गुरुवार, ९ जुलै, २०१५

चिंतनसूत्र -३. देश हा देव असे माझा

 फार पूर्वी एक सिनेमा पहिला होता. ऐतिहासिक होता. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्यानंतर संभाजी राजे गादीवर आले. औरंगजेबाने त्यांना पकडले व हालहाल करून ठार मारले. त्यांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू यांना कैदेत टाकले. पण शिवरायांचे दुसरे पुत्र युक्तीने जिंजीला पोचले व स्वराज्याची सूत्रे हलवू लागले. ह्या काळात गनिमी कावा व वेगवान दौडी यांच्या मदतीने शूर मराठा सरदारांनी औरंगजेबाच्या सळो कि पळो करून सोडले होते. यामध्ये प्रमुख होते संताजी व धनाजी. त्यांनी तर औरंगजेबाच्या छावणीत शिरून तंबूचा कळसच काढून आणला होता. हे सर्व वर्णन त्या सिनेमात होते आणि देश हा देव असे माझा हे गीत देखील सतत म्हटले जात होते.

देवाचे स्थान आपण पवित्र ठेवतो. त्याला फुले, पत्री, धूप, गंध सर्व अर्पण करतो व तो आपला मदतकर्ता आहे असा विश्वास मनात बाळगून त्याची पूजा अर्चा करतो. देशाला देव मानले की त्याला वाहायची फुले कोणती? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले आहे, 'गुणसुमने मी वेचियली'. मी गुणांची फुले वेचून आणली आहेत. ते सर्व गुण देशासाठी उपयोगात आणणार आहे. आपल्या चांगल्या चारित्र्याचा धूप लावणार आहोत. गंध उगाळताना खोड स्वत: झिजते व सुगंधित गंध तयार होते. आमच्या सर्व शक्तीचा, गुणांचा, बुद्धीचा उपयोग आम्ही देशासाठी करणार आहोत. आमच्या कुठल्याही कृतीमुळे देशाला दोष लागणार नाही ही काळजी घेऊन देश पवित्र ठेवणार आहोत. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होऊन तिथे प्रथम क्रमांक मिळवून देशाला गौरव प्राप्त करून देणार आहोत. आणि हे सर्व का? तर देश माझा आहे म्हणून!

देशाला आपण मातृभूमी म्हणतो. आपल्या आईप्रमाणेच ही मातृभूमी आपले लालनपालन करते. अन्न, निवास, पाणी सर्व उपलब्ध करून देते. आम्ही तिला आईप्रमाणे मानले असल्याने तिची सेवा करून तिला गौरव मिळवून देणार आहोत.

आमचा हा भारत देश जगात सर्वात प्राचीन आहे. सर्व जगाने वंदनीय मानला आहे. गुरुस्थानी मानला आहे. मध्यंतरीच्या काळात आमची थोडी पीछेहाट झाली असली तरी तिला तेच गौरवाचे स्थान पुन्हा मिळवून द्यायचा आम्ही निश्चय केला आहे. आम्हाला देशाचा गौरव, मान सांभाळायचा आहे.

देश हमे देता ही सब कुछ। हम भी तो कुछ देना सीखे - हे लक्षात घेऊन, तसे वागून आम्ही आमचे राष्ट्र तेजस्वी बनवणार आहोत. आम्ही त्यासाठीच रोज प्रार्थना व तशी कृतीही करत आहोत. 

 

मंगळवार, ७ जुलै, २०१५

चिंतन सूत्र - २. 'ईश्वर: सर्व भूतानाम!'

सर्व भूतांमध्ये ईश्वर आहे. इथे भूत याचा अर्थ सर्व सजीव! फ्रेंच राज्यक्रांतीची मूलतत्वे होती, 'स्वातंत्र्य, बंधुता, समता'. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेने १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या सर्वाना मतदानाचा हक्क देऊन समता प्रस्थापित केली. जातिजातिंमध्ये असणारा विद्वेष नष्ट करण्याकरिता, गेल्या २५/३० वर्षांपासून, समरसता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत.
 
खरे तर या सर्व गोष्टी अतिप्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीने प्रतिपादल्या आहेत, सर्व प्राणीमात्रात ईश्वराचा अंश आहे असे म्हणणे याचाच अर्थ स्वाभाविकत: सर्व समान आहेत. उच्चनीचभाव, श्रेष्ठकनिष्ठवृत्ती हीच कृत्रिम आहे. 

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण असतात तर काही दोष असतात. सर्वगुणसंपन्न कोणीच नसतो. तसाच केवळ दोषाचा पुतळाही कोणीच नसतो. प्रत्येक व्यक्तीमधील गुण, सद्भाव, मदत वा सेवा करण्याचा भाव वगैरे गोष्टी म्हणजे ईश्वराचा अंश! हा अंश ओळखायचा, वाढवायचा व समाजकार्यासाठी त्याचा उपयोग करायचा. चांगल्या गोष्टीचे कौतुक झाले कि त्या अधिक करण्याची प्रवृत्ती निर्माण होते व वाढत जाते हे लक्षात घेऊन तसा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे. 

मराठीत एक म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. आपल्याला दुसऱ्याचे दोष पटकन दिसतात पण तिकडेच अधिक लक्ष न देता त्याच्या गुणांवरच अधिक लक्ष केंद्रित करायचे. स्वत:तील गुण हे माणसाला लक्षात येतात. दोष मात्र येत नाहीत. आले तरी ते झाकण्याची प्रवृत्ती असते. इथे मात्र प्रयत्नपूर्वक असे दोष शोधून ते घालवण्याचा प्रयत्न हवा. 

थोडक्यात दुसऱ्यातले गुण शोधायचे व स्वत:तील दोष घालवायचे असे केले तर सर्व समाज सुखी होईल. प्रत्येक व्यक्तीतला ईश्वरी अंश जोपासला जाईल व 'ईश्वर सर्व भूतानां' याची प्रचीति येईल.
 
अशी प्रचीति आली की एक एकनाथ काशीहून आणलेली गंगा वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवाला पाजेल, एक ज्ञानेश्वर रेड्यामुखी वेद वदवेल, एक देशपांडे दांपत्य मानसिक दुर्बलांसाठी बुटीबोरी येथे संज्ञा संवर्धन संस्था चालवेल, एक भावनाताई केऱ्रकर स्वमग्न मुलांसाठी कांदिवलीला उमंग नावाची शाळा चालवेल. एक हेमंत बेलसरे ज्यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे अशा रस्त्यावरच्या लोकांना रोज घरून जेवण नेउन खाऊ घालेल. 

'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, 
तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा ।।'
असे साधू व असा देव घरोघरी प्रगटेल. 
 

सोमवार, ६ जुलै, २०१५

चिंतन सूत्र - १. माता पिता गुरु नमावा माथा

ज्यांच्यापुढे मस्तक आपोआप लवते अशा तीन व्यक्तींचा उल्लेख आज आपण करत आहोत. आई आपल्याला जन्म देते, लालनपालन करते. स्वत: कष्ट सोसून, त्याग करून आपल्या कल्याणाची चिंता करते अन म्हणूनच कवी यशवंत ह्यांनी म्हटले आहे,'आई थोर तुझे उपकार!'

आपल्या जडणघडणीत पित्याची भूमिकाही तितकीच महत्वाची असते. स्वत:च्या कणखरपणाने, ते बाहेरच्या संकटांना आपल्यापर्यंत पोचू देत नाहीत, स्वत:च्या शौर्याची, पौरुषाची ढाल करून आपले संरक्षण करतात.

विविध प्रकारचे ज्ञान देऊन. कौशल्ये शिकवून, आपल्या बुद्धीला खतपाणी घालून एक 'माणूस' म्हणून जगण्यासाठी गुरूची शिकवण आपल्याला योग्य बनवत असते.

प्रामुख्याने या तिघांच्या मुळे आपले जीवन सुखकर होते, सार्थ होते व सफल होते. यांतील प्रत्येकजण स्वतंत्ररीत्या मदत करत असला तरी सर्वांचा उद्देश एकच असतो तो म्हणजे आपले हित, आपला विकास, आपले कल्याण अन म्हणूनच आपला माथा त्यांच्यापुढे आदराने झुकतो. हा वंदन करण्याचा संस्कार भारतीय संस्कृती घडवत असते.

आपल्या संस्कृतीने पाच माता प्रमुख मानल्या आहेत. जन्मदात्री माता, भूमाता, गोमाता, गंगामाता आणि गीतामाता!
भूमाता - सकाळी उठल्या उठल्या समुद्रवसने …. हा श्लोक म्हणून आपण तिला वंदन करतो. ही आपल्याला आधार तर देतेच पण विविध प्रकारचे धान्य, भाजीपाला, कंद, फळ देणारे वृक्ष तिच्यामुळे वाढतात. सोने, चांदी, तांबे अशी खनिजेही तिच्याच पोटातून आपल्याला मिळतात. तिच्या भोवती असणाऱ्या वातावरणामुळे आपण श्वास घेऊ शकतो. तिच्यावरून वाहणाऱ्या नद्यांचे, तिच्यात खोदल्या गेलेल्या विहिरींचे पाणी आपण पितो. तिच्यावर आपण चालतो, खणतो, वेगवेगळे आघात करतो, घरे बांधतो- खरे तर तिला त्रास होतो पण ती आपल्या आईसारखेच हे सगळे सहन करते व आपल्यासाठी झटते.

 गोमाता - जिचे दुध आपली भूक भागवते ती गोमाता. हिचे मुलगे म्हणजे बैल ते आपल्या शेतीला मदत करतात. गाईचे शेण व मूत्र हे खत म्हणून उपयोगी पडते. ती मेल्यावरही तिचे कातडे आपल्या उपयोगी पडते.

गंगामाता - नदीमाता. पिण्यासाठी, शेतीसाठी हिच्यामुळेच पाणी मिळते. तिच्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला ती श्रीमंत-गरीब, लहान-मोठा हा फरक न करता, मदत करते.

गीतामाता - श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली त्यांत, आपण कसे जगावे हे सांगितले आहे.

गुरु - म्हणजे फक्त शाळेत शिकवणारे शिक्षकच नाहीत, तर ज्यांच्याकडून आपल्याला काही शिकायला मिळते ते सर्व गुरूच आहेत. दत्तात्रेयानीही मुंगी, पतंग असे २४ गुरु केले होते.

एका संतकवीने -कबीरांनी तर देवापेक्षाही गुरूला श्रेष्ठ मानले आहे. ते म्हणतात, "गुरु गोविद दोउ खडे, काके लागू पाव?" गुरु व ईश्वर दोघेही समोर उभे असताना आधी कोणाला वंदन करायचे? पण ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांना ताबडतोब मिळते. ते म्हणतात, " देवाला आधी वंदन करून त्याला श्रेष्ठ मानले तर आपल्यावर फक्त देवाचीच कृपा होईल. पण गुरूला वंदन केले तर मात्र गुरूची कृपा तर होईलच पण गुरूच आपल्याला देवाची भेटही घडवून आणेल. म्हणून गुरु हाच देवापेक्षा श्रेष्ठ आहे. राष्ट्रसेविका समितीने भगव्या ध्वजाला गुरु मानले आहे.

ज्यांची आपल्याला मदत होते, ज्यांच्यामुळे आपण घडतो, त्यांची जाणीव आपल्या मनात सदैव राहते, रहायला हवी व तो भाव आपण व्यक्त करायचा म्हणजे त्यांना वंदन करायचे, आपली कृतज्ञता व्यक्त करायची. या लीनतेने प्रसन्न होऊन ते सदैव आनंदाने आपल्या पाठीशी उभे राहतील, मार्गदर्शन करतील व यशही देतील.

पण याचबरोबर हेही लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला जे मिळाले ते फक्त आपल्यापुरतेच न ठेवता पुढच्या पिढीला ते द्यायचे आहे.