण संपल्यावर अनेक जण येऊन भेटले. सर्वांनाच विषय आवडला होता. इतिहास संकलन समिती तर्फे ही काही भाषणे झाली. मला वाटते माननीय यादवराव जोशी या कामात होते.
अशा संधी व असे यश आयुष्यातला मोठा ठेवा आहे. मोडलेले हात पाय, हृदयाचे दौर्बल्य, वाढलेले विस्मरण अशा आजच्या अवस्थेत हे जुने सर्व आठवले की आयुष्य वाया गेले नाही हे जाणवते.
-सुशील प्रल्हाद अभ्यंकर