बुधवार, १५ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 12

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 12

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

----------------------------------------------------------------------------------------------------------------


कलावती पंडित 

पुणे निवासी, बालपणापासूनच्या सेविका. मराठवाड्यात काम सुरु करणाऱ्या विस्तारिका. यांच्या कार्य काळात नगर मराठवाड्याला जोडले होते. वर्षातून दोन तीनदा नियोजन पूर्ण प्रवास करीत असत. नगर, बीड, संभाजीनगर असा त्यांचा प्रवास होई. 


माणिक ताई टिळक 

चेंबूरच्या राहणाऱ्या. कार्यवाढीसाठी मराठवाड्यात प्रवास करत. साधारणपणे १९७९ ते १९८३. दांडगी जिद्द, सौम्य स्वभाव, सहज संपर्काचा हातखंडा होता. प्रवास व निवास दोन्हीतील गैरसोयींकडे दुर्लक्ष करून प्रवास चालायचा. वय ६०च्या आसपास होते. वर्षेातून सलग २१ दिवस प्रवास करत. वर्ग, विशेष कार्यक्रम यांचे निमित्तानेही येत. जातील तिथे त्यांची लहान मुलांशी देखील मैत्री होत असे. 


प्रभाताई दिक्षित

माहेर वर्ध्याचे. वं. मावशींचा लग्नाआधी सहवास लाभलेला. 

बी. ए. झालेल्या होत्या. नेवाश्यालाही शाळेत नौकरी केली. संभाजीनगरला आल्यावर नंतर गुजराती विद्या मंदिरात सहशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान बी. एड. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या. येथील समिती कार्याचा एक आधारस्तंभ बनल्या. अक्षर चांगले होते. कार्यक्रमाचे नियोजन आखीव रेखीव असायचे. व्यवस्थितपणा नावाजण्याजोगा होता. मोठे कुटुंब व कुटुंबातल्या मोठ्या होत्या. मानाने व मनानेही मोठ्या होत्या. इतरांना प्रेरणा व उत्साह देण्यात वाकबगार होत्या. कौतुक करणे सहजभाव असला तरी आवश्यक तेव्हा रागवणेही जमत असे. त्यावेळी मराठवाड्यात काम कमी होते. संभाजीनगरच मुख्य स्थान होते. जिल्हा कार्यवाहिका वगैरे पदे नव्हती. प्रभाताईंकडे खास जबाबदारी कोणतीच नव्हती. पण शहर कार्यवाहिका अवंतिकाबाईंनाही मार्गदर्शन करणारे व्यक्तीमत्व होते. बौद्धिक, गीत, कथाकथन, बैठक घेणे, उत्सवाचे नियोजन तसेच प्रवासही करत असत. वाचन बरेच होते.


अवंतिकाबाईं जोशी

शहर कार्यवाहिका म्हणून बरेच वर्षे काम केले. संभाजीनगर मध्ये समिती कार्य वाढवले. सौम्य स्वभाव, संपर्क दांडगा व आपले म्हणणे पटवून देऊन कृती करायला लावायच्या. हे कसब चांगले होते. आवाजही खूपच गोड व चांगला होता. 

श्री. जोशी हेही संघ स्वयंसेवक असल्याने घरात पाहुण्यांचा राबता सतत असे. केलेल्या वाचनातील मनाला भावेल ते लिहून ठेवत. रोजनीशी देखील लिहीत. बैठक परिणामकारक घेत. मराठवाड्यात ही थोडा बहुत प्रवास करत. आजारी पडून अंथरूणावर खिळल्यानंतर ही आठवणीने गुरूदक्षिणा पाठवत. १० अंक व दिनदर्शिका सुद्धा घेत असत. मोठा मुलगा विवेकानंद केंद्रात (कन्याकुमारी) चा २ वर्ष प्रचारक होता. मुलगी ही समितीच्या कामात होती. आता सूनही समिती कार्यक्रमात सहभागी असते. 


 नलिनीताई कोल्हटकर 

 मुलगी रंजना आणि त्या दोघी मिळून सरस्वती कॉलनीत शाखा घेत. उपस्थिती ८०--१०० असायची. भजनाचे वर्ग घेत असल्याने बऱ्याच ओळखी होत्या. अनेक बैठका त्यांच्या कडे त्यांचे घर मध्यवर्ती असल्याने होत असत. एकदा वं. मावशी त्यांच्याकडे मुक्कामाला होत्या. आकाशवाणीवर आद्य शंकराचार्यांवर कार्यक्रम सादर करताना तसेच शहरातील काही कार्यक्रमात पेटीवादनाचा सहभाग होता. भजनी वर्गात समिती गीते शिकवत. 


 विमल ताई राव 

 लग्ना पूर्वीच्या वर्तक. पुण्याच्या होत्या. समितिच्या महाराष्ट्रातील व इतर प्रांतातील वर्गावर शिक्षिका म्हणून गेल्या होत्या. जराश्या अबोल वाटायच्या. श्री. राव संभाजीनगरला बदलून आले तेव्हा त्या इथे आल्या. स्वतः चौकशी करून कार्यक्रमाला येऊ लागल्या. सिंदखेड राजाला जिजामाता त्रिशताब्दी मोठ्या प्रमाणात झाला. त्याला ही त्या उपस्थित होत्या.


 नंदिनी कोरटकर 

 जवाहर कॉलनी शाखेच्या सब कुछ! 

तेथे एक चांगला गट तयार झाला होता. दैनंदिन शाखेवर ही ५०-६० उपस्थिती असायची. शहर बस वाहतूक फारच कमी होती. तरीही चालत येऊन सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहत असत. वाढत्या वयाच्या दुखण्यांमुळे संपर्क व काम कमी झाले. 


 अक्का करंदीकर 

 भाऊसाहेब करंदीकर यांच्या पत्नी. संघ कार्यकर्त्यांच्या घरी राबता. सर्वांशी मोकळे बोलणे. त्यामुळे बरीच माहिती असायची. तसेच आवश्यक ते काम काम करून घेण्याची हातोटी होती. अर्थात त्यासाठी आवश्यक असे आपुलकीचे संबंध होते. घरात ५०-६० जणू बसू शकतील असा एक हॉल होता. पावसाळ्यातील काही कार्यक्रम, बैठका तेथे होत व साप्ताहिक शाखा ही लागत असे. समितीच्या सेविका त्यांच्या जणू सुना,नातीच असायच्या. त्यांच्या रूपाने माता ही मिळायची, हक्काने कामही सांगितले जायचे. नियोजन मनात असायचे. त्यामुळे कुठलीही व्यवस्था पटकन होत असे. कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित असत. १-२ जणींना सोबत घेऊन येत असत. अडीअडचणींच्या वेळी भक्कम आधार होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा