शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

                                        
ऋण संकल्पना
       ऋण हा शब्द कानावर पडताच चार्वाकाची  ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत ‘ अन पाठोपाठच ‘ ऋण काढून सण  साजरा करू नये ‘ हा समाजव्यवस्थेसाठी केलेला नियम आठवतो . भोगवादी प्रवृत्ती व संयमाची आवश्यकता परस्परांसमोर उभ्या ठाकतात . घरातील ज्येष्ठ मंडळी  सांगत असतात,” कोर्टाच्या पायरीप्रमाणेच सावकाराची पायरीही कधी चढू नये “
      आज मात्र जमाना बदललेला आहे . गाडीसाठी ,घरासाठी कर्ज काढणे हे सर्वमान्य झाले आहे ,नव्हे .. काही अंशी कौतुकाचेही झाले आहे .
      योगायोग असा की ऋण संकल्पना मांडणे ही मात्र खरोखरच गौरवाची गोष्ट आहे . ऋण काढणे वेगळे व ऋण असणे वेगळे . ऋण मानणे व ऋणाची फेड करण्यासाठी तत्पर असणे ह्या गोष्टी मानवाच्या मानवतेचाच प्रत्यय देतात .  इतर सजीवांपेक्षा ईश्वराने मानवाला एक वेगळी व महत्वाची गोष्ट बहाल केली आहे . ती म्हणजे बुद्धी ! ( अगदी सहज लिहिल्या गेलेल्या ह्या वाक्यातही ईश्वराचे मानवजातीवर असलेले ऋणच व्यक्त होत आहे .)
        ही  चराचर  सृष्टी  ‘एकोsहं बहुस्याम ‘ या प्रेरणेमुळे निर्माण झाली असे म्हटले जाते . एकातून अनेकत्व निर्माण व अनेकातून एकत्वाचा अनुभव प्राप्त होण्यासाठी परस्पर सहकार्याची आवश्यकता असते हे आपल्या लक्षात येते . काहीतरी चांगले निर्माण करण्यासाठी , परस्परांची आवश्यकता जाणून ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या भावनेने एकमेकांची मदत करत सर्वांनी  सर्वांचा विकास घडवून आणणे ह्या ‘स्वाभाविक ‘ प्रवृत्तीमुळेच ह्या सृष्टीचा व्यापार युगानुयुगे व्यवस्थितपणे चाललेला आहे . ‘स्वाभाविक’ ( प्रवृत्ती ) हा शब्द हेतुपूर्वकच वापरला आहे कारण सहकार्य भाव हा सर्वच जीवसृष्टीत,निसर्गात,स्वभावदत्तच आहे असे स्पष्टपणे  अनुभवास येते. ‘एकमेकां साह्य करू । अवघे धरू सुपंथ रे “ ह्या वृत्तीने सृष्टीतील जीवन अखंड चालू आहे व अधिकाधिक समृध्द होत आहे .
         शेळ्यांच्या कळपात वाढलेला सिंहाचा बछडा बें बें करतो व दुसऱ्या सिंहाची गर्जना ऐकल्यावर पळत सुटतो . लहानपणीच लांडग्याने पळवलेले मानवाचे अर्भक हातांचा उपयोग पायांसारखाच करते ह्या गोष्टीवरून समाजाकडून आपोआप घडणाऱ्या संस्कारांचे महत्व लक्षात येते . अनुकरण ही सजीवांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे म्हणूनच आपण जे काही चांगले आहोत त्यात ज्यांचा ज्यांचा हातभार लागलेला असतो , त्यांचे आपल्यावर ऋणच  असते हे लक्षात ठेवायला हवे. जननी ,जल , जमीन ,जंगल ,जनावरे ,शिक्षक,पालक,वैद्य ,शिंपी ,लोहार, कासार ,सोनार,कुंभार,न्हावी ,सुतार,शेतकरी,चांभार,सेना,ग्रंथ,इतिहास,संस्कृती असेच कितीतरी सजीव व निर्जीव ह्यांच्या सहकार्याने आपले जीवन सुसह्य होत असते हे लक्षात घ्यायला हवे व लक्ष्मीची ,झाडाची पूजा असेल वा अन्न शिजवणाऱ्या चूल ,शेगडीला नमस्कार असेल.
     फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य ,समता,बंधुता ह्या त्रयींचा उद्घोष केला तर ‘अवघे विश्वचि माझे घर ‘व ‘सर्वे अपि सुखिन: सन्तु ‘हा उदार भाव भारतीयांनी प्रसारित केला .  सागरावर निर्भय संचार इंग्लंडने रूढ केला .  असह्य छळामुळे विविध देशांतून आलेले व अमेरिकेत स्थायी झालेले लोक एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेने काम करू लागले व संपन्न झाले . वैज्ञानिक प्रगतीत अग्रेसर झाले . हिरोशिमा नागासाकीच्या प्रचंड नरसंहारा नंतर थोड्याच वर्षात जपान जिद्दीने उभे राहिले . इटलीच्या जोसेफ माझीनीच्या चरित्राने भारतीयांना पारतंत्र्याविरुध्द लढण्यास ठाम उभे केले .  अशा अनेकानेक परस्पर प्रभावी घटनांतून मानवी जीवनाला आकार प्राप्त होत आहे . या गोष्टीची जाण  ठेवायला हवी . आज वैज्ञानिक शोधांमुळे जग जवळ आले आहे  व म्हणूनच विश्वातील सर्वच राष्ट्रांच्या भल्या बुऱ्या गोष्टींचा प्रभाव परस्परांवर पडत आहे . चांगले ते स्वीकारण्याच्या भारतीयांच्या पध्दतीमुळे अन्य राष्ट्रांचेही ऋण आपल्याला मानायला लागेल .
        हे लक्षात घेणे व त्याची जाण ठेवणे म्हणजेच त्या त्या गोष्टीचे आपल्यावर असणारे ऋण मानणे  होय . भारतीय संस्कृतीने पाच ऋणे प्रधान मानली आहेत . मातृ ऋण ,पितृ ऋण ,गुरु ऋण ,समाज ऋण व देव ऋण !
आमचा दिवस उगवतो ,’कराग्रे वसते लक्ष्मी ‘ह्या श्लोकाने !संपूर्ण दिनचर्येत अशा अनेक ऋणांची जाण आपल्याला आहे हे लक्षात येते .  
       गुरुपोर्णिमा ,नागपंचमी ,पोळा ,रथसप्तमी ,गायत्री मंत्र पठण ,वसंत पूजा ,वट पूजा ,पितृ पक्ष,नवरात्र ,दीपपूजा अशा सणांतूनही ऋण व्यक्त केले जाते हे लक्षात येते .  साजऱ्या  केल्या जाणाऱ्या जयंती व पुण्यतिथी ह्या मधून त्या त्या विशिष्ट व्यक्तीने केलेल्या कार्याचे ऋण प्रगट  होत असते .
         ऋण जाणणे ,मानणे व व्यक्त करणे एवढ्याने आपले कर्तव्य पुरे होत नाही तर त्यातून मुक्त कसे व्हायचे हे पहावे लागेल .” मला छान  आंबे खायला मिळाले . “Thank you baba,ajoba” एवढ्याने काम भागणार नाही . त्या वृक्षाची निगा तर राखावी लागेलच पण पुढच्या पिढ्यांसाठी नवी झाडेही लावायला हवीत . आयुष्यात आपल्याला जे जे चांगले मिळाले ते ते पुढच्या पिढीत संक्रमित करायला हवे . मग ते ज्ञान असेल,विज्ञान असेल,धन असेल,शारीरिक सामर्थ्य असेल ,मानसिक आरोग्य असेल वा ऐतिहासिक श्रेष्ठत्व असेल .
          ऋण संकल्पना व कृतज्ञता भाव यात काही फरक आहे का असा विचार चमकून जातो . मला वाटते असलाच फरक तर तो एका तसूएवढाच असेल . कृतज्ञता उच्चारताच आठवतात उपकार . मन लहानपणी ऐकलेली एक कविता गुणगुणू लागते . “थोर तुझे उपकार आई “ लहानपणी त्या कवितेतल्या भावांशी मन एकरूप झाले होते हे ही आठवते . “आई “ झाल्यानंतर मात्र असे जाणवले की ह्या शब्दांत कुठेतरी एक शतांश कण  का होईना दुरावा आहे . माझ्या लहानपणी ‘आई ‘ हे संपूर्ण समर्पण होते . नंतरच्या  काळात त्या ‘आईत्वात’ कुठेतरी ‘व्यक्तित्व ‘डोकावू लागले होते . आता त्या व्यक्तित्वाने हात पाय पसरले आहेत व ‘आईत्व ‘ ही कायम आहे . कळत नकळत का होईना त्याची फरफट चालू आहे .
           पूर्णवाद प्रणेते डॉ . पारनेरकर ह्यांनी ‘उपकाराची परतफेड ‘ ह्या विषयावर विचार व्यक्त करताना म्हटले आहे ,”दुसऱ्याने  जे केले त्याची तशीच परतफेड करायची तर कृतघ्नपणा पदरी येईल . ज्याने ‘वार’ लावून स्वतः चे शिक्षण केले त्याला तशीच परतफेड करण्यासाठी , त्याला जेवू घालणाऱ्यावर वार लावायची वेळ यावी अशी इच्छा बाळगावी लागेल “ म्हणून परतफेड तशीच करायला हवी असे नव्हे तर कृतज्ञता बुद्धी असावी व ती मनापासून असावी . त्यांनी पुढे म्हटले आहे ,” आपल्यासारखेच अनेकांवर त्यांचे उपकार होत राहोत अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करावी .
      संक्रांतीच्या वाणात  ‘वाढता वसा’ हा एक प्रकार आहे . आपल्याला जे वाण मिळाले त्याच्या सव्वा पट दुसरीला द्यायचे . येथे ऋण संकल्पनेत  दान संकल्पनेचाही  समावेश झालेला आहे .
       ‘आभार प्रदर्शनाची’ पध्दत मूलत: आपली नाही . ऋणाची जाणीव आहे हे नमस्काराने दर्शित केले जायचे . आजकाल समारंभानंतरच्या आभारप्रदर्शनात ‘ त्यांच्या आम्ही सदैव ऋणातच राहू ‘असे म्हणायची ‘पध्दत ‘पडली आहे . त्या वेळी म्हणावेसे वाटते ,” ऋण जाणा पण त्यातच न रहाता ‘ जे जे चांगले आहे त्यात भर घालून पुढच्या पिढीला द्या ‘ तरच खरे ‘ ऋणमोचन ‘ होईल .
          राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रचारकाने ‘ ऋणमोचन’ नावाची पुस्तिका लिहिली आहे . संघ प्रचारक म्हणजे स्वतः चे सारे जीवन समाजासाठी खर्च करणारी व्यक्ती ! अनेक संकटे ,अडचणी ,समस्या यातून मार्ग काढत त्या सर्वांवर मात करत विकास व प्रगती यांचे कडेच अग्रेसर होत राहणे हेच त्यांचे जीवन !! स्वतः च्या त्यागाचा ‘उदो उदो ‘ तर नाहीच पण नुसता उल्लेखही न करता त्या जीवनात ज्यांचे ज्यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणावर लाभले ते समाजासमोर मांडणे हे आपले कर्तव्य आहे ह्या भावनेतून पुस्तिका साकारली आहे . आपल्या ऋण संकल्पनेची सार्थ अशी ही एक छोटीशी झलकच आहे .
     विशेषता: आजच्या ‘ वापरा व फेकून द्या ‘ च्या जमान्यात ऋण संकल्पना अधिक दृढ करायला हवी हे नक्कीच !

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

संक्रांती

                                                                    संक्रांती

 १) परिवर्तन-बदल - जसजसा काळ पुढे सरकत असतो तसतसा प्रत्येक वस्तूत बदल घडून येतच असतो . फुल कोमेजते , सुकते . फळे व भाज्या शिळ्या दिसतात . कापड जीर्ण होते . घासून ठेवलेली भांडीही न वापरता मळकी  होतात .  हा बदल सावकाशीने होत असतो . समाजातही असाच सावकाशीने बदल होत असतो . पण काळाच्या एका टप्प्यानंतर विचार केला तर तो जाणवतो .
२) क्रांती- एकदम वेगाने झालेला बदल -
    अ)  लष्करी क्रांती- तिची तयारी आधीच असते , पण परिणाम वेगाने दिसतो .
    आ) औद्योगिक क्रांती- नवनवे शोध , त्यामुळे उत्पादनात वाढ व उत्पादनाचा साठा , त्याच्या विक्रीसाठी बाजारपेठांचा शोध , परिणाम वसाहतवाद व अनेक देश पारतंत्र्यात पडतात .
   इ) फ्रेंच राज्यक्रांती - वाढता असंतोष पण एकदम उठाव झाला . लुटालूट ,जाळपोळ ,कत्तली वगैरे घडून राज्यसत्ता दुसऱ्याच्या हातात गेली . स्वातंत्र्य , समता , बंधुत्वाचा उद्घोष झाला . पण प्रत्यक्षात फारसे काहीच उतरले नाही .
३) उत्क्रांती -विकास . पण उत्क्रांतीचे उद्दिष्ट काय ह्यावरच ती चांगली किंवा वाईट ठरते . चांगल्या दिशेने विकास झाला तरच त्याला उत्क्रांती म्हणतात . उदाहरणार्थ , आज जे नवनवे शोध लागले आहेत ,त्यातीलच अणू विभाजनातून उर्जा मिळते हा एक शोध . चांगल्यासाठी उपयोग करणे शक्य व तेव्हाच ती उत्क्रांती . पण प्रथम तरी अणू विभाजनाच्या शक्तीने बॉम्बच बनला .
४) संक्रांती  म्हणजे सम्यक क्रांती . एका निश्चित ,समाजकल्याणाच्या दिशेने , विचारपूर्वक घडवून आलेला व घडून आलेला बदल म्हणजे संक्रांती .  स्वार्थाकडून विश्व कल्याणाकडे होणारी वाटचाल म्हणजे संक्रांती . प्राचीन काळापासून भारतात संक्रांती ही विशिष्ट दिशेने झालेली आहे . व्यष्टी ,समष्टी ,सृष्टी व परमेष्टी म्हणजेच व्यक्ती <  कुटुंब < समाज <राष्ट्र <विश्व <चराचर सृष्टी <परमेष्टी (चरम साध्य )
५) मकर संक्रांती - सूर्याचे भ्रमण बारा राशीतून होत असते . प्रत्येक महिन्यात एक संक्रांती येते . चंद्राच्या आकाशातील स्थितीवरून तिथी  ठरतात . सूर्योदय व सूर्यास्त ह्या मधील काळ व ती तिथी यांचा संयोग ज्या प्रकारे होईल त्या वरून तिथींचा क्षय व वृध्दी होते .  पृथ्वीवरील कालगणना त्यावर अवलंबून असते . म्हणजेच प्रत्येक महिन्यातील संक्रांती ही चंद्र ,सूर्य व पृथ्वी ह्या सर्वांशी संबंधित असते . चंद्र  पृथ्वीभोवती व पृथ्वी सूर्याभोवती फिरते . दिवस ,रात्र , ऋतू ह्या मुळेच घडतात . पृथ्वीच्या भ्रमणामुळे व तिचा आस तिरपा असून कलल्यासारखा वाटत असल्यामुळे सूर्य उत्तरेकडे वा  दक्षिणेकडे सरकल्यासारखा वाटतो .  
         जेव्हा तो दक्षिण गोलार्धातील मकर वृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिवस मोठा होऊ लागतो . दिवस मोठा म्हणजेच जास्त वेळ प्रकाश,उष्णता , काम करायला अधिक वेळ उपलब्ध . स्वाभाविकच उत्तर गोलार्धात असलेला भारत ( भा : रत - म्हणजेच तेजाचा उपासक ) ह्या गोष्टीचे आनंदाने स्वागत करतो व मकर संक्रांती थाटामाटाने आनंदाने साजरी केली जाते .  मकर संक्रांतीची ही नैसर्गिक ( निसर्गानुसार ) उपपत्ती झाली .
        संक्रांती शब्दाचा अर्थ पहात असताना आपण म्हटले आहे, विश्व वा समाज कल्याणाच्या दृष्टीने घडवून आणलेला बदल . - अशी उदाहरणे आपल्या इतिहासात पानोपानी आहेत .
             चाणक्य -भारत राष्ट्रात आपण व  जास्तीत जास्त आपले राज्य ह्याचाच विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती . राष्ट्रावर होऊ घातलेले परकीय आक्रमण थोपवणे व आपले राष्ट्र सुरक्षित राखणे हा विचार राज्यकर्त्यांच्या मनात येत नव्हता . शेजारचे राज्य आक्रमणाला बळी पडले तरी उद्या आपल्यावर तीच वेळ येईल हा विचार , स्वार्थात व उपभोगात बुडालेल्याना सुचत नव्हता . जात्यातले रडत होते पण त्यांच्या किंकाळ्यांनी सुपातल्याना जाग येत नव्हती . परिणामत: संपूर्ण राष्ट्र परक्यांच्या टाचेखाली चिरडले जाइल अशी शक्यता निर्माण झाली होती . ही स्थिती बदलायला हवी होती . अशा वेळी ज्याच्या हाती सत्ता नाही ,धन नाही पण होते एकच खंबीर मन व स्वातंत्र्य रक्षणाचे ध्येय .  अशा आर्य चाणक्याने प्रयत्नपूर्वक राष्ट्र एक केले . राष्ट्राच्या इतिहासातील ही एक महत्वाची संक्रांत .
       आद्य शंकराचार्य - राष्ट्राच्या ,समाजाच्या,व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार चालूच असतात . एका कवीने म्हटले आहे ,” पुर्णोत्थापन काल तोच पतन प्रारंभ ही होतसे “ उत्कर्षाची स्थिती प्राप्त होते ,काही काळ टिकते , मग तिचा हळूहळू ऱ्हास होऊ लागतो .
       असाच एक काळ आला . समाजात पंथोपपंथ निर्माण झाले . अर्थात समाजाच्या जिवंतपणाचेच हे लक्षण होते . पण हळूहळू या पंथात स्वत:च्या मोठेपणाचा अभिनिवेश निर्माण झाला व त्याची परिणिती एकमेकांवर आघात करण्यात झाली . समाजात फुटीरता आली . संपूर्ण समाजाचा विचार लोप पावला . पंथाभिमानाने इतरांना नुसते क्षुद्रच नव्हे तर शत्रूस्थानी मानले जाऊ लागले . आत्यंतिक अहिंसेच्या कल्पनेने समाज दुर्बल झाला . जीवनाचा योग्य आस्वाद घेत ‘मुक्तीकडे वाटचाल ‘ ही कल्पना दृष्टीआड झाली . भौतिक व अध्यात्मिक विचारातील परस्पर पूरकता नाहीशी झाली . जीवनाबद्दल अरुची निर्माण झाली . समाजात निराशा मातली . जीवनापासून पलायन हेच मोठेपणाचे लक्षण मानले जाऊ लागले . मातृस्थानींची स्त्री पापाची राशी बनली .
      समाजाची विनाशाकडची वाटचाल रोखायला केरळ मधला एक युवक पुढे आला . संबंध भारतात पायी भ्रमण करून त्याने समाजाला योग्य दिशा दाखवली . अध:पतन थांबले . विकासाकडे दृष्टी वळली . आम्ही सर्व एक हा भाव निर्माण झाला . विश्व शक्ती व क्षात्र शक्ती एक झाली . हे सर्व ज्याने घडवून आणले तो नामानिराळा राहिला . . हे सर्व घडविता करविता होता एक शंकर . ‘ शं करोति इति शंकर:’ कल्याण करणारा तो शंकर आणि हा शंकर म्हणजे आद्य शंकराचार्य .
      आणखी कितीतरी  वर्षे लोटली . पुन्हा एकदा भारत परक्यांच्या टाचेखाली तुडवला जाऊ लागला.क्रौर्याची ,अन्यायाची परिसीमा झाली . जीवनाची शाश्वती उरली नाही.पाण्याला नदीवर गेलेली स्त्री घरी सुखरूप येईल ही  खात्री राहिली नाही.शेतातील धान्य कापले जाइल ही टांगती तलवार सदैवच होती . भर दरबारात रक्ताचा सडा पडू लागला . भ्रष्टाचार व लांगुलचालन यांचे राज्य स्थापन झाले.स्वाभिमान हा शब्द कोशातून नाहीसा झाला व एक माता खंबीरपणे उभी राहिली . शिवाईला प्रार्थना केली गेली.कर्तव्यमार्गावर पाउलवाट निर्माण झाली.  जोडीला ‘जय जय रघुवीर समर्थ’ हा घोष निनादला अन छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापले . समाधानाचे उद्गार निघाले,”उदंड जाहले पाणी ,स्नानसंध्या करावया “ !
        पुन्हा एकदा अशाच दुर्बलतेच्या ,विस्मृतीच्या क्षणी शिकागोमध्ये उमटला हिंदू धर्माचा जयजयकार ! माझाच देश संपूर्ण विश्वाला शांततेचा ,कल्याणाचा मार्ग दाखवू शकेल,दाखवेल असा विश्वास प्रभावीपणे मांडला गेला . ‘ धारयति इति धर्म: “हे सांगून पंथोपपंथांच्या आचार्यांच्या माझाच पंथ (ज्याला ते धर्म मानत होते ) श्रेष्ठ ह्या दुराभिमानाला छेद दिला गेला .
       ब्रिटीश गेले . राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले पण मानसिक गुलामी अंमल चालवतच होती . या गुलामीतून वर निघण्यासाठी ,हिंदूंचा स्वाभिमान जागवण्यासाठी ,त्यांना संघटीत करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले . रोग बरा होण्यासाठी नव्हे तर तो समूळ नष्ट व्हावा म्हणून ‘संघे शक्ती कलौयुगे ‘ हे ओळखले गेले . डॉ. हेडगेवारांनी त्या साठी प्रयत्न केले .
        भावी तेजस्वी राष्ट्राचे स्वप्न स्त्रियांच्या मनामध्ये वं . लक्ष्मीबाई केळकर यांनी उभे केले . स्त्री स्वत:ची शक्ती विसरली होती.त्या शक्तीला जागृत करून स्त्रियांना स्वसंरक्षणक्षम व संघटित करण्यासाठी राष्ट्र सेविका समिती स्थापन झाली . सातत्याने  कार्यरत असणारी ही समिती भारतातच नव्हे तर विदेशातही पोचली आहे .  
        अशाच अनेक संक्रांती भारताने अनुभवल्या आहेत . एका वर्षात बारा राशी ओलांडून संक्रमण करणारा सूर्य या राष्ट्रावर वर्षानुवर्षे तेजाने तळपत आहे . आज भारताला दहशतवादाला तोंड द्यावे लागत आहे . तरीही फक्त स्वत:पुरता विचार न करता या वैश्विक समस्येला तोंड देण्यासाठी तो कटिबध्द होत आहे . एका नव्या संक्रमणाची सुरुवात झाली आहे .
       म्हणूनच ‘ जुने जाऊ द्या मरणालागुनी ,फोडुनी किंवा जाळूनी टाका ‘ असा आत्यंतिक विचार न करता ,समाजात दृढमूल झालेल्या नीतीमुल्यांवर  आघात न करता, वाईटाचा त्याग व चांगल्याचे उन्नयन घडवून आणून ,समाजजीवनात संक्रमण घडवून आणण्यासाठी कटिबध्द होऊ या . या अतीप्राचीन ,सातत्याने प्रवाहित राहिलेल्या व ‘’कृण्वन्तो विश्वमार्यम ह्या कर्तव्याने बध्द असलेल्या भारतीय संस्कृतीचा थोडासा अवरुध्द झालेला प्रवाह पुन्हा मुक्तपणे प्रवाहित करू या .
                                                              - सुशील अभ्यंकर .



                                                            श्रीमती सुशील अभ्यंकर
जन्म- ४ ऑक्टोबर १९२९
शिक्षण- बी .ए. बी.एड. राष्ट्रभाषा हिंदी कोविद
Matric ला गणितात विशेष प्राविण्य , बी.एड. ला प्रथम श्रेणी , कोविद- भारतात प्रथम
नोकरी - मुंबईला बँकेत नोकरी, संभाजीनगर येथे हायस्कूल शिक्षिका
लेखन- मराठी व हिंदीत अनेक पुस्तके ,वर्तमानपत्रातून लेखमालिका , अनेक मासिकातून स्फुटलेखन . काही पुस्तकांची इतर भाषांत भाषांतरे .  वन्दे मातरम ला शासनाचा खडू फळा योजनेत पुरस्कार .
वक्तृत्व- भारतभर हिंदी व मराठीतून सुमारे हजार विषयांचे प्रतिपादन .
रामायण , आद्य शंकराचार्य ,श्रीसूक्त ह्यावर ५/५-७/७ दिवसांची प्रवचने .
राष्ट्र सेविका समितीच्या विविध जबाबदाऱ्या , अखिल भारतीय बौध्दिक कार्यवाहिका ह्या नात्याने भारतभर प्रवास .
छन्द -विणकाम , वाचन .
------------------------------------------------------------------------------
हे सर्व लेख अन्यत्र प्रकाशित झालेले आहेत .