रविवार, ३० मार्च, २०१४

श्री गणपत्यथर्वशीर्ष - प्रकरण तिसरे - भाग २

लंबोदरम् शुर्पकर्णकम् -
मोठ्या पोटाचा व सुपासारखे कान असलेला. गजमुख असल्याने सुपासारखे कान अपेक्षितच आहेत. एकनाथांनी सुपाचे वर्णन केले आहे,
" सुपाची दशा ते ऐसी। त्यजी रज:कण भुसासी ।
 निडारल्या निजबिजासी । निजहृदयेसी राखत ।( एकनाथी भागवत ७/३३७)
माती व भूसाचा त्याग केल्यानंतर शुद्ध निजबीज जे आहे त्याला सुप निजहृदयाजवळ राखते. जे असार, अनुपयुक्त आहे ते टाकून देऊन उपयुक्त व सारभूत साठवणे हे सुपाचे वैशिष्ट्य आहे. जो नेता असतो त्याला अनेकांकडून अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. त्यातले खरेखोटे, सत्यासत्य, योग्यायोग्य निवडुन घेणे हे त्याला करावे लागते. कानांना झाकण नसते अशी एक म्हण आहे. ’ईच्छा असो वा नसो जे कानी पडेल ते ऐकले जातेच. म्हणूनच सुपाची आवश्यकता अधिक असते. नेत्याला आपले कान सदैव उघडे ठेवायला लागतात. याचा अर्थ त्याने सर्वांचे म्हणणे ऐकायचे असते, ’ऐकावे जनाचे ’. पण त्यावर प्रक्रिया करून सर्वांमुखी झालेला निर्णय मनात साठवुन, ’करावे मनाचे ’ असे वागायचे असते.
पाखडून घेतले खरे, पण कानांवर पडले की शरीरात जाते. नको असलेल्या गोष्टीचीही साठवण करण्याची जागा म्हणजे पोट. दृष्टीनेही जे पाहिले जाते तेही पोटात साठवले जाते. म्हणूनच या गणपती गणनायकाचे पोट विशाल आहे. पोट अन्न साठवते. पाचकरसाने ते पचवते. रक्त तयार होते व सर्व शरीराकडे पाठवले जाते.

श्री.आनंद जयराम बोडस यांनी संगणकाच्या भाषेत या सर्वांची उपपत्ती लावली आहे. संगणक म्हणजे सम्यक गणक. गणक शब्दाचा एक अर्थ आपण ध्वनीचे गण करणारा असा मागे पाहिलाच आहे. गणक चा दुसरा अर्थ आहे गणना करणारा. संख्या मोजणारा. जनगणना करण्याची पद्धत गणपतीनेच सुरू केली.
बोडस म्हणतात,’आचार्य गणक हे उर्जाविज्ञानाचे शास्त्रज्ञ होते. जनकल्याणार्थ संशोधन करणारे वैज्ञानिक होते. उर्जा ही तीन प्रकारची असते. म्हणून शक्तीत्रयात्मक: हे विशेषण योजले गेले. लंबोदर ही उर्जेची साठवण करणारी बॅंक होय. ज्ञानशक्तीची अब्जावधी मेगॅवॅट असलेली ही डेटा बॅंक आहे. फडफडणारे कान म्हणजे या डेटाबॅंकसाठी दुरदुरून येणारे संकेत व ज्ञानसंदेश. ग्रहण करण्यासाठी असलेल्या या डिस्क ऍटेना आहेत. म्हणूनच त्या वेगवेगळ्या दिशांना व वेगवेगळ्या अंशात सतत फिरत्या ठेवाव्या लागतात. सोंड ही शुद्धीप्रक्रियेतील नळी आहे.

रक्तानुगंधलिप्तांगं रक्तपुष्पै सुपूजितम् -
वेगवेगळ्या असुरांचा नाश केल्यानंतर त्यांच्या रक्ताचा टिळा लावला गेला असाही अर्थ ( रक्त+ गंध + अनुलिप्त +अंग ) लावला जातो. बाकी माहिती रक्तम मधे आली आहेच.
याखेरीज वक्रतुंड हे विशेषण अथर्वशीर्षात आलेले आहे. वक्रतुंडचा सरळसरळ अर्थ वाटतो वाकडे तोंड असणारा. मानवापेक्षा गजमुख हे नक्कीच वाकडे आहे. पण वक्रतुंडचा अर्थ आहे, "वक्रान् तुंडयति स: "जे वाकडे आहेत, वक्र बोलणारे, वागणारे आहेत त्यांना शिक्षा करणारा! गणेशचरित्र वाचताना गणेशाने शारीरिक शक्ती, संघटन शक्ती, बुद्धी व युक्ति यांचा वापर करून अनेक दुष्टांचा नाश केला आहे तर काहींना वठणीवर आणले आहे, हे आपल्या लक्षात येते.

गंमत वाटते ती एका गोष्टीची! गजाननाच्या सोंडेचा कुठेच उल्लेख नाही. गजमुखात ती ’गृहीत’ धरलेली आहे. सोंड ही नाक, तोंड व हात तिन्हीचे काम करते. शुद्धीप्रक्रियेतील नळी, पाशासारखे शस्त्र हे उल्लेख मागे आलेले आहेत. लांबच्या लांब असली तरी तोंड म्हणूनचा भाग लहानच आहे. हत्तीला मोठे फळ खाण्यासाठी टाकले तर आधी तो ते पायाने दाबतो मग उचलुन तोंडात घालतो. तोंडाचे दोन उपयोग, खाणे व बोलणे. नेत्याने शरीराला आवश्यक तेवढेच खावे व समाजहितकारक तेवढेच बोलावे अशी अपेक्षा असते. पोटांत कितीही साठले तरी बोलणे माफकच असावे. आवेशाचे भरात नको ते, नको तितके बोलले गेले तर काय होते, हे वर्तमानपत्रावरून लक्षात येतेच. अधिक खाल्ले तर कधी ते डोळ्यावर येते, कधी शिक्षा होते. पण यातून सुटले तरी जनमानसात आदर मिळत नाही हे नक्की.

सोंडॆचा उपयोग हत्ती हातासा्रखा करतो. उचलून खाणे, झाडांना विळखा घालणे, माणसांना उचलणे वगैरे. सर्व बाजूंना फिरत असल्याने ढालीसारखीही वापरली जाते. हा हात डोक्याशी जोडलेला आहे हे विशेष आहे. बुद्धीचा उपयोग करून कृती करावयाची तसेच कृतीमागे बुद्धी असली पाहिजे.
श्री.विवेक लक्ष्मण गोडबोले म्हणतात, गणेशाने गजमुख धारण केले आहे कारण हत्ती हा शाकाहारी, बलाढ्य, समुहाने रहाणारा, जलप्रिय, उशीरा वयात येत असल्याने कामविकार कमी असणारा, क्वचितच रागावणारा आहे. नजर सूक्ष्म व दूरदृष्टी असणारा आहे."

श्री.जयंत साळगावकर लिहितात, "गणनायक असल्याने शिस्तीचा भोक्ता व वेषांतर करून लढणारा आहे. गजमुखापासून बनवलेली किंवा गजमुखासारखी दिसणारी ढाल त्याने वापरली आहे."
’२१ ’ ह्या संख्येबद्दलही ते म्हणतात, "गणपतीने सैन्यरचना केली ती अशी- २१ सैनिकांचा एक गट, त्या गटावर एक प्रमुख, अशा २१ गटांचा एक समूह- त्यावर एक प्रमूख अशी ! आजही ह्याच तत्वावर सैन्यरचना केली जाते.

अध्यात्मिक वर्णन व वर उल्लखलेले सगुणरूप वर्णन याखेरीज आणखी काही विशेषणे अथर्वशीर्षात आलेली आहेत. गणेशाचा जो गांयत्री मंत्र आहे,’ एकदंताय विन्महे वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दंति : प्रचोदयात॥ ’
आम्ही एकदंताला जाणतो, वक्रतुंडाचे ध्यान करतो, त्या ’दंति' ने आम्हाला प्रेरणा द्यावी. ’दंति’ शब्द उच्चारताच वाटते की एकदंताशी संबधितच हे विशेषण असेल. रचनाकाराच्या शब्दप्रभुत्वाचा हा आविष्कार आहे. दंत- कित्येक योजने प्रदेश व दंति म्हणजे या दंतचा स्वामी!

महात्मा गांधींचे वर्णन एका कवीने केले आहे,
" तो नच राजा,राजकुमारही, नच कोणी श्रीमंत धनाढ्यही।
विख्यात ना कोणी कवीही। नच असल्या काहीच खुणा।
पण जग वंदी तयासच पुन्हा पुन्हा. "
असे का? पुढे ते म्हणतात," कारण स्वत:च्या वृत्तीने व कृतीने ते जनतेच्या हृदयसिंहासनावर आरूढ झाले होते."
भारताच्या सर्व भागात गजाननाला मान्यता मिळालेली आहे. म्हणजेच सर्व भारत देशच तो राजा नसूनही त्याच्या स्वामित्वाखाली आहे म्हणुन तो ’दंति "!

अथर्वशीर्षातील शेवटचा श्लोक ( यापुढे फलश्रुती आहे-)
नमो व्रातपतये..नम:।
व्रातपतये -
व्रातांचा पति असलेल्याला वंदन असो. बाकी सर्व देव स्वर्गात रहातात. शंकरही कैलासावर रहातात. पण त्यांचा वावर आहे तो समाजातील उपेक्षित असलेल्या जमातींमध्ये. व्रात, भूत, गंधर्व, पिशाच्चादि समाजातील लोकांना त्यांनी आपले मदतनीस, आपले सहकारी, आपले अनुयायी म्हणून स्वीकारले आहे. शंकरांचे हेच कार्य पुढे गजाननानेही चालू ठेवले होते. हे (व्रातपति म्हणुन गजाननाच्या उल्लेखाने) आपल्या लक्षात येते. इतकेच नव्हे तर त्यातील ’प्रमथ ’ या एका गणाची खास जबाबदारीही त्याच्याकडे आहे. म्हणून प्रमथपतये म्हटले आहे. श्री. शंकर अभ्यंकर व्रात चा अर्थ व्रत करणाऱ्या ऋषींना आश्रय देणारा असाही करतात.

विघ्ननाशिने -
विघ्नहर्ता, संकट्मोचन अशीही नावे प्रचलित आहेत. समाजाच्या हिताकरता तसेच समाजरक्षणाकरता गणपतीने केलेल्या कार्याचा उल्लेख हे विशेषण करते.

शिवसुताय -
शंकरपुत्राला वंदन असो! शं करोति इति शंकर:। सर्वांचे कल्याण करणारा तो शंकर. वडिलांचे हेही कार्य ( व्रातपतये ) गजाननाने पुढे चालवले आहे.

वरदमूर्तये -
वर देणारांचे मूर्तिमंत रूप असा गणपती। वर देणे या मागे, दिलेला वर खरा होईल असे सामर्थ्य त्या व्यक्तीमधे असण्याची आवश्यकता असते.

शांतिमंत्र -
( २ श्लोकांचा)-हा आधी व फलश्रुतीनंतर शेवटीही म्हणला जातो.
शांतिमंत्राच्या पहिल्या श्लोकात अपेक्षा किंवा संकल्प वर्णन केला आहे. आम्ही कानाने भद्र म्हणजे शुभ तेच ऐकू. डोळ्यांनी शुभ तेच पाहू. स्थिर शरीराने व संतुष्ट मनाने आयुष्याचा उपयोग तुझ्या स्तवनासाठीच करू. या संकल्पानंतर कल्याण करण्यासाठी इंद्राला प्रार्थिले आहे. इंद्र हा पराक्रमी व दुष्टांचे निर्दालन करणारा होता. ( सु+अस्ति=स्वस्ति=कल्याण)
पूषा
भौतिक व अध्यात्मिक दोन्ही प्रकारची भरभराट विश्ववेदाने (विश्व जो जाणतो व विश्व ज्याला जाणते) करावी.
तार्क्ष्य -
या देवाचे वर्णन वेदात आहे. तो अरिष्टांचा नाश करणारा आहे. काही ठिकाणी हा सूर्याचे वाहन आहे असाही उल्लेख आढळतो. त्याने आमचीही संकटे दूर करावीत तसेच देवांचा गुरू जो बृहस्पती त्याने आम्हाला कल्याण प्रदान करावे.
अधिदैवत -
नंतर ’ओम नमस्ते गणपतये ’ या प्रार्थनेनंतर आधिदैवताचे वर्णन पहिल्या व पाचव्या श्लोकात आहे. या सृष्टीचा तू कर्ता, धर्ता,हर्ता आहेस. ’त्वमेवं केवलं कर्तासि’ हा भाव अथर्वशीर्षात तीन वेळा वर्णन केला गेला आहे. केवलं कर्तासि धर्तासि हर्तासि ( निर्मिती, संरक्षण व नाश) सर्वच तू आहेस. पुन्हा पाचव्या श्लोकात तुझ्यापासूनच जगाची निर्मिती झाली. तुझ्यातच सर्व जग सामावलेले आहे. तुझ्यातच त्याचा विनाश होतो व तुझ्यामुळेच हे जग प्रत्ययास येते. पुन्हा सहाव्या श्लोकात तूच ब्रम्हा, विष्णू, रुद्र आहेस असे म्हटले आहे.
पंचमहाभूतापासून मानव, देव व सृष्टी निर्माण झाली आहे. त्याचा उल्लेख या अधिदैववर्णनात आहे.
’त्वम भूमिरापोSनलोsनिलोSनभ:। ’ ही पंचमहाभूते तूच आहेस. मानव देहात ही पंचमहाभूते् आहेत व त्यांची स्थानेही ठरलेली आहेत.
१) तळपाय ते मांड्या- पृथ्वीतत्व
२)मांड्या ते नाभि- आपतत्व
३)नाभि ते हृदय- तेजतत्व
४)हृदय ते नासिका- वायूतत्व
५)नासिका ते मस्तक-आकाशतत्व
पायापासून मस्तकापर्यंत ही स्थाने आहेत. साधारणपणे पंचमहाभूतांचा निर्देश आपण पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश असाच करतो.
पण त्यांची निर्मिती मात्र प्रथम आकाश, त्यांतुन वायु, वायुवहनाने तेज, तेजापासून आप व आपापासून पृथ्वी अशी झाली आहे. एकनाथी भागवतात व ज्ञानेश्वरीत याचे वर्णन आहे.

त्वं चत्वारि वाकपदानि-
वाक ही चार पदांची आहे व ही चार पदे तूच आहेस.
परा-
ध्वनी हा मूलत: निर्माण मूलाधारातून होतो. समर्थांनी म्हटले आहे, "मूलारंभ आरंभ तो निर्गुणांचा ।"
प्रथम निर्माण होतो तो प्रणव ओंकार व गणेशाला प्रणवरूपच मानले गेले आहे. ज्ञानेश्वरांनी ओंकारस्वरूपा म्हटले आहे. उभा ओम आडवा केला की गणेशरूप दिसते. म्हणूनच अथर्वशीर्षात ’त्वं मूलाधारस्थितोसि
नित्यं ’ असा उल्लेख आहे.
पश्यंति-
परा वाणी स्फुरित झाली की नाभीस्थानात तेथील चक्रात येते तेव्हा तिला पश्यंति म्हणतात.
मध्यमा-
पश्यंति मनोमय होऊन हृदयस्थानच्या चक्रात येते तेव्हा ती बुद्धीमय मध्यमा होते.
वैखरी-
मध्यमा कंठस्थानात येते तेव्हा तिचा उच्चार होतो. त्यालाच वैखरी मानतात. कंठस्थानात आल्यावरही त्यावर काही प्रक्रिया होतात व उच्चारण होते. आपण ओम् चा उच्चार करत असताना या सर्वाचा प्रत्यय येत असतो


1 टिप्पणी: