रविवार, १२ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ८

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ८

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

 

वंदनीय ताई आपटे 

यांच्या घरी आम्ही उभयता एकदा गेलो होतो. नंतर सेविकांबरोबर अनेक वेळा जाणे झाले. घरी आलेल्याला काहीतरी दिल्याशिवाय त्या जाऊ देत नसत. पुष्कळदा आल्याच्या वड्या त्यांनी स्वतः केलेल्या असत. आणखी एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्या सर्वांना निरोप द्यायला जिना उतरून खाली येत असत. 

औरंगाबादला त्याही घरी राहिल्या होत्या. घराच्या गच्चीत त्यांचे बौद्धिक झाले होते.

वंदनीय ताईंची आणखी एक आठवण म्हणजे माझे पहिले पुस्तक वंदे मातरम. त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. वंदनीय ताईंनी हळूच विचारले," हे तुम्हीच लिहिलेत ना?" मी हो म्हटले. पण ताई पुढे म्हणाल्या मला वाटले प्रल्हादजीनी मदत केली आहे का?!! यांना त्या माझ्या आधीपासून ओळखत होत्या. 

किल्लारी ला भूकंप झाला. हादरे बीड धाराशिव भागातही बसले होते. मदतीसाठी लातूरला पोचले. डॉक्टर कुकडे यांच्याशी बोलणे झाले आणि त्यांच्याच गाडीने किल्लारी ला पोचलो. दवाखान्यात दाखल झालेल्यांची चौकशी, आवश्यक ती मदत, त्यांना चहा व नाश्ता म्हणून सांजा दिला. काही जणांना भरवायला लागला. त्यांच्या घरची चौकशी करून निरोप पाठवले गेले. नंतर पैसे, कपडे, भांडी, औषधे, धान्य व इतर वस्तू पोचवायला परत गेलो होतो. त्यावेळी त्यांना राहण्यासाठी झोपड्या बांधल्या होत्या. 

वंदनीय ताईंची आठवण म्हणजे या दरम्यान त्यांचे घरी पत्र आले होते. तेव्हा फोनची फारशी सुविधा नव्हती. तुम्ही तेथे आहात त्यामुळे काळजी नाही, आवश्यक त्या गोष्टी तुम्ही केल्या असतील ही खात्री आहे.


वंदनीय उषाताई 

वंदनीय उषाताई घरी आल्या होत्या तेव्हा काही सेविका त्यांच्याकडून गीतांच्या चाली शिकायला आल्या. हॉलमध्येच सर्व बसल्या होत्या. स्वाभाविकच आवाज बाहेर जात होता. शेजारपाजारच्या महिला ते ऐकून पाहायला आल्या होत्या. फार छान म्हणायच्या त्या गीते. 

 वंदनीय उषा ताईंचे राहणे, वागणे, बोलणे अत्यंत साधे होते. तेथील छात्रावासातील मुलींच्या त्या जणू आजी होत्या. माझा अर्ध्या बाह्यांचा स्वेटर त्यांना खूप आवडला होता, पण त्यांना तो लहान होत होता. मग त्यांना तसाच स्वेटर त्यांच्या मापाच्या विणून दिला. त्यांनी तो पुढे अनेक वर्षे वापरला. 

एकदा त्या बऱ्याच आजारी पडल्या. झोपून राहायच्या. काहीच खायच्या नाहीत. प्रमिलाताई आणि चित्रा ताईंचे प्रवास ठरलेले होते. मला निरोप आला, नागपूरला राहायला या. योगायोगाने माझा प्रवास तेव्हा नव्हता. नागपूरला गेले. भात कालवून बळजबरी भरवणे, खुर्चीवर बसायला लावणे, व्हील चेअर मागवून घेतली, कार्यालयात हिंडवून आणणे, वाचून दाखवणे असे सगळे केले. त्यांची प्रकृती सुधारली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर म्हणाल्या की औषध आहेच. पण तुमचा सहवास देखील त्यांना गुण यायला कारणीभूत आहे.

एक वर्ष शाळाशाळांतून संपर्क असा कार्यक्रम होता. शाळेशी संपर्क साधून त्यांच्या सोयीच्या वेळी जाऊन मुलांना संस्कारक्षम कथा व गीते सांगायची. त्या शाळेने कळवले तर त्यांना आवश्यक विषयावर विषय मांडणी करायची. अशी योजना होती. एका शाळेत मी व उषाताई गेलो होतो. त्यांनी कळवलेला विषय भारदस्त होता. कल्पना होती की आठवी नववी दहावीची मुले समोर असतील. पण प्रत्यक्षात समोर आली ती पाचवी सहावी सातवी ची मुले! उषाताई हसून म्हणाल्या," सुशीलताई, परीक्षाच आहे ही. " मी उत्तरले," काळजी करू नका. 

प्रारंभीकपासून प्रवीण वर्गापर्यंत विषय मांडायची सवय उपयोगी पडेल." विषय मांडून खाली बसल्यावर उषाताईंनी हळूच मांडीवर थोपटले. 


-सुशील प्रल्हाद अभ्यंकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा