बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

राष्ट्रीय चारित्र्य

चारित्र्य म्हणजे अनेक भल्याबुऱ्या प्रसंगांना तोंड देत असताना अवलंबिलेली नीति वा धोरण. एकदा दोन तरुण भिक्षु नदीकाठाने चालले होते. तेवढ्यात त्यांना नदीत बुडत असलेली एक स्त्री दिसली. एकाने विचार केला, "आपल्या धर्मात स्त्री स्पर्श अनैतिक मानला आहे.तिला वाचवणार कसे? दुसऱ्याने तत्काळ पाण्यात उडी घेतली व स्त्रीला बाहेर काढले. पहिला दुसऱ्याला धर्मभ्रष्ट समजू लागला. दोघांच्यात थोडा वाद झाला. दोघेही तथागतांसमोर गेले व झालेली घटना सांगितली. बुद्धांनी विचारले, "या गोष्टीला किती वेळ झाला?" उत्तर आले, "साडेतीन तास'. बुध्द उत्तरले, "दुसऱ्याने केले तेच योग्य. दया हे धर्माचे एक लक्षण आहे. आता स्त्री स्पर्शाबद्दल म्हणशील तर वाचवणाराच्या मनात तिला बाहेर काढल्या क्षणापासून स्त्रीचा विचारही आला नाही. पण तू मात्र तेव्हापासून त्याच विचारात बुडालेला आहेस. धर्मभ्रष्ट तुलाच म्हणावे लागेल."

गोष्ट वाचत असताना एक विचार मनात आला, समजा वाचवणाराच्या मनात स्त्रीबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली असती तर? तिला मी वाचवले असा अहंकार निर्माण झाला असता तर? त्याने तिच्यावर केलेल्या उपकारांची फेड तिने येनकेनप्रकारेण करावी अशी अपेक्षा बाळगली असती तर?

मनाने लगेच निर्णय जाहीर केला," दयेबद्दल मिळालेल्या १० गुणातून ९.५ गुण वजा करावे लागतील आणि आलेले विचार जर कृतीत परावर्तित झाले तर त्यासाठी -९ गुण राहतील. पहिल्याची स्थितीही काही वेगळी नाही. कारण एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीप्रती असणारे कर्तव्य त्याने पार पाडले नाही म्हणून गुण ०, कर्तव्यच्युतीची शिक्षा व स्त्रीचा सातत्याने विचार यामुळे त्यालाही उणे गुणच मिळतील."

एक छोटा प्रसंग. पण त्याची योग्यायोग्यता ठरवण्याचे निकष कितीतरी! अगदी 'गहनो गति:' म्हणावयास लावणारे हे निकष कोणासाठी? अर्थातच ज्याला नीतिमत्तेची चाड आहे व जाण आहे त्यांच्यासाठी. नीतिमत्तेची बंधने तरी कशाला हवीत? उत्तर आहे समाजधारणेसाठी कोणतीही अनिर्बंध गोष्ट तापदायकच ठरते. उदा. कामभावना - मला हवे आहे ही वृत्ती. त्या पाठोपाठ येते लबाडी, चोरी, अन्याय, लुबाडणे, मारपीट करणे, बलात्कार करणे वगैरे! मग समाजात विश्वास, शांती, स्थैर्य, आपुलकी दिसेल का? तसेच अनिर्बंध स्वातंत्र्याची कल्पना मनात आली की कर्तव्य बंधन वाटते. रहदारीचे नियम तोडावेसे वाटतात. कामाच्या ठिकाणी ठराविक वेळा जाणे नकोसे वाटते. टी.व्ही.चा आवाज वाढलेला राहतो. ध्वनिक्षेपक कर्कश ओरडत राहतात. वाहनांचा वेग वाढतो.सदाचाराच्या कल्पना गायब होतात. तंबाखूच्या पिचकाऱ्या कुठेही मारल्या जातात. कचरा रस्त्यावर टाकला जातो. राष्ट्रीय संपत्तीची तोडफोड होते.
मग 'मी' हाच एक भाव वरचढ ठरतो. स्वत:ची जबाबदारी टाळली जाते. समाजात वृद्धाश्रम, पाळणाघरे, शिकवणीवर्ग, अनाथालये, अपंग गृहे, भिकारी यांची संख्या वाढते. व्यक्तिगत स्वार्थ श्रेष्ठ ठरतो. मग बोफोर्स, भ्रष्टाचार, चारा घोटाळा, पेटंट मिळवण्यासाठी लांडीलबाडी, चोरी, समाजद्रोह, राजद्रोह, match fixing, जळगाव वासनाकांड, एखाद्या अधिकारपदासाठी झुंबड, परस्परांचे पाय खेचणे, आरोप प्रत्यारोपाच्या फेरी, गलिच्छ राजकारण, भेसळ ह्या सगळ्या गोष्टी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनतात.

कलियुगात नीतिमत्ता कितीही ढासळली तरी अजूनही ह्या सगळ्या गोष्टी अयोग्यच मानल्या जातात. कारण त्या समाजविघातक असतात. या पार्श्वभूमीवर आमच्या त्रिकालदर्शी ऋषीमुनींचे शाश्वत विचार मनाची पकड घेतात. व्यावहारिक पातळीवर तसेच देहाची आवश्यकता म्हणून अर्थ व काम ह्यांनाही पुरुषार्थ मानले गेले आहे पण त्यांच्यावर नियंत्रण आहे धर्माचे व मोक्षप्राप्तीच्या इच्छेचे. कडक ब्रम्हचर्य पालनाच्या सवयीने जीवनाची सुरुवात होते व तो स्वभाव बनतो. गृहस्थाश्रमात अर्थ व काम ह्यांना स्थान मिळते पण ते वरचढ होऊ नयेत अशी काळजी घेतली जाते. वानप्रस्थ व संन्यासाश्रमात सर्व काही पैसा, ज्ञान, अनुभव समाजहितासाठी वेचले जाते. माझे इतरांप्रती असलेले कर्तव्य मनाआड होत नाही. स्वत: कष्ट सोसूनही इतरांना सुखी करण्याची इच्छा बळावते. स्वावलंबन, आत्मविश्वास, स्वाभिमान हा जीवनाचा कणा बनतो. लाचारी, लांगुलचालन, दुष्टवृत्ती, विश्वासघातकीपणा, अहंकार सगळ्यांना हद्दपार केले जाते.

राज्यं येन पटान्तलग्नतृणकं त्यक्तं गुरोराज्ञया। (गुरूच्या आज्ञेवरून राज्य ज्यांनी कपड्याला लागलेल्या गवताप्रमाणे त्यागले) अशी उदाहरणे जागोजाग आढळतात. कारगील जवानांना अन्न पोचवणारा एक तरुण उद्गारतो, ' काम पुरे होण्याआधीच मृत्यू समोर ठाकला तर एकच विचार मनात येईल, माझ्या जवानाला उपाशीपोटी लढावे लागेल" एक डॉ. कमला सोहोनी अमेरिकेत नोकरीची संधी नाकारते. एक डॉ. अब्दुल कलाम भारताला सर्वश्रेष्ठ स्थान मिळावे म्हणून रात्रंदिवस झटत असतात.

अशा एकेका व्यक्तीचे चारित्र्यच राष्ट्रीय चारित्र्य घडवत असते म्हणूनच प्रत्येक 'मी' ला राष्ट्राचा जबाबदार घटक असण्याची जाणीव सतत जागृत ठेवावी लागेल. माझ्या चारित्र्याने राष्ट्राचा गौरव वाढणार आहे तर माझ्या एखाद्या अयोग्य वर्तनाने राष्ट्राला मान खाली घालावी लागेल हे लक्षात ठेवावे लागेल. राष्ट्राचा अपमान मला 'बाणासारखा' बोचला पाहिजे. स्वभुमी, स्वभाषा, स्वभूषा, स्वभोजन, स्वसंस्कृती व इतिहास ह्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. त्याच बरोबर हेही लक्षात ठेवायला हवे कि अश्या चारित्र्य संपन्न व्यक्ती तुरळक असून चालणार नाही.सगळ्या समाजजीवनाची उंची वाढायला हवी.

आजकाल एक प्रश्न समोर येत आहे, वैयक्तिक चारित्र्य व राष्ट्रीय चारित्र्य यांचा परस्पर संबंध काय? वैयक्तिक चारित्र्यानेच राष्ट्रीय चारित्र्य घडते हे खरे आहे, पण कधी कधी तरतमभावाचा विचार करावाच लागतो. सत्यनिष्ठ युधिष्ठिराला 'नरो वा कुंजरो वा ' म्हणावे लागते. हनुमंताला माझा प्राण शेपटीत आहे सांगावे लागते. 'संभाजी मेला' असे कटू शब्द शिवाजीराजांना मातेसमोर उच्चारावे लागतात. तसेच वैयक्तिक चारित्र्याच्या अहंभावाने कर्णाला कवच कुंडले गमवावी लागतात. बळीराजाला पाताळ गाठावे लागते तर राजे जयसिंहाना स्वजातीयांकडून अनादर प्राप्त होतो.

पण हा प्रश्न मुख्यत: उपस्थित होतो त्या लोकांकडून जे विचार करतात कि माझे वैयक्तिक चारित्र्य हे सामाजिक वा राष्ट्रीय मान्यतेपेक्षा वेगळे आहे. एकपत्नी रामाची भूमिका करणारा नट मदिरा व मदिराक्षीच्या विळख्यात अडकलेला आढळतो. एखादा पुढारी हवाई सुन्दरीबरोबर अश्लील चाळे करतो. अशांचा आग्रह असतो कि ह्या गोष्टी क्षम्य मानल्या जाव्यात. पण हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे कि समाज अशा गोष्टींकडे कधी कधी कानाडोळा करत असला तरी अशा गोष्टी निन्द्यच आहेत. भारतीय विचार पध्दती समग्र दृष्टीकोन ठेवते. अलग अलग तुकड्यांचा विचार न होता एकसंध जीवनाचा विचार होतो. म्हणूनच वैयक्तिक चारित्र्य व राष्ट्रीय चारित्र्य हे वेगळे मानले जात नाही व जाउही नये.

नमस्कार

"हस्तांदोलन करा व लढत सुरु करा " हा पंचांचा मुष्टियोद्ध्यांना सल्ला असतो. "मग आवळलेल्या मुठींनी एकमेकांवर प्रहार करा. "खरे तर बाहेरही पुष्कळदा हस्तांदोलन हे थोडे बहुत अस्वस्थ करणारे असू शकते. भारत वा आशियाई देशातून कांही दिवसांच्या वास्तव्यानंतर जेव्हा पाश्चिमात्य राष्ट्रांत कोणी जातो तेव्हा, विशेषत: अनोळखी व्यक्तीचा, एकाएकी समोर आलेला हात त्याला भयकारक, अनिष्टसूचक वाटू शकतो. थोड्याच काळात हस्तांदोलनाचे भयकारक दर्शन नष्ट होउन तो परिस्थितीशी जुळवून घेतो.

कदाचित त्या क्षणाची भयकारकता ही हस्तांदोलनाच्या इतिहासातून उत्पन्न झाली असेल. मानववंशशास्त्रज्ञांच्या मतानुसार ही पध्दत सरदारशाहीच्या काळात मध्य युरोपमध्ये सुरु झाली. फारच थोडे जण शूर व उदार होते. पण बव्हंशी आपल्या प्रतिस्पर्ध्यासमोर छुप्या शस्त्रासह येत व योग्य अंतरावर आल्यावर सुरा वा तलवारीने त्याला मारत.

शत्रूच्या दुष्ट हेतुची भीती वाटत नाही असे दाखवण्यासाठी सरदार आपला वरवर मोकळा हात समोरच्याच्या पुढे करीत. ही क्रिया विश्वासाची हमीदर्शक असे. जणू काही सुचवत असे की मी निशस्त्र आहे. आपण सुरक्षितपणे भेटू या. नंतर काही काळानंतर हावभावातील घातकता कमी झाली व एकमेकांना भेटण्याची ती खूण झाली.

पूर्व युरोपमध्ये व अरब राष्ट्रांत आलिंगन देणे वा गालाचे चुंबन घेण्याची प्रथा आहे. जपानमध्ये खाली वाकून आदर दर्शवतात तर हवाई राष्ट्रात 'होनी'ची प्रथा आहे. होनी म्हणजे नाकाजवळ नाक न्यायचे व श्वासात ( जो प्राण वा जीव आहे) सहभागी व्हायचे.

हिंदू मात्र 'नमस्ते'ला प्राधान्य देतात. दोन्ही जोडलेले हात हृदयाशी धरून मस्तक नमवून नमस्ते म्हणावयाचे. नमस्ते म्हणजे एक मंत्र व एक मुद्रा. प्रार्थनेसह हातांची स्थिती म्हणजे मुद्रा -अंजली. (मूळ धातू अंज- भूषवणे, आदर दर्शवणे, सुशोभन करणे)

एकत्र जोडलेले हात द्वैतातून अद्वैत सुचवतात, आत्मा व भौतिक ह्यांना एकत्र आणतात. व्यक्तीची आत्म्याशी ओळख घडवतात. उजवा हात आपल्यातील दैवी गुण तर डावा हात भौतिक स्वभाव सुचवतात.
नमस- अर्थ -नमणे, वंदन करणे, सादर प्रणाम करणे.
नम- नम्रतापूर्वक शरण जाणे, शांत होणे.
ते- तुला, तुम्हाला
नमस्ते- मी तुम्हाला वंदन करतो. परस्परांना भेटण्याची कृती म्हणजे नमस्कार.
नमस्ते ही जे जे भारतीय त्याची प्रचीती आणून देणारी प्रतिमा आहे. खरे तर प्रवासी पुस्तिका, पत्रक, दिनदर्शिका, जाहिरात ह्या सर्वावर जोडलेल्या हाताची प्रतिमा असावी. त्यातून भारताची आतिथ्यशीलता, सभ्यता, अध्यात्मिकता व दयाळू वृत्ती प्रतिबिंबित होईल.

नमस्काराबाबत प्रगाढ पूज्यबुध्दी दर्शविण्यासाठी काहीवेळा जोडलेल्या हाताची बोटे कपाळाच्या मध्यभागी टेकवतात, जो भाग अध्यात्मात तिसरा डोळा मानला जातो.

तिसरा प्रकार म्हणजे जोडलेले हात डोक्यावर ठेवणे. ब्रम्हरंध्रावर जाणीवेला केंद्रित करण्यासाठी हा प्रकार, फक्त देव किंवा सद्गुरुना वंदन करताना उपयोजितात.
छोट्या कृतीतून आपल्या जीवनावश्यक संकल्पना व्यक्तिगतरित्या साकार होत असल्याने, प्रत्येक देश व वंश यांच्या दररोजच्या जीवनातील सांस्कृतिक पध्दती व रीतीभाती, त्यांच्या नैसर्गिक, भावनिक संकल्पना स्पष्ट करतात हे मोठे मौजेचे आहे. उदाहरणार्थ एकच काम करण्यासाठी जपानी व अमेरिकन हत्यार निर्माता वेगवेगळी कृती करतात. लाकूड कापणारी करवत अमेरिकन अशी हलवतो की ती शरीरापासून दूर असताना कापण्याचे काम करते तर जपानी ती करवत स्वत:कडे ओढत असताना कापण्याचे काम होते. छोटी कृती पण फरक मोठा.

अमेरिकन करवत वाकल्यानंतर मोठी शक्ती निर्माण करेल तर जपानी करवत स्वत:वरचे सुताराचे नियंत्रण, कामातील सौंदर्य अगदी थोड्या श्रमात साध्य करेल. दोन्ही करवतीना वैश्विक हत्यारांच्या पेटीत स्थान आहे पण प्रत्येक ( हस्तांदोलन व नमस्काराप्रमाणेच ) मानवाचे त्या वस्तूशी असलेल्या नात्याबद्दल त्यांच्या त्यांच्या संकल्पना स्पष्ट करेल.

पौर्वात्य व पाश्चात्य संस्कृती या स्वागत प्रकारात सामावलेल्या आहेत. हस्तांदोलन 'दुसऱ्याला' भेटण्यासाठी आडवे क्षितिजसमांतर पध्दतीचे असते तर नमस्कार हा लंबरेषात्मक असून अद्वैत दर्शवतो. हस्तांदोलन इतरांशी बरोबरी दर्शवते. स्वत:चे सामर्थ्य वा दौर्बल्य, आक्रमकता वा सहनशीलता व्यक्त करते, भौतिकता स्पष्ट करते.

आपण सर्वशक्तिमान परमेश्वराला, पवित्र व्यक्तीला, पवित्र स्थानालासुध्दा नमस्कार करतो. पवित्रता जाणण्याची आपली आंतरिक शक्ती त्यात प्रतिबिंबित होते. सर्व जीव दैवी आहेत, ही मानसिकता जाणवून देते. परमात्मा सर्वत्र भरलेला आहे व प्रत्येक प्राणिमात्रात त्याचा अंश आहे हा भाव व्यक्त होतो. जणू आपण व्यक्त करत असतो,"आपणां दोघांमधील दैवत्व मला दिसते आहे व त्याच्यापुढे मी लीन होत आहे".
शिवाय सार्वजनिक देवघेवीसाठी तो फारच चांगला आहे. एक राजकारणी, एक नट, एक वक्ता एकाच नमस्कारातून हजारो लोकांना एकाच वेळी भेटू शकतो व तेही त्याला प्रतिसाद देतात.

अंजली मुद्रा हे एक सोपे योगासन आहे, ज्याच्यामुळे शरीराच्या सर्व शक्ती संतुलित व सुसंवादित राहतात, केंद्रीभूत होतात, अंतर्भागात जमतात व मानसिक संरक्षण करतात. आपल्या दैवी जागृतीशी आपल्या आंतरशक्तीशी निगडीत ठेवतात.

सर्व सृष्टी पवित्र व दैवी आहे ही जाणीव जागृत होते. समोरच्यातील दैवी अंशाचा सन्मान व पूजन करते. परस्परसंबंध मृदू करते. मैत्री व दया जागृत करते. आभार व्यक्त करते. अहंभाव, स्वकेंद्रितता नष्ट करते. स्वसामर्थ्य संरक्षून पावित्र्य निर्माण करते.
-सुशील अभ्यंकर