अध्यात्म स्वरूप
अध्यात्मस्वरूप- चौथा व सहावा श्लोक
त्वं वाड:मय: -
जे लिहिले जाते त्याला साहित्य म्हणतात. जे साहित्य अमर होते त्याला वाड:मय म्हणले जाते. वाड:मय ह्या शब्दामागे बव्हंशी ’अक्षर’ हे विशेषण आलेले असते. वाचस्पती म्हणतात," ज्या वाणीला ईशतत्वाचा स्पर्श झालेला असतो ते अक्षर वाड:मय.
वाड:मय=वाक +मय. मय शब्द सुचवतो तल्लीनता, विलीनता. सर्व वाड:मयात तू व्याप्त आहेस. आपल्या लक्षात येईल की अक्षरवाड:मयाच्या प्रारंभी गणेशवंदन आहे.
त्वं चिन्मय: -
चित+मय. चित=चैतन्य. तू चैतन्यमय आहेस. तू ह्या विश्वाची चेतना आहेस. चैतन्य नष्ट झाले की जडत्व येते.
त्वं आनंदमय: त्वं ब्रम्हमय: -
आनंद हा विविध प्रकारचा व स्तरावरचा असतो. साधारणपणे लक्षात येते की अपेक्षापूर्ती झाली की आनंद होतो. अपेक्षा या परिस्थिती, उद्दिष्ट, क्षमता यावर अवलंबुन असतात. तैत्तिरीय उपनिषदातील वर्णनानुसार आत्मज्ञान प्राप्त झालेल्या मनुष्यानंदाच्या ९०० पट आनंद म्हणजे ब्रम्हानंद होतो.
ब्रम्हाचे वर्णन ’नेति नेति' असेच करावे लागते. वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. ब्रम्हाच्या तुलनेसाठी काहीच सापडत नाही.
त्वं सच्चिदानंदा द्वितियोसि -
सत+चित+आनंद+अद्वितिय.
सत, चित, आनंद ह्या तिन्ही चैतन्यमय गोष्टी प्राप्त केलेला तुझ्यासारखा दुसरा कोणी आढळत नाही. शंकराचार्य म्हणतात, "चिदानंदरूपं शिवोsहम् । "
सत=शाश्वत सत्य, चित=चैतन्य!
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि-
विज्ञान=विशिष्ट ज्ञान. म्हणुन साधारणतया ज्ञान हे आत्मस्वरूपाचे तर विज्ञान हे भौतिक वस्तुसंबंधी असे मानतात. ज्ञानासाठी सद्गुरूला शरण जावे लागते. तेव्हाच,
" ज्ञामिन: तत्वदर्शिन्:उपदेक्ष्यन्ति " व ते ज्ञान प्राप्त होईल.
त्वं गुणत्रयातीत: -
त्रिगुण- सत्व, रज, तम. या त्रिगुणांनी सर्व जग व्यापलेले आहे. अन्न, आनंद, यश, वृत्ति, धन, ज्ञान, कृती सगळ्याच गोष्टी त्रिगुणाबाधित असतात. तू मात्र त्या वर मात केली आहेस.
देह्त्रयातीत:,कालत्रयातीत,मूलाधारस्थितोसि नित्यं-
स्थूल, सूक्ष्म, कारण देह व भूत, वर्तमान, भविष्य काल यावर तू विजय मिळवला आहेस. मूलाधाराचे वर्णन वाणी वर्णनावेळी आले आहेच.
त्वं शक्तित्रयात्मक: -
उत्पत्ति, स्थिति, लय या शक्ति. ह्यांचे वर्णन अधिदैवत वर्णनात आहे.
त्वाम् योगिनो ध्यायन्ति नित्यम् -
योगी सर्वदा तुझेच ध्यान करतात. योगी-आत्मौपम्येन सर्वत्र सम य:पश्यति स:योगी।
आत्मैकभावाने सर्वांना सम मानणारा तो योगी. अर्थात ही स्थिती प्राप्त करायला त्याला बराच काळ लागला, बराच प्रयत्नही लागला. सद्गुरूकृपा प्राप्त करावी लागली. पण मनाची ही स्थिति कायम ठेवण्यासाठी ते योगी तुझेच ध्यान करतात.
त्वं ब्रम्हा........ स्वरोम् -
ब्रम्हा, विष्णु, महेश- उत्पत्ति, स्थिति, लय करणारे. इंद्र- सेनापती अर्थात संरक्षण, पराक्रम.
अग्नि- उष्णता देणारा
वायू- हवेशिवाय जीवन नाही.
सूर्य- प्रकाश व उष्णता दाता.
चंद्र- औषधी निर्माता
भू- पृथ्वी
भुव:- अंतरिक्ष
स्व:- स्वर्ग
ओम- वाक् चा प्रथम उच्चार या सर्व सामर्थ्याने युक्त आहेस.
फलश्रुति-
(एतदथर्व..पासून) या अथर्वशीर्षाचे जो पठन करतो तो ब्रम्हस्वरूपी लीन होतो. (पठन=वाचन+पाठांतर+अर्थ समजणे +म्हणणे )
अनेक वेळा वाचल्यानंतर पाठ होईल. पाठ करण्याकडचे लक्ष कमी होईल व ते आपोआपच अर्थ समजून घेण्याकडे वळेल. अर्थ समजला की काय करायचे आहे ते कळेल. पुन्हापुन्हा म्हणण्याने तशी कृती होऊ लागेल.
विघ्न-पाप-दोष-
(अ) विघ्न म्हणजे संकट, जे विविध स्वरूपाचे असते.
१)नैसर्गिक आपत्ती- यात वादळ, पूर, भूकंप, हिंस्त्र पशूंचे आक्रमण वगैरे गोष्टी येतात.
२)शारीरिक आपत्ती- यात दुर्बलता आजार यांचा समावेश होईल
३) मानसिक आपत्ती- मन एकाग्र न होणे.
(आ) पाप- समाज सुचारूरूपाने चालावा यासाठी नीतिनियम असतात. त्यांच्या विरुद्ध वागणे म्हणजे पाप.
(इ)- दोष- शारीरिक, मानसिक, बौद्धिक दोषांबरोबरच कृती करताना होणाऱ्या चुका यात गणल्या जातील. उदा. स्पष्ट व योग्य उच्चार न होणे, विस्मरण होणे, एखादी गोष्ट राहून जाणे, योग्य प्रकारे कृती न होणे.
या सर्वांपासून मुक्तता होते असे फलश्रुतीत सांगितले आहे.
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति --
म्हणताना कधीकधी वाटते हा पाप करण्याचा जणू परवानाच आहे. पाप करा व ते नष्ट करण्यासाठी अथर्वशीर्ष म्हणा असा वरवर अर्थ त्यातून निघतो. पण ’पाप’ हा शब्द न कळता घडून गेलेले पाप ह्या अर्थी वापरला आहे. उदा. माता आपल्या अपत्याला कधीकधी मारते. हेतु चांगला असला तरी मारणे ही एक प्रकारची हिंसाच असते. अशा पापापासून मुक्त्तता मिळेल.
स सर्वत: सुखमेधते -
दाही दिशांकडून सुखच प्राप्त होइल. खरे तर सुख ही कल्पनादेखील सर्वांची सर्व वेळी एक असत नाही. सुख हे परिस्थिती, आवश्यकता, सुखसंकल्पना व परिणाम यावर अवलंबुन असते. थंडीत शेकोटी तर उन्हाळ्यात पंखा, भुकेलेल्याला अन्न तर गरीबाला धन, रोग्याला निरोगीपणा असे सुखाचे प्रकार परिस्थितीवर अवलंबून असतात. सुख हेही चार प्रकारचे असते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक.
धर्मार्थकाममोक्षंच विंदति-
मनुष्यजीवनाचे नियोजन चार आश्रम, चार पुरुषार्थ, व चार मुक्तिंमधे केलेले आहे. धर्म, अर्थ, मोक्ष व काम हे चार पुरुषार्थ प्राप्त होतात.
अशिष्याय न देयम् -
ही धोक्याची सूचना दिलेली आहे. ’शिष्य’ विषयी विचार आपण रक्षासूत्राच्या वेळी केलेला आहे. हे म्हणताना आठवते ती गोकर्ण महाबळेश्वर कथा! रावण शंकरभक्त होता. त्याला भोळ्या शंकराने आत्मलिंग काढून दिले. मुळात दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाच्या हातात ही अमोघ शक्ती गेली तर विश्वाचा नाश होईल हे जाणून श्रीगणेशाने युक्तीने ते त्याच्या हातातून काढून घेतले.
अणू विस्फोटातून निर्माण होणाऱ्या उर्जेचा उपयोग जेव्हा अणूबॉंब बनवण्यासाठी केला गेला तेव्हा त्यातून विनाशच घडला. सर्व पाप तापांचा नाश करणारी ही शक्ती अशिष्याच्या हाती दिली जाऊ नये अशी स्पष्ट सूचना म्हणूनच करावी लागली.
यो यदि मोहात् दास्यति-
इथे मानवी स्वभावाचे अचूक वर्णन केले गेले आहे. मोह हा फक्त पैशांचाच
असतो असे नाही. सत्ता, पद, गौरव, शारीरिक मानसिक सुख कशाचाही होऊ शकतो. मोहाने असे केले तर ’स:पापीयान् भवति ’- अथर्वशीर्ष पापनाशक असूनही पापकारक होईल.
पठन कसे करावे याबद्दल काही सुचना आहेत. सहस्त्र आवर्तने करावी. आवर्तनांबरोबर अभिषेक करावा. चतुर्थीच्या दिवशी न खाता पाठ करावेत. दुर्वांचा होम करावा. लाह्या,समिधा व तूप-सहस्त्रमोदक यांनी यजन करावे. आठ ब्राम्हणांनी एकत्र येऊन करावे. सूर्यग्रहणाचे वेळी, महानदीच्या काठावर, गणपती मूर्तीजवळ याचा पाठ करावा वगैरे. यामुळे उत्तम वक्तृत्व, विद्यावंतता, ब्रम्हाची जाणीव होणे, सर्व भयांपासून मुक्तता होईल, यशवंत व्हाल, इच्छित फळ प्राप्त होइल, सूर्यासारखे तेज प्राप्त होईल, सर्वज्ञ व्हाल इत्यादि फळ सांगितले आहे.
दुर्वा- औषधी गुण आहे. शीतलता व वंशवृद्धी उपयुक्तता आहे. कुठेही जोमाने वाढ होते हा नैसर्गिक गुण आहे. पहाता पहाता दुर्वांचे बेट तयार होते, ही आहे संघटनकुशलता. त्याचबरोबर त्या बेटात अनेक मुळे तयार होतात हे आहे कामाचे व जबाबदारीचे विकेंद्रीकरण व नवनेतृत्वनिर्माण!
२१ दुर्वांची जुडी बांधायची पण वहाताना मात्र ती सोडून वहावयाची. त्यांची देठे मागे तर अग्रे साधकाकडे अशी पद्धत आहे. २१ चे महत्व मागे आले आहे. अग्रभागी तीन टोके असतात. देहकाल अवस्था,गुण त्रयातीत: असे वर्णन मागे केले आहेच.
लाह्या-
साळी, ज्वारी, बाजरी, राजगिरा वगैरे धान्य तापले की त्याच्या लाह्या बनतात. धान्य कोणत्याही रंगाचे असले तरी त्याची लाही मात्र फिकट पांढुरक्या रंगाची असते. मूळ धान्यकणापेक्षा आकाराने मोठी, वजनाला हलकी व पचायला सोपी असते. औषधी गुणही असतो.
मोदक-
मोद+क- आनंद निर्माण करणारा. आतल्या गोड सारणाला कठीण कवच धारण करून रक्षणारा. विविधतेतून एकता या भावाचे दर्शन स्वत:च्या रूपातून घडवणारा, गजाननाला अत्यंत प्रिय असणारा.
समिधा-
’वन्हि तो चेतवावा रे' हे ध्येय उराशी बाळगून स्वप्राणांचे समर्पण करणे हे व्रत आचरणाऱ्या या समिधा. ’अग्नये स्वाहा इदं न मम' हाच संदेश देतात.
शेवटी आहे य एवं वेद। इत्युपनिषद।
उपनिषद हा वेदांचा भाग होय. अथर्वण वेदाचा अथर्वशीर्ष हा एक भाग आहे. अपेक्षा काय? ओम सहनाववतु-मागणे आहे ते एकट्यासाठी नाही. नौ-दोघे गुरू व शिष्य- पण अंतर्भूत आहे सर्व समाज! पराक्रमी, विद्वान, तेजस्वी व्हावा, द्वेषापासून मुक्त असावा, सर्वत्र शांतीचे राज्य असावे. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक सर्व प्रकारची शांती लाभावी.
॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥