दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 2
श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या 91 व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.
------------------------------------
दर्शनाने धन्यता -सहवासाने कृतज्ञता भाग २
सुशील प्रल्हाद अभ्यंकर.
दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग २
श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या 91 व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
दोन नाना - नाना पालकर व नाना ढोबळे.
नाना पालकर
सातारा जिल्ह्यात प्रचारक म्हणून काही वर्षे होते. त्यामुळे आमच्या लग्नाला आदल्या दिवशीपासून उपस्थित होते. त्यांचे खंडोबल्लाळ हे पुस्तक सर्व तरुण तरुणींचे आवडते होते.
लेखक कवी व व्याख्याते असूनही अत्यंत साधे होते. भाकरी फार आवडायची. नेऊरगावच्या बैठकीत स्वयंपाकघर व आतली खोलीच्या मधील उंबरठ्यावर बसून हातावर भाकरी घेऊन व चटणी त्यांनी खाल्ली होती असे आठवते.
ते आजारी पडू लागले त्यावेळी सांगत मला अभ्यंकर यांच्या घरी ठेवा व तसे एकदा नेउरगावला पाच-सहा दिवस राहिलेही होते. त्यावेळी राम मंदिरात महिलांसाठी त्यांचे बौद्धिकही झाले. खेडेगावातल्या अशिक्षित महिलांना समजेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
परळला आता नाना पालकर स्मृती समितीची मोठी इमारत बांधली गेली आहे. तिथे कॅन्सर पेशंटना राहायची सोय होते. तसेच डायलिसिस सेंटर पॅथॉलॉजिकल वगैरे आहे.
नाना ढोबळे
घरी बऱ्याचदा आले. औरंगाबादला दोन-तीन दिवस राहायला होते. थोडे आजारी होते. त्यावेळी वृंदा सात-आठ वर्षांची होती. ती जणू त्यांच्या मदतीसाठी होती. तेही काही हवे असले की वृंदालाच हाक मारायचे.
गंपी शेणॉय मुंबईला प्रचारक होते. कामाठीपु-यातल्या घरी अनेकदा जेवायला असत. तिखट व तेलकट आवडायचे. माझी नोकरी चालू होती. पण दार उघडून जेवून, व्यवस्थित आवरून जात असत.
पाच राम
रामभाऊ म्हाळगी दोन-तीनदा घरी आले होते. रामभाऊ म्हाळगी यांच्या विद्वत्तेचे मुळे असेल पण जरासा धाक वाटायचा.
रामभाऊ म्हाळगी यांच्या नावाने आता रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी स्थापन केली गेली आहे. केशव सृष्टी जवळ त्यांची मोठी इमारत आहे. तिथे अनेक विषयांवरचे प्रशिक्षण व संशोधन असे कार्यक्रम होतात. आताचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी अनेक वर्षे ते काम पाहिले आहे.
जयंत म्हाळगीसुद्धा प्रचारक असताना वरचेवर येत असत.
राम कापसे आले की मोकळे बोलणे असायचे.
तिसरे राम नाईक
आग्री पाड्याला वरचेवर येत असत. गच्चीत कठड्याला टेकून उभे राहण्याची त्यांची विशिष्ट पद्धत होती. भेटायला येणाऱ्यांची संख्या जास्त झाली की घरी येऊन सतरंजी घेऊन जात.
औरंगाबादला स्वागत ( घराचे नाव ) मध्ये पण ते येऊन गेले. एकदा तेआले असता सोबत पोलिसांच्या गाड्या ही होत्या. शेजारपाजारचे सर्व लोक घाबरून गेले होते. राम नाईक नंतर उत्तर प्रदेशचे राज्यपाल झाले.
चौथे रामभाऊ गोडबोले. आता नक्की आठवत नाही,पण ते बहुतेक कायगाव टोक्याचे होते.
पाचवे रामभाऊ गावंडे
औरंगाबाद जवळ चितेगाव येथे राहणारे मी पिंपरी राजाला शाळेत नोकरीला जातात असे वाटत चितेगाव लागायचे पुष्कळदा औरंगाबाद चितेगाव ला उतरून पुढची बस पकडावी लागेल रामभाऊंच्या घर जवळच असल्याने ते पुष्कळदा भेटायचे किंबहुना स्टॉप वर उभे असले की ते येऊन भेटायचे काही गडबड झाली तर ते गाडीवर मला पिंपरी ला सोडायचे मला वाटते तेव्हा जिल्ह्याचे काम त्यांच्याकडे होते. औरंगाबादला नेहमीच घरी येत असत.
श्री दत्तोपंत ठेंगडी
पहिली भेट आम्ही गिरगावात राहत होतो तेव्हा झाली. एकच १० बाय १२ ची खोली, तेथेच मोरी. संडास वगैरे बाहेर. थोडीशी जागा होती तिथे बाक ठेवलेले असायचे. दत्तोपंतांचा बराचसा वेळ बाकावर बसून जायचा. समोरे सतरंजी घातली होती. तिथे भेटायला येणारे बसत. कामाठीपु-यातल्या घरीही एक दिवस राहायला आले होते. औरंगाबादला देखील घरी आले होते. संध्याकाळी पन्नालाल नगरमधे भाषण होते.
अटल बिहारी वाजपेयी
यांचे भाषण दादरला प्लाझा सिनेमा समोर एक मध्यम आकाराची मोकळी जागा होती तिथे ऐकले. अटलजी तेव्हा अगदी तरुण होते. पण त्यावेळची त्यांची बोलण्याची पद्धत शेवटपर्यंत तशीच होती याचे आश्चर्य वाटते. कुठे ते आठवत नाही पण त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळचे त्यांचे सहज बोलणे व अगत्य लक्षात राहिले आहे.
-सुशील प्रल्हाद अभ्यंकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा