स्वराज्य न लिहिता स्वाराज्यं का म्हणले असेल अशी शंका ताबडतोब मनात येते.स्वराज्य अन स्वाराज्य यात काही फरक असेल का? 'नाही व फारसा नाही' अशी सर्व मते असलेली दिसतात. स्वराज्य म्हणताच आठवतात शिवराय व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे गरजणारे लोकमान्य! अगदी वरवर पाहिले तर देशातील रहिवाश्यांच्या मताप्रमाणे चालणारे शासन असा अर्थ लक्षात येतो. शिवराय व लोकमान्य दोघांच्याही काळात परकीय लोकांचे शासन येथे होते व जणू काही त्याच्या विरोधात स्वराज्य हा शब्द वापरला आहे असे वाटते.
पण स्वराज्य ही संकल्पना तर भारतात फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ऐतरेय ब्राम्हणात याचा उल्लेख आहे. पं.सातवळेकर यांचे मते दोन्ही एकच आहेत पण स्वराज्य - शासन यंत्रणा ही प्रत्येक नागरिकाच्या संमतीने बनते व चालवली जाते. स्वाभाविकच "स्व"चे कल्याण, प्रगती ही सर्वोपरी असते. प्रत्येक "स्व" चा उत्कर्ष होईल तितके स्वराज्य भरभराटीला येईल.
तर डॉ. विश्वनाथ प्रताप वर्मा या शब्दाचे पृथःकरण करतांना म्हणतात, "मनःप्रवृतींवर बुद्धीचे नियंत्रण व त्यानुसार व्यक्तीची वर्तणूक व मग स्वाभाविकच "स्व" च्य विचारांपेक्षा सर्वांच्या कल्याणाचा विचार अधिक प्रभावशाली होईल व असे शासन म्हणजे "स्वाराज्य". हे गतिशील, सुस्वभावी, अध्यात्मिक प्रवृतींच्या हातात जेव्हा शासन असते तेव्हा आदर्श अशा सामाजिक व राजकीय पद्धती निर्माण होतात.
अथर्ववेदात स्वाराज्य ची लक्षणे सांगितली आहेत.
(१) आपल्या पूर्वसुरींचे, संतांचे व सर्वेश्वराचे स्मरण सतत ठेवणे.
(२) सदाचरण, सद्प्रवृत्त व नियमाधारित राज्यतंत्र.
(३) अध्यात्म विचाराधीन जनता.
सायाणाचार्य लिहितात- वैदिक तंत्राधारित चालणारे राज्य.
कथक संहिते नुसार- स्वाराज्य हे कल्याणकारक व त्यागाधारित असते.
पाणिनी म्हणतात - स्वाराज्य हे सुराज्य असायला हवे.
ऋग्वेदातील "रंतव्य' ऋषींनी गायलेल्या मंत्रानुसार स्वाराज्याच्या प्रमुखाला विशेष शिक्षण दिले जात असे.
(१) विशाल दृष्टिकोनाचा असावा - सर्वांचे हित, सर्वाना मदतीस तत्पर व पवित्र असावा. समाज निरोगी, सुखी व खंबीर, निर्भय होईल असे त्याने वागले पाहिजे.
(२) तो मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक असावा.
(३) तो विद्वान, शहाणा व पवित्र असावा.
या साठी विविध संस्कारांची व प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाई.
स्वाराज्याची वैशिष्ठे.
(१) व्याशिष्ठ्य- विशालता, सर्वसामावेशकता, लवचिकता, क्षुद्र मनोवृतींपासून मुक्तता. (सर्व कल्याणाची चिंता)
(२) बहुपाय- विविध संरक्षणव्यवस्थामुक्त
शासन पद्धत्ती
ऋग्वेदात या संबंधी १६ श्लोक आहेत व त्याला नाव आहे स्वाराज्य अर्चन त्यातील विषय-
(१) सरहद्द संरक्षण
(२) सागरसीमा रक्षण
(३) जलस्त्रोत्र रक्षण
(४) भूसंरक्षण
(५) अंतरीक्ष संरक्षण
(६) शास्रास्त्र संचय
(अ) निरुपयोगी व झिजलेली नसावीत.
(आ) संरक्षक व सर्वांवर मात करणारी असावीत.
(इ) चांगल्या व टिकावू धातूची असावीत
(ई) अशनी- क्षेपणास्त्रे
(७) आततायी वध
(८) शेती व पाटबंधारे
(९)औषधोपचार
(११) सेवा
(१२)पाणीपुरवठा
(१३) वैभव संपन्नता
या विवेचनावरून लक्षात येते- स्वाराज्य =स्वराज्य+सुराज्य.
पारमेष्ट्यराज्य
समर्थ रामदासांनी म्हटले आहे,
"सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल त्याचे,
परंतु तेथे पाहिजे, अधिष्ठान भगवंताचे."
चळवळ, नवीन कार्याची सुरवात व चालू कार्याचे संचलन आपणच मानवांनीच करायचे आहे पण अधिष्ठान मात्र भगवंताचे, जे जे सत आहे चांगले आहे त्याचे असले पाहिजे आणि हीच भारतीय मनोवृत्ती आहे.
पारमेष्ट्यराज्य शब्द उच्चारताच मनात कुठेतरी परमेष्टीची जाणीव होतेच आणि पारमेष्ट्यराज्याचा अधिपति राजा याच्याही मनात ज्या राज्यावर आपण राज्य करणार आहोत ते राज्य म्हणजे देवांनी आपल्याला दिलेली देणगी आहे असा भाव असावा असे अपेक्षित आहे. असा जो प्रमुख त्याला "प्रजापती" असे म्हटले आहे. प्रजेबद्दलची आपुलकी, कळवळा, प्रजाहित दृष्टी, तसे कर्तृत्व असा सगळा बोध या शब्दाने होतो. म्हणूनच सर्वात श्रेष्ठ व उत्तमगुणयुक्त व्यक्तीची योजना या पदासाठी होत असे.
आजही शंकराचार्य, दलाई लामा या पदांची योजना अशीच होते. अशी व्यक्ती शोधणे व त्या व्यक्तीला त्या पदासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे याची काळजी घेतली जाते.
हा प्रजापती राज्यातील विद्वान हितचिंतकांच्या सहाय्याने आपले सहकारी शोधतो, निवडतो. त्यांच्या गुणांनुसार त्यांना काम देतो. अधिपतिइतकेच महत्व या सहकारी मंडळाला असते. अथर्व वेदात म्हटले आहे, प्रजापती ब्रम्हचारी असावा. शत्रूविनाशक असावा. शौर्य, धैर्य, सामर्थ्य यांनी परिपूर्ण असावा. असा प्रजापती स्वाभाविकच स्वयंप्रेरित असेल व प्रजेच्या प्रगतीकडे त्याचे लक्ष केंद्रित असेल.
शासन पद्धति
खेडे हे एक एकक (कुल) मानून त्यावर एक कुलाप. अशा काही कुलांचा मिळून एक वज्र. त्यावर एक वज्रपती. त्यापेक्षा वरचा गण- गणपती. अशांचा समूह - गणराज्य.
कुलाप- ही संकल्पना सुद्धा प्रजापती प्रमाणे एक व्यक्ती नसून त्याचे सहकारीही (जे त्याग बुद्धी व कर्तृत्ववान आहेत.) त्यात अंतर्भूत आहेत. या पदावर स्त्रियांचीही योजना केली जात असे. प्रजापतीच्या सहाय्यासाठी सभा व समिति अशी दोन मंडळे असत. अशा मंडळांना प्रजापती म्हणतो, "आपण जेष्ठ श्रेष्ठ लोक मला माझे काम नीट चालावे म्हणून आशीर्वाद द्या. आपण मला सहकारी समजून योग्य वाटत असेल ते मोकळेपणाने बोला.
न्यायदान अधिकार - अंतिम निर्णय प्रजापतीचा असेल, पण त्याआधी त्याने काळजीपूर्वक व सूक्ष्म दृष्टीने दोन्ही बाजू तपासून पहाव्यात.
आर्थिक व्यवस्था - प्रजाकल्याणासाठी लागणारे धन अधिकाधिक प्राप्त व्हावे असा प्रयत्न प्रजापतीने करावा. त्याच्या सहाय्यार्थ दोन कोषाध्यक्ष असावेत व राज्यातील सर्व यंत्रणांना योग्य व आवश्यक तितका पैसा पुरवण्याची जबाबदारी व कार्य या तिघांनी करावे. सुक्तांमध्ये याचे वर्णन केले आहे, 'योग्य मार्गाने, शेकडो हातांनी धनसंग्रह करावा व तो सहस्त्र हातांनी वाटावा."
शेती- भूमीचे संरक्षण व योग्य संवर्धन करून भूमातेला पुरेसे अन्नधान्य देण्याविषयी केलेली प्रार्थना अथर्ववेदात आहे. जमीन सुपीक राहील ही जबाबदारी राजाची आहे व यदाकदाचित अवर्षण जाणवलेच तर त्याची पूर्ती शासनाने करावी अशी स्पष्ट सूचना आहे.
जल व अन्नवितरण - अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा पुरवणे हे सर्वच राज्यपद्धतीत अपेक्षित आहे. पारमेष्टी राज्यांत (अथर्ववेद ) विविध प्रकारचे अन्न लोकांच्या गरजा व आवड लक्षात घेऊन समप्रमाणात (१ मनुष्य २ पोळ्या नव्हे, तर तरुणांना व कष्टकरीना जास्त व वयस्क व दुर्बलांना कमी पोळ्या हे सम प्रमाण मानावे म्हणजेच आवश्यकतेनुसार वाटप ही भारतीय संकल्पना) वाटले जाईल अशी व्यवस्था करावी तसेच पाण्याचे साठवण व वितरण ही व्हावे.
संरक्षण - सद रक्षणाय व खलनिग्रहाय संरक्षण व्यवस्था व ती राज्यप्रमुखाने करावी. अथर्ववेदातील १९/२०/२ मध्ये याचे सखोल वितरण आढळते.
खनिज - आपली भूमी या बाबतीत समृद्ध आहे. उत्खनन व उपयोग योग्य प्रमाणात करावा असे निर्देश.
शहर बांधणी व निर्मिती- या काळात (अथर्व वेदाच्या ) शिल्पशास्त्र व वास्तुविद्या यांचे चांगले ज्ञान लोकांना झाले होते.
अशा राज्यांचा विस्तार हा विशाल होत असे.
महाभारत सभापर्वात म्हटले आहे, पारमेष्टय राज्य संकल्पनेपूर्वी शांततेचा विचार हा फारसा महत्वाचा मानला गेला नव्हता पण पारमेष्टयराज्यांत शांततेला महत्व प्राप्त झाले. युधिष्ठीर शांततेचा पुरस्कर्ता असल्याने त्याने पारमेष्टय राज्याला सर्वाधिक महत्व दिले आहे. या पद्धतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपला विकास करून घेण्याची सर्वाना असलेली समान संधी. स्वतःच्या गुणांच्या जोरावर कुलाप, वज्रपती, गणपती कोणीही होऊ शकत असे.
अशा राज्यातील प्रमुखाने यदाकदाचित सर्व सत्ता स्वतःच्या हातात केंद्रित केली व तो अन्याय करू लागला तर त्याला सत्तेपासून हटवले जाई. वेळप्रसंगी त्याचा वधही केला जाई. अनियंत्रित हुकुमशाहीकडे होणारी वाटचाल रोखण्याचा अधिकार प्रजेचा असे. अशी उदाहरणे इतिहास, पुराणात आढळतात.
महाराज्याम
महाराज्यं ही संकल्पना विस्तारात्मक व गुणात्मक अशा दोन्ही दृष्टीनी विचारात घेतली गेली आहे.
विस्तारात्मक- राज्याच्या सीमा नेहमी विस्तारल्या जाव्यात. 'सदैव वर्धिष्णू' असावे. अर्थातच आजूबाजूंची राज्ये ही जोडली जावीत. याचा प्रमुख 'महाराजा' असेल. जसे राज्यप्रमुख, राजा, साम्राज्य प्रमुख, सम्राट, स्वराज्यप्रमुख.सत्पथ ब्राम्हणात यालाच राजपती म्हटले आहे.
उदाहरण- वृत्राला मारून इंद्राने त्याचा विशाल भूभाग स्वतःच्या साम्राज्याला जोडला व स्वतःला तो महाराजा म्हणून संबोधू लागला. त्याने महेंद्र हे नाव धारण केले.
पं.सातवळेकरांच्या दृष्टीने लहान लहान राज्ये स्वतःहून आपली राज्ये घटनात्मक रित्या समाविष्ट करतात तेव्हा ते महाराज्य बनते. सर्वजण जेव्हा या महाराज्याच्या हिताचा निस्वार्थ पणे विचार करतात तेव्हा त्यांचे परस्पर संबंध सामोपचाराने राहतात.
ऐतरेय ब्राम्हणात अशा काही महाराजांची नावे दिली आहेत. जनमेजय, सहदेव्य सोमकं, अरिंदम, कृताविद, जनक, विदर्भ, भीम, नागजीत (गांधार), सुदास वगैरे. वैदिक साहित्यात दाशाराज्ञ युद्ध व सुदासाचा विजय ही गोष्ट आढळते.
गुणात्मक - ऐतरेय ब्राम्हणात खूप धनवंत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर पाणिनीने अष्टाध्यायीत 'दैवी सामर्थ्ययुक्त' असा अर्थ लावला आहे. दैवी सामर्थ्यचा अर्थ शत्रू पासून मुक्तता.
एकंदरीत शत्रूपासून निर्भय, धनवान व शांततामय असा अर्थ होईल. अथर्ववेदातील वर्णनाप्रमाणे महाराज्य म्हणजे शत्रूजय, मोठी सेना, परस्पर सौहार्द्र भाव सर्व कल्याणेच्छा. भद्रं कर्णेभि श्रुणुयामि देवः भद्रं पश्येम। (चांगलेच कानी पडेल व चांगलेच दिसेल) अशी स्थिती असावी. 'मृत्यो माअमृतं गमय ' अशी कांक्षा असावी व ती सफल व्हावी, महाराज्याच्या सीमा देशाच्या सीमेला भिडाव्या.
राज्यकारभार पद्धति -
(१) अनेक राज्ये एकत्रित असली तरी सर्वाना सारखेच महत्व, दर्जा व नियम असावा.
(२) इतर राज्यांना मंडलिक समजले जाणार नाही.
(३) महाराज्याधीपती हाच आर्थिक स्थितीला जबाबदार असेल.
(४) प्रांतप्रमुख हा महाराज्याचा सभासद असेल. महाराजा हा त्या त्या प्रांताच्या सल्लागार मंडळाच्या बैठकीस उपस्थित असेल व नियम प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित पाळले जातील इकडे त्याचे लक्ष असेल.
(५) प्रांताप्रांतातील समस्या या केंद्रीय समितीत चर्चिल्या जातील. महाराजाच्या संमतीने निर्णय होईल.
आधिपत्यमयं
पा- रक्षण करणे पासून पाति इति पति असा शब्द तयार झाला. जसे क्षेत्रपति, वसुपति, प्रजापति वगैरे.
वाचस्पत्यम मध्ये तारानाथ भट्टाचार्य लिहितात, अधिकाःपाति इति अधिपति अनेकांचे रक्षण करणारा किंवा पति पेक्षा अधिक अधिकार असलेला.
पं.सातवळेकर यांचे मते पतिचे नियंत्रण करणारा तो अधिपति. अशा अधिपती पेक्षा अधिक व विशाल अधिकार असणारे आधिपत्यमयं.
शासनयंत्रणा वेगवेगळे विभाग व त्यावर एक प्रमुख. एक पति. उदा. दिशापति, पशुपति, अन्नपति, वनपति इतकेच काय पण तस्क्रनाम पति. गणपती ला ही 'व्रातपति, प्रमथपति' म्हटलेलेच आहे.
ऋग्वेदात वरुणाला म्हटले आहे, 'अस्थीरतेकडून आर्ताना स्थिरता देणाऱ्या तू माझ्या राष्ट्राचे आधिपत्य स्वीकार.' हुकुमशाही व एकतंत्री राज्य यापेक्षा आधिपत्यमय थोडे वेगळे असले तरी आधीपतिच्या तंत्रानेच चालणारे असल्याने एकाधिकारशाहीकडे वाटचाल होण्याची शक्यता दाट आहे असे म्हणावे लागेल.
समंतपर्यायी
शब्द वाचल्याबरोबर वाटते सामंत राज्य असावे पण सामंतराज्यकल्पना ही नंतरच्या काळातील आहे. वैदिक वाड्मयात सामंत राज्याचा उल्लेख नाही.
ऐतरेय ब्राम्हणात 'राज्यं समन्तपर्यायी स्यात्।साम्राज्यं समन्तपर्यायी स्यात्।' असे उल्लेख आढळतात. म्हणजेच राज्यप्रकार कोणताही असो तो समंत पर्यायी असावा असे म्हंटले आहे.
समन्तपर्यायी म्हणजे काय?
ऐतरेय ब्राम्हणात त्याचे विश्लेषण 'देशतः कालतः सर्वव्यापित्व स्थान्' असे केले आहे. देशत: सर्वव्यापित्व म्हणजे फक्त आपल्याच देशात सीमित न राहता खूप मोठ्या भूभागावर पसरलेले तर कालतः सर्वव्यापित्व म्हणजे काळाचे बंधन नाही. सदासर्वकाळ.
शुक्लयजुर्वेदात एक राजा म्हणतो, 'माझे राष्ट्र हेच माझे शरीर आहे व प्रजा म्हणजे त्या शरीराचे सगळे अवयव आहेत. 'प्रजेशी राज्यकर्त्यांची मनापासूनची इतकी समरसता समन्तपर्यायी मध्ये अपेक्षित आहे. म्हणजेच लोकांच्या आवश्यक गरजा तर पूर्ण व्हाव्यातच पण त्यांनी एकी निर्माण व्हायला हवी. 'आधीपति सर्व सैन्याला संघटित करणारा असावा. शत्रुंजय असावा. धनदाता ही असावा '- ऋग्वेद.
थोडक्यात म्हणजे प्रथम आपल्या राज्यांत सुख, शांति, लोककल्याण व प्रगति झाल्यानंतर तशी स्थिती इतरत्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, आपल्या श्रेष्ठ विचारांचा प्रसार करण्यासाठी संघटित गट देशाबाहेर पाठवणे, इतर राज्यकर्त्यांना विचार पटवून देणे व सर्वदूर सुखशांती प्रस्थापित करणे.
आपला इतिहास सांगतो की भारतीय लोक 'कर्ण्वन्तो विश्वमार्यम'। य विचारांनी संपूर्ण जगात पोचले होते.
(८)सार्वभौमराज्य
वैश्विक राजकीय ऐक्याचा हा विचार आहे. राजसूय यज्ञ केल्यानंतर 'राजा' हे बिरूद प्राप्त होत असे. आपल्या राज्याच्या कक्षा वाढवल्यावर वाजपेय यज्ञ करून तो सम्राट बने. तदनंतर अश्वमेध यज्ञाने त्याला एकराट पदवी मिळे.राज्याच्या कक्षा संपूर्ण पृथ्वी व्यापू लागल्या की सार्वमेध यज्ञ संपन्न होई व तो सार्वभौम राजा बने.
पुराणांमध्ये पृथ्वी म्हणजे नेमके कोणते क्षेत्र याचा उल्लेख सप्तद्वीपांच्या नामोल्लेखाने केला जातो व त्या द्वीपांची भौगोलिक व्याप्ती पाहिली की आजचे आफ्रिका, आशिया व युरोप खंड त्यात संमिलित होते व ही भूमी आसमुद्र पर्यन्ता होती हेही लक्षात येते. ही सर्वं भूमी प्राचीन ऋषीमुनींच्या डोळ्यांसमोर होती व त्या सर्वं भूमीवर साम्राज्य असावे हे त्यांचे लक्ष्य होते.
का?
वेगवेगळी राज्ये असतील तर स्वाभाविकच कलह, युद्धे होत राहणार. त्या ऐवजी एकच राज्य असेल तर शान्तता प्रस्थापित होईल. शांततेमुळे विकास व प्रगति होईल. एकी निर्माण होईल. सहनौ भुनक्तु ही कल्पना प्रत्यक्षात उतरेल अशी दाट शक्यता होती. हा आशावाद दृढ होता. अथर्ववेदात हा विश्वास व्यक्त झाला आहे. 'यत् अहं मन्यसे,माम पर्वताः ना वरयन्ते। वगैरे माझ्या वाटचालीत मला कोणीही अगदी पर्वतही रोखू शकत नाहीत. पुढे म्हणले आहे,' तेजोमय किरणांचा सूर्यही माझ्या शक्तीला घाबरेल.'
'अमृतस्य पुत्रा' सर्व लोकांनी व्हावे. सदगुणात स्पर्धा करावी, सर्वांच्या योगक्षेमाची काळजी सर्वांनी करावी. विविध देशांच्या लोकात व्यापार, सहकार्य, परराष्ट्र व्यवहार, सर्वशांती भाव, आपुलकी व सर्वांच्या कल्याणाचा विचार या मनोभावानेच व्हावेत. त्या साठी विश्व हेच कुटुंब मानण्याचे शिक्षण द्यावे लागेल. सर्व विश्व सर्वांची माता आहे हा भाव जागवावा व वृद्धींगत करावा लागेल. रोजच्या गरजा भागतीलच. नंतर ज्ञानसंपादनाने मानवी संस्कृती विकसित होईल.
हे फक्त भूमीपुरतेच मर्यादित नाही. 'घौ सन्ति, अन्तरिक्षम साती' (यजुर्वेद) हा भाव अंतरीक्षही व्यापेल. त्यासाठी अन्न, जलस्तोत्रांचे समान वाटप, औषधी वृक्षांची लागवड व संरक्षण, सर्वधर्मसमानता, पर्यावरण या सर्वांचा विचार व नियोजन हवे. त्यासाठी विद्वानांनी योजना आखाव्यात व कृतीत आणाव्यात. ही संकल्पना प्रत्यक्षात येणे हेही कठीण व तशी परिस्थिती टिकणे हेही कठीण. पण हे प्रयत्न भारतीयांनी केले होते हे नक्की. मरुत, पृथु, मांधाता ही अशा काही राजाची नावे.
फरक - या सर्व विवेचनात लक्षात येते,
(१) भोज्य व स्वाराज्य हे राज्याच्या क्षमतेनुसार विस्तारलेले असत.
(२) महाराज्य हे एका देशापुरते मर्यादित मानले जाई.
(३) पारामेष्ट्य सार्वभौम व साम्राज्य यांच्या सीमांचा विस्तार मोठा असे.
(४) आधिपत्यमय यांची व्याप्ती संपूर्ण विश्व अशी अपेक्षित आहे.
पुथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति।
वैश्विक एकराज्याची संकल्पना पुथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति या शब्द समूहाने अधिक स्पष्ट केली आहे. पृथ्वीवर जमिनीपेक्षा जलव्याप्त प्रदेश खूपच मोठा आहे व सध्या उपलब्ध असलेली जमीन एकाच वेळी निर्माण झाली असे नाही. पृथ्वीच्या पोटातील लाव्हारसाच्या उत्कालानामुळे तसेच आकुंचन प्रसरणामुळे जमिनीचे भाग वर येत गेले व तिथे तिथे ती भूमी मानवी जीवनायोग्य झाल्यानंतर वस्ती होत गेली.
मागे उल्लेखिल्याप्रमाणे सप्तद्विपानी ओळखला गेलेला प्रदेश म्हणजे आफ्रिका, युरोप, आशिया खंडांचा समावेश असलेला प्रदेश आपण पाहिला आहेच. पण ही पुराणकालीन माहिती झाली. भारतीय संस्कृतीचा विश्व संचार लक्षात घेतो तेव्हा जाणवते दक्षिण अमेरिकेत पेरू, बाली, ग्वाटेमाला येथील 'इंका' संस्कृती ही भारतीय संस्कृतीचाच अविष्कार होता. उ.अमेरिकेतील मूळ रहिवासी रेड इंडियन्स संस्कृत प्रभावाने उच्चार स्पष्ट (युरीपियन लोकांपेक्षा) करू शकत. त्यांच्या पूजास्थानात यज्ञ कुण्ड असे. ऑस्ट्रेलियातही गगुज्जा जमात त्रिपुंड लावते. हंसनदी (हंसध्वनी ) रागात गायन करते व 'रामा रामा' या उच्चाराने त्यांच्या भजनांची व स्तोत्रांची सुरवात करते असे. वराह पुराणात लोहगिल क्षेत्र कुठे आहे सांगताना म्हटले आहे, ज्या म्लेंच्छ देशाच्या दक्षिणेस हिमालय येतो त्या प्रदेशात आहे.
मग समुद्रपर्यंताया एकराळ (एकराळ=एकराष्ट्र चा अपभ्रंश) ही नुसती घोषणा नव्हती तर तशी कृतीही घडली होती हे बघून सानंद आश्चर्य वाटते. भारतात इंग्रज राज्य करायला लागल्यानंतरच 'राष्ट्र ' ही संकल्पना भारतीयांना कळली असे म्हणणाऱ्या लोकांच्या बुद्धीभेद करण्याच्या योजनेचा पर्दाफाश होतो. आमची राष्ट्र संकल्पना भारत राष्ट्रापुरती मर्यादित न रहाता ती 'विश्वव्यापी' बनली होती, आहे अन राहीलही.
सार्वायुष आन्तापरार्धात।
आशीर्वाद देताना पुष्कळदा म्हटले जाते, 'दीर्घायुषी भव,शतायुषी भव' काही वेळा 'चिरंजीव भव' असाही उच्चार होतो. या मागचा भाव या मंत्रात 'सार्वायुष व परार्धाच्या अंतापर्यंत' या शब्दांनी व्यक्त झाला आहे. विश्वराज्य, विश्वकुटुंबसंकल्पना सदैव जागती राहावी अशी इच्छा प्रदर्शित केली गेली आहे.
मरुच
अशा समुद्रपर्यंताया एकराट अशा विशाल साम्राज्याचा पहिला राजा म्हणून मरुताचे नाव पुढे येते. या पुण्यश्लोक राजाचे नाव वैदिक पुराणात मरुतकामप्रिय असे आहे. यापूर्वी यज्ञ संकल्पना आपण पाहिलीच आहे. असे १०० यज्ञ करणारांना देवांचे इंद्रपद प्राप्त होत असे. म्हणून इंद्राला नेहमी भीती वाटत असे. अर्थात १०० यज्ञ करेपर्यंत असणारा मनोनिग्रह, त्यागभव, इंद्रपद प्राप्त झाल्यानंतर मात्र नसे व माझे हे अढळपद कोणी हिरावून घेऊ नये असे वाटून त्यासाठी प्रयत्नही केले जात असे पुराणे सांगतात. आजही आपण राजकारणात स्वतःचे पद टिकवण्यासाठी, वरचे पद मिळवण्यासाठी काय काय केले जाते हे पाहतोच.
मरुताची १०० वा यज्ञ करायची वेळ आली. इंद्राने त्याचा यज्ञ होऊ नये असा प्रयत्न चालवला. आपले सहकारी यांना आपली तशी इच्छा कळवली. म्हणून बृहस्पतीनी यज्ञाचे पौरोहित्य करायचे नाकारले. बृहस्पतींचे धाकटे बंधू संवर्त यांनीही आधी नकार दिला. पण राजाला वाईट वाटले म्हणून यज्ञ संपन्न केला. पण १०० यज्ञ करूनही मरुताने ना इंद्रपद मागितले ना स्वर्गभोग. शतक्रतू ही पदवी फक्त त्याने धारण केली.
त्याच्या या त्यागप्रवृत्ती मुळे इंद्र तर आनंदलाच पण सर्व देवही प्रसन्न झाले व ते परिवेष्टारी बनले, त्याच्या भोवताली जमा झाले. त्याच्या राज्यांत सर्व देव सभासद बनले. (अवसन गृहे )(विश्वे देवाः सभासद ). एका राष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. स्वाभाविकच इंद्रपदाचा त्याग करूनही त्याला सर्वांच्या मनात स्थान मिळाले. अधिकार प्राप्त झाला. मरुत म्हणजे अविक्षत पुत्रा कामप्रेर होय!
आम्हालाही योग्य वेळी त्यागाची बुद्धी दे व नः वरिवस्यन्तु- सर्व श्रेष्ठ बनू असा आशीर्वाद दे- त्या साठी ही मंत्र पुष्पांजली!
त्यागमय यज्ञस्वरूप साम्राज्याचा एक घटक 'मी' आहे हे भाग्य मला प्राप्त झाले आहे तदनुसार कर्तव्य करण्याची बुद्धी व शक्ती प्राप्त होवो!
-सुशील अभ्यंकर
यांचे सहाय्य घेतले.
(१) श्री शंकर अभ्यंकर यांची कॅसेट.
(२) देवे मंत्राचा अर्थ--पं.सातवळेकर.
(३) Political Thoughts In Vedas--Dr.shiv Acharya.
(४) हिंदू संस्कृति अंक -कल्याण मासिक