‘अखंड असावे सावधान’ विषय वाचला आणि समर्थ रामदासांची, ’अखंड असावे सावधान‘ हि ओळ आठवली. छत्रपती शिवरायांना समर्थांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल आदर असल्याने त्यांनी समर्थांची प्रयत्नपूर्वक भेट घेतली. औरंगजेबाकडे झुकलेल्या संभाजीराजांना स्वराज्याकडे वळवण्याचे काम करणारांत समर्थ रामदास आणि त्यांचे महंत ह्यांचा मोठा वाटा होता. राज्याभिषेकाचे वेळी संभाजीराजांनी समर्थांना निमंत्रण दिले. समर्थांना उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्यांनी राजांना पत्र पाठवले. त्याची सुरुवातच होती,
“अखंड सावधान असावे। दुश्चित्त कदापि नसावे। तजविजा करीत जावे। एकांती ।”
पुढे ते सांगतात,”पाच वर्षे कठीण आहेत. सावधानतेने राहिले पाहिजे. शिवबाला पाठवलेली ‘क्षात्रधर्म’ आणि ‘अखंड सावधान’ हि दोन पत्रे नीट वाचत जा. त्यावर मनन चिंतन करुन आचरण कर.”
आजूबाजूची परिस्थिती पाहून आपल्याला हि सुधारायची आहे हे अगदी लहान असतानाच ठरवले होते. देशाची दारुण परिस्थिती पर्यटनात लक्षात आली. ती सुधारायची असेल तर लोकांची आत्मविस्मृती घालवली पाहिजे. आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. त्यांना संघटित केले पाहिजे. पारतंत्र्यातून स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. ह्या सर्व गोष्टी साधण्यासाठी काम सुरु झाले. तत्कालीन परिस्थितीत असे काम करायचे म्हणजे सावधानता हवीच. म्हणूनच रामदासांच्या उपदेशांत वारंवार तसे उल्लेख आढळतात. कार्याबद्दलचे स्पष्ट स्वरूप,’ मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्वांविषयी” ह्या ओवीत केले आहे. दासबोधात वारंवार सूचना आहे,’सावध ऐका “
सच्छिष्य लक्षणे सांगताना सावधानतेची सूचना करतात. साधकाच्या वृत्तीत संदेह नसावा. ज्ञान संशयरहित असावे. यासाठी सावधानता आवश्यक. पाहिलेली प्रत्येक गोष्ट खरीच असते असे नाही, असे प्रतिपादन करताना ते मृगजळाचे उदाहरण देतात. पण असा खोटा भास तरी का होतो या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात,” सावधानतेने विश्वास निर्माण होतो. सावधानता नसेल तेव्हा दुश्चित्तपणा असेल. दुश्चित्तपणाने कार्यनाश, विस्मरण होते. सतत काळजी वाटते. दुश्चित्तपणाने स्वहिताचा क्षय होतो, असे सांगून सावध राहण्याची गरज पटवतात. मनामध्ये अनेक गोष्टींबद्दल भ्रम निर्माण होतात. त्यांचे निरसन सावधानतेनेच होईल असे प्रतिपादन करतात. जे काही करायचे त्यात धूर्तपणा व विचक्षणता असावी असे म्हणतात.
प्राप्त परिस्थितीत काय करायला हवे हे स्पष्टपणे सांगताना म्हणतात,
” महायत्न सावधपणे । समयी धारिष्ट्य धरणे ।अद्भुतचि कार्य करणे ।”
हे सगळे वाचताना वाटते, हे सर्व सांगायला सोपे आहे. करायला अवघड आहे. हे सर्व सांगणाऱ्या रामदासांनी स्वत: काय केले असा विचार मनात येतो.
समर्थांनी स्थापन केलेल्या मठांचे वैशिष्ट्य असे होते कि, बव्हंशी मठ हे स्वराज्याच्या सीमेवर जिथून हल्ला होऊ शकण्याची शक्यता होती अशा ठिकाणी स्थापन केलेले होते. सर्व मठांचा परस्परांशी संबंध असायचा. मठात महंत असायचे. एक/ दोन निवासी तर बाकी सगळेजण भ्रमंती करणारे असत. लोकांत मिसळून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, शत्रूच्या बातम्या मिळवणे, समाजात धैर्य व एकी निर्माण करणे, लोकांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करून स्वराज्यकार्यासाठी त्यांचे मन तयार करणे, ठिकठिकाणी बजरंग गदाधारी मारुतीची देवालये स्थापून तरुणांना बलशाली करण्यासाठी व्यायामशाळा स्थापणे, स्वाभिमानी तरुणांची संघटना करणे, तरुणांना समाज उत्थापनाच्या कार्यात जास्तीतजास्त सहभाग देण्यास तयार करणे अशी मठांची कार्यशैली होती. या कार्याची माहिती सर्वांना देऊन समाजाचे आत्मभान जागे करणे हेही काम चालू होते. ‘ इदं न मम ‘ हा भाव स्वीकारुन या महंतांनी एक समर्थ समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सर्वाचा फायदा समाज स्थापनेसाठी निश्चितच झाला.
धर्म राजकारण समवेत चालती । शक्ति युक्ति एकवटून कार्य साधती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा । जगी अमुचा एक महाराष्ट्र देश हा । असे गौरवोद्गार सहज निघू लागले.
समर्थांच्या सावधपणाचा आणखी एक लक्षात राहण्याजोगा प्रसंग म्हणजे अफजलखान निघाला आहे हा संदेश त्यांनी काव्यातून कुटपध्दतीने म्हणजे प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर घेतल्यास ‘विजापूरचा सरदार निघाला आहे. ‘ असा कळवला होता.
स्वतः सावध राहून सर्वांना सावध करणाऱ्या समर्थांना दंडवत!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा