सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

वेचलेल्या विचार कणिका - भाग १

 वेचलेल्या विचार कणिका - भाग १

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


अथांग सागर अमृताने भरलेला मिळत असेल तर बुडायच्या भीतीने तो सोडून निघून जावे का? सुवर्ण डोंगर एवढा मोठा नको म्हणून तो टाकावा का? चिंतामणी जड म्हणून फेकावा का?

-------------------------


त्रिशंकू साठी विश्वा मित्राने केली प्रतिसृष्टी निर्माण, अगस्तीने सागर प्राशन केला. राम नामाने सागरावर पूल नलाने बांधला. जन्मताच हनुमानाने सुर्यबिबाकडे धाव घेतली. आपणही आत्मविश्वास बाळगून काम करूया. 

--------------------------------


तळ्यात कमळ असते व बेडूक असते. 

 भुंगा कमळातील मध चोखतो तर बेडूक चिखलात रमते. 

 तोंडात अमृताची चूळ आहे समोर मृगजला चे सरोवर दिसले तर ती थुकावी का?

गळ्यात परीस आहे, शिंपला मिळाला तर तो टाका्वा का?

विचार अभंग ज्ञानेश्वरीतील..  मी फक्त पाठवणारी!

---------------------------------------------------------


अदंभित्व. 

म्हणजे निज पुण्य बोलून न दाखवणारा. 

खोडकर गाय जसा पान्हा चोरते तसा, 

प्रौढ वेश्या जसे वय लपवते तसा, 

शेतकरी पेरलेले बी मातीने झाकून ठेवतो तसा, 

आपले दान व पुण्य झाकून ठेवतो. 

------------------------------------


अदंभित्व म्हणजे निज पुण्य बोलून न दाखवणारा.

 आजचा सुविचार 

किनारी पोचला नाहीत तोपर्यंत नाव सोडू नये. 

 केळीला फूल येण्याआधी ती तोडू नये,

 वस्तू दिसेपावेतो दिवा विझवू नये. 

-------------------------------------------


दंभ म्हणजे खोटा, अदंभ म्हणजे खरा. अदंभित्व म्हणजे खरे पणा. 

नागपंचमीच्या शुभेच्छा!

सुविचार

महासागरात मिळालेले नद्यांचे प्रवाह परत येत नाहीत. 

 तापलेल्या लोखंडावर पडलेले पाणी परत मिळत नाही. 

 मीठाची बाहुली पाण्यात पडली तर बाहुली परत मिळत नाही

 हे लक्षात ठेवावे लागते. 

-----------------------------------


अतिथीचा अपमान झाला तर पुण्य संपते. 

 धागा तुटला की कळसूत्री बाहुल्याचा नाच थांबला समजा. 

सूर्य मावळला की डोळे जणू बंद होतात. 

-----------------------------------------------------


दगडाला पाणी घातले तरी त्याला कोंब फुटणार नाहीत. 

भुजंगाने टाकलेल्या कातीला ला्थ मारली तर ती फडा उभारणार नाही. 

वसंत ऋतू आला तरी आकाशाला फुले येणार नाहीत. 

 राखेत तूप ओतले तरी अग्नी पेटणार नाही,

 तसेच कितीही प्रयत्न केले तरीही राग येत नाही. 

 या गुणाला अक्रोधत्व म्हणतात. 

-------------------------------------------


एक गीत

नभ मंगल हो जल मंगल हो

धरतीका कण कण मंगल हो

दिन मंगल हो निशा मंगल हो 

जीवनका हर क्षण मंगल हो

तन मंगल हो मन मंगल हो 

श्रमसे अर्जित धन मंगल हो 

सूर मंगल हो ऊर मंगल हो

वाणीका हर स्वर मंगल हो

मति मंगल हो गती मंगल हो

 मानवका हर काम मंगल हो

मोरारीबापूंनी मंगलबाबत सांगितले आहे. 

मं - मंत्र, ग- गगन, ल - लक्ष्य 

----------------------------------------


राजस दान 

दुभत्याच्या आशेने गाईला चारा घालावा,

आहेर मिळतील म्हणून सोयरे धायरे का्र्यास बोलवावे,

आधीच पैसे घेऊन मगच रोग्याला औषध द्यावे,

 परत फेड होऊ शकणार नसेल तेव्हा मात्र याचकाच्या हातावर मोठ्या कष्टाने एक दमडी ठेवावी,

 एक वेळची भूक भागणार नाही इतके थोडे अन्न ब्राह्मणाला द्यावे याला राजस दान म्हणतात. 

-------------------------------------------------------


भागवत पुराण

गुरूचे गुण

धरती- क्षमा, परोपकार

आकाश- अलिप्तता, अमर्यादपणा

पाणी- शुद्धता, पावित्र्य 

अग्नी- तेजस्विता, अपरिग्रह, संयम

चंद्र -रोज लहान मोठा होतो पण आत्मा तोच

समुद्र -धीरगंभीरता

-------------------------------------------


पतंग -अनासक्ती 

हरीण -वैयक्तिक वस्तूचा त्याग 

मासा- जीभेवर नियंत्रण आवश्यक

बालक- मानापमानाची चिंता नको

कुमारी- एकच बा्ंगडी म्हणून आवाज नाही 

मधमाशी- संग्रह वाया

--------------------------------------------------------


मेघ आकाशात असतात पण आकाश अलिप्त असते. 

लाकडे ज़ोडून घडवलेली होडी नावाडी पाण्यात सोडतात. 

वायूमूळे ती वेगाने जाते पण पाणी फक्त साक्षीभूत असते. 

 कुंभार मातीचा घडा बनवतो. माती फक्त आधारभूत असते. 

 तसा सर्व लोकव्यवहाराला सूर्य फक्त साक्षीभूत असतो. 

-------------------------------------------------------


राजपूत वीर रणांगणावर जायला निघाले की त्यांच्या भगिनी त्यांना ओवाळून हातात राखी बांधत व सांगत, “माझ्या सदिच्छा तुझ्या पाठीशी आहेत. विजयी होऊन परत ये. मी वाट पाहत आहे.”

 आज रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वाना सदिच्छा व शुभाशीर्वाद. 

-------------------------------------


 मानव व निसर्ग यांच्यातील नात्यांबद्दल तेवढेच नाही आपले सण पण निसर्गाशी जोडलेले आहेत. 

चैत्र वैशाखात झाडांना नवी पालवी फुटली. आता फुले भरपूर आली आहेत.

मंगलागौरी प्राजक्ताने सकाळी व गुलबक्षीने संध्याकाळी सजत आहेत.

मी केलेल्या आरतीतील एक कडवे


वाहिली तुजला षोडष पत्र 

त्यागार्थ बनवी आम्हास पात्र

वाहिले तांदूळ मुगाची डाळ 

भारत मातेला वंदिते बाळ

ओवाळू आरती मंगला गौरी

------------------------------------------------------------


प्रयत्न केले तर सर्व शक्य होते. 

सर्व धरती सोनेरी करता येईल,

चिंतामणी रत्नांचे डोंगर रचता येतील,

तारे चंद्र होऊ शकतील,

कल्पवृक्ष लावून बाग तयार करता येईल. 

-अभंग ज्ञानेश्वरी

-------------------------------------


काल आपण मारुतीची थोडी माहिती पाहिली. आज आणखी थोडी घेणार आहोत. मारुतीने आपल्या बुद्धीने संघटनेने व शक्तीने रामाला बरीच मदत केली होती. तरीही तो सदैव रामाचा दास राहिला. कशाचीही आशा न करता सदैव रामा पुढे हात जोडून उभा असे. तो जितेंद्रिय होता. रावणाच्या अंतपुरात आत गेल्यानंतर अनेक सुंदर स्त्रियांना पाहूनही, त्याच्या मनात जराही गडबड झाली नाही. रामदास स्वामींनी तरुण वर्गाने शक्तिसंपन्न व्हावे म्हणून अनेक आखाडे बांधले. तेथे रोज व्यायाम, कुस्ती यांचे शिक्षण दिले जात होते. गंमत म्हणजे त्या जागी हनुमंताची मूर्ती स्थापन केलेली असे. या आखाड्यांमधून रामदासांनी तरुणांची संघटना बांधली. त्यांना शक्तिवंत केले व शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेस मदत केली. 

 म्हणून आज आपण हनुमंता बरोबर श्री रामदास स्वामींना वंदन करूया. 

-----------------------------------------


अनुवाद ज्ञानेश्वरी

विषय- सुखोपभोगी लोकांना आत्मज्ञान मिळत नाही

जसे

नागड्याच्या समुदायात ऊंची वस्रांचे मोल होत नाही, जन्मांध राहतात तेथे सूर्याची काय किंमत?

 बहिऱ्यापुढे संगीताचा काय उपयोग? कोल्हा कधी चांदण्यावर प्रेम करेल का? चंद्रोदयाचे वेळी ज्याचा डोळा मिटून जातो, त्या कावळ्याला चंद्र कसा दिसेल?

------------------------------------


दासबोध

म्हातारपण कसे?

वळे जिव्हेची बोबडी 

कफे कंठ गडगडी

दुर्गंधी सुटली तोंडी

नाकी स्लेष्मा वाहे

मान कापे चळचळा

डोळे गळती भळभळा 

वृद्धपणी अवकळा

ठाकून आली

दंतपाटी उखळली

तेणें बोचरखिंडी पडिली

मुखी लाळ गळो लागली दुर्गंधीची

डोळा पाहता दिसेना

कानी शब्द ऐकेना

दीर्घ स्वरे बोलवेना दमा दाटे 

नाना दुख्खे नाना व्याधी

वृद्धपणे चळे बुद्धी

तरी पुरेना अवधी  आयुष्याची

पापण्या भु्वयांचे केस

पिकोन झडले नि:शेष

सर्वांगी लोंबले मास

चिरगुटासारखे

आणखी असेच बरेच

वर्णनाने चित्र डोळ्यासमोर ऊभे राहते. 

-------------------------------------


भागवत पुराण

श्नोता 

उत्तम चातक ऐकण्यात तल्लीन असतो. 

हंस अनेक गोष्टी ऐकून त्यातले सार घेतो. 

शुक ऐकलेली कथा ईतरांना मधुर पणे ऐकवतो. 

मीन डोळ्याच्या पापण्या ही न मिटता व अक्षरही न बोलता ऐकतो. 


अधम श्नोता 

वृक ऐकताना मध्येच ईतरांना डिवचतो व मोठ्याने बोलतो. 

भुरूंड ऐकून काहीच शिकत नाही पण तेच ईतरांना ऐकवतो. 

बैल समोर येईल ते जसे खातो तसेंच ऐकलेले असते त्यात ग्राह्य वा त्याज्य हे ठरवू शकत नाही. 

ऊंट आंबा सोडून कडुनिंबाचा पाला चघळतो. जणू भगवंत कथा न ऐकता सांसारिक गोष्टीत रमणारा अतिसामान्य मानवच. 

------------------------------------------------


‌आज गणेशाचे ही घरोघरी आगमन होणार आहे. गणेश, गणपती, गणनायक ही सर्व नावे तो लोकांचा नेता असल्याचे सुचवतात. 

----------------------------------------------


ही आणखी नावे- त्या पैकी 

विघ्नहर्ता या नावांने विघ्नांचे नाश करणारा हा अर्थ स्पष्ट होतो 

विघ्नेश व विघ्न राजेंद्र या नावांचा अर्थ विघ्नांचा राजा असा होऊ शकतो पण त्याचा अर्थ ही विघ्नांवर विजय मिळवणारा असा आहे. 

--------------------------------------------------


अनुवाद ज्ञानेश्वरी

वृक्षाचा सर्व सारभाग एकवटून बीज तयार होते, बीजातून वृक्षाचे काष्ठ तयार होते, पण काष्ठात बीजपणा नसतो. 

 मेघ आकाशात उपजतात पण आकाश त्यात नसते. 

 मेघात पाणी असते पण पाण्यात मेघ नसतात. 

 पाण्याच्या जोरामुळे वीज चमकते पण विजेत पाणी नसते. 

 अग्नीतून धूर निघतो पण धूरात अग्नी नसतो,

 तसा देवाने सर्व सृष्टी निर्माण केली असली तरी तो तिच्यापासून वेगळाच राहतो. 

------------------------------------------


 दासबोध भाषा 

प ते म


पाप पळोन गेले दूरी

पुण्य पुष्कळ प्रगटे वरी

परतरतो परी अंतरी 

चटक लागे

फुकट फाकट फठवणे नाही

फटकळ फुगडी पिंगा नाही 

फिके फसखट फोल नाही

भकाध्या निंदा

बरे बरे बरे म्हणती

बाबा बाबा उदंड करिती

बळे बळेचि बलाविती 

कथेलागी

भला भला भला लोकी

भक्ती भावे भव्य अनेकी

भूषण भाविक लोकी परोपकारे

मानले तरी मानावे मने

मत्त न व्हावे ममतेने

मी मी मी मी बहुत जने

म्हणिजेत

वाचताना अर्थही लक्षात घ्यायला जरा प्रयत्न करावे लागतील असे वाटते. 

----------------------------------------------


गणपतीची आरती झा्ल्या्नंतर मंत्र पुष्पांजली आपण म्हणतो त्यात काही शासनप्रकारांची माहिती दिली आहे.

साम्राज्य- जित राष्ट्रात जेत्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. धर्माचे पालन करणारा चांगली वर्तणूक असणारा, कर्तव्ये पार पाडणारा सम्राट असावा. 

भौज्य- अध्ययन, अध्यापन, समाजजागरण, धार्मिक कर्तव्यपालन यात निर्माण होणारे संदेह व अडचणी सोडवणारे राज्य असावे. तसेच द्विपाद व चतुर्पाद यांचेही रक्षण व्हावे. 

--------------------------------------------------


स्वाराज्य 

स्वाराज्यप्रमुखाला विशेष शिक्षण दिले जात असे

शासनपद्धतीतील विषय

सरहद्द संरक्षण, सागरसीमा रक्षण, जलस्रोत रक्षण, भू संरक्षण, अंतरिक्षर‌‌क्षण, शस्त्रसंचय - यात क्षेपणास्त्र ही आहेत, शेती व पाटबंधारे गोवंशरक्षण, औषधोपचार, सेवा, पाणी पुरवठा, वैभवसंपन्नता. 

यावरून लक्षात येते स्वाराज्य म्हणजे स्वराज्य अधिक सुराज्य. 


पारमेष्टराज्य 

 खेडे हे एकक, प्रमुख प्रजापती. 

प्रजापतीच्या सहाय्याला सभा व समिती अशी दोन मंडळे

 सद्-रक्षण व खलनिर्दालन ही प्रमुख कर्तव्ये 

प्रमुख विशेष म्हणजे आपला विकास करून घेण्याची सर्वाना समान संधी


महाराज्य

 लहान मोठी सर्व राज्य एकत्रित, परस्पर संबंध सामोपचाराचे.

महाराज्याच्या हिताचाच सर्व विचार करणार


आधिपत्य मयम 

रक्षण करणारा तो पति, अनेक पतिंचे नियंत्रण करणारा तो अधिपती.  

आधिपत्यमयम् या सर्व अधिपतिंना परस्पर जोडून एकत्र ठेवणारे. 

---------------------------------------------------------


आज आपण राज्य संबंधी काय भावना असावी यासंबंधीची माहिती पाहणार आहोत. 


समंतपर्यायी

एक अर्थ सर्वव्यापित्व

प्रजेविषयी राज्यकर्त्यांची भावना कशी असावी?

माझे राष्ट्र हे माझे शरीर आहे व प्रजा हे त्याचे अवयव आहेत. 

प्रजेशी राज्यकर्त्यांची इतकी समरसता अपेक्षित आहे. 


सार्वभौम राज्य

राजसूय यज्ञानंतर राजाने आपल्या राज्याच्या कक्षा वाढवल्यानंतर वाजपेय यज्ञ केला म्हणजे तो सम्राट होई. तदनंतर अश्वमेध यज्ञानंतर एकराट पदवी मिळे. 

राज्याच्या कक्षा संपूर्ण पृथ्वी व्यापू लागल्या की सार्वमेध यज्ञ करून तो सार्वभौम राजा बने. यावरून हा विचार वैश्विक राजकीय ऐक्याचा आहे हे स्पष्ट होते . स्वाभाविकच मग आठवते तो कृण्वन्तो विश्वं आर्यम् ही भारताची अपेक्षा. 

----------------------------------------------------

 

मंत्र पुष्पांजली ही सर्व आरत्यानंतर म्हटली जाते. 

आरतीत त्या देवाचे गुण गाईलेले असतात. गणपती हा सुखकर्ता दुःखहर्ता असून तो विघ्नाची वार्ता नुरवतो.

हलाहल प्राशन करून शंकराने सर्वांना वाचवले व सर्व विश्वाचे शम् केले, कल्याण केले. 

देवी तर अनाथ नाथे अंबा आहे, हे सर्व विश्वकल्याणकारी गुण अंगिकारुन मंत्र पुष्पांजलीत वर्णन केले आहे तसे, सर्वेपि सुखिन संतु असे जग निर्माण करायची आमची मनिषा आहे. 

---------------------------------------------------------------


आता आपण गणेशाच्या काही नावांबद्दल विचार करणार आहोत

मूषकध्वज -अनेक ठिकाणी मूषकवाहन असा उल्लेख आहे. अथर्वशीर्षात मात्र मूषकध्वज म्हटले आहे.

मूषकाचे गुण - तो कुठेही प्रवेश करु शकतो, सर्व गोष्टी कुरतडू शकतो, त्याच्या हालचाली चपळ असतात. पाहता पाहता तो बिळात अद्रुश्य होतो व यशस्वी माघार घेऊ शकतो. या सर्व गुणांचा उपयोग समाज कार्यासाठी गणेशाने करून घेतला आहे. 

साधारणपणे मूषकवाहन असा उल्लेख असतो, येथे मात्र मूषकध्वज म्हटले आहे. असे का?

त्या साठी थोडे खगोल शास्त्र पाहू या.

दक्षिणेकडे एक हलणारा तारकासमूह आहे. त्या नक्षत्राचे नाव एकदंत गजमुख आहे. यालाच ग्रीक भाषेत मोनोसेरास म्हणतात. गजमुखाखाली एक तारकासमूह आहे, त्याचा आकार मूषकासारखा आहे. बदलत्या आकारामुळे या आकाराभोवती इतर तारे ध्वजासारख्या आकारात गोळा होतात, तेव्हा मूषकध्वज तयार होतो. यात एकवीस तारे आहेत.

मूषकध्वज या विशेषणाने गणेश हा गनिमी काव्याचा प्रणेता आहे हे कळते. 

-------------------------------------------


शूर्पकर्णाने ऐकलेले सर्वच जाहीर न करता अगदी अत्यावश्यक लोकहिताचे असेल तेवढेच नेत्यांनी बोलायचे असते. म्हणूनच सोंडेचा उपयोग. लांबलचक सोंडेतून प्रवास करून तिच्या टोकाला असलेल्या लहान भोकातून ते बाहेर पडणार. 

सोंडेचा उपयोग हत्ती हातासारखा करतो, उचलून खाणे, झाडांना विळखा घालणे वगैरे. सोंड सर्व बाजूला फिरत असल्याने ढालीसारखीही वापरता येते. हा हात डोक्याशी जोडलेला आहे हे विशेष. बुद्धीचा उपयोग करून काम करायचे. प्रत्येक कार्यामागे बुद्धी असली पाहिजे. 

वक्रतुंड हे गजाननाचे आणखी एक नाव. आपण अर्थ करतो वाकड्या तोंडाचा. खरा अर्थ आहे वक्रान् तुंडयति स वक्रतुंड- वाकडे वागणारांना सरळ करणारा. 

--------------------------------------------


आज अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी 

मला शुद्ध चतुर्दशी चे नेहमीच कौतुक वाटते. प्रतिपदेपासून चंद्रप्रकाश थोडे थोडे वाढवण्याचे सुरु झालेले काम, आपला वाटा ऊचलून ते काम पौर्णिमेला सोपवते. पौर्णिमा मात्र ते पुढे चालू ठेवण्यास असमर्थ ठरते. एका कवीने म्हटले आहे, ‘पूर्णोत्थापनकाल तोच पतनप्रारंभही होतसे’. 

काही खास चतुर्दशी

वैशाख शु. चतर्दशी- नरसिंह जयंती

भाद्रपद शु.चतुर्दशी- अनंतचतुर्दशी 

आश्विन व. चतुर्दशी- नर्कचतुर्दशी

कार्तिक शु. चतुर्दशी- वैकुंठ चतुर्दशी

माघ व. चतुर्दशी- महाशिवरात्री

आजच्या दिवशी अथर्वशीर्षात म्हटल्याप्रमाणे प्रार्थना करू या,

“अव त्वं माम्- माझे रक्षण कर. वक्ता, ऐकणारा, दाता, धाता, अवानुचान् म्हणजे अनुकरण करणारा शिष्य या सर्वाचे रक्षण कर.

एवढेच नाही तर अव पश्चात्तात पाठीमागून, पुढून, दक्षिणे कडून, उत्तरे कडून, ऊर्ध्व दिशेकडून, अधर दिशेकडून, सगळीकडून सर्वांचे रक्षण कर.”

---------------------------------------


आज पौर्णिमा. आपण आज वेगवेगळ्या पौर्णिमा व त्यांचे विशेष पाहणार आहोत. 

चैत्र पौर्णिमा     -  हनुमान जयंती

वैशाख पौर्णिमा-  नरसिंह जयंती,’ना दिवस ना रात्र’ अशी वेळ असल्याने पौर्णिमा मानली जाते. 

ज्येष्ठ पौर्णिमा  -   वटपौर्णिमा

आषाढ पौर्णिमा - गुरू पौर्णिमा

श्रावण पौर्णिमा -  नारळी पौर्णिमा

आश्विन पौर्णिमा -  कोजागिरी पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमा- त्रिपुरी पौर्णिमा

मार्गशीर्ष पौर्णिमा- दत्तजयंती

 फाल्गुन पौर्णिमा -  होळी पौर्णिमा

आज भाद्रपद पौर्णिमा.  हिला पितृपौर्णिमा असे काहीजण म्हणतात.  कारण उद्यापासून पितृ पक्ष  सुरू होत़ो.  पितरांच्या मृत्यू तिथीनुसार  पक्ष केला जातो.  ज्यांची तिथी पौर्णिमा आहे, त्यांच्या नावाने आज पक्ष होत असल्याने, ही पौर्णिमा ही पितृपक्षातच गणली जाते.  साधारणपणे हे सर्व सोळा दिवस शुभ कार्याला योग्य मानले जात नाहीत.  

आज आपण आपल्या वांशिक व राष्ट्रीय पूर्वजांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करू या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा