बुधवार, २३ एप्रिल, २०१४

II मंत्र पुष्पांजली II - भाग २


पहिला धर्म अग्नी उपासनात्मक यज्ञ 

पहिला मंत्र..ओम यज्ञेनयज्ञमयजंत देवास्तानि देवाः अर्थ.= देवांनी यज्ञाद्वारे यज्ञनारायणरूप ईश्वराचे पूजन केले व तोच प्राचीनतम धर्म अग्निउपासनात्मक निर्माण झाला. यांतूनच सत्य धर्माचे स्वरूप प्रगट झाले.
यज्ञ संकल्पना हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. यज्ञ= विस्तार, यज्ञ= त्याग, यज्ञ= समायोजन, यज्ञ= कर्तव्य तत्परता, यज्ञ = नियोजन 

यज्ञ कसे केले जात?
जेथे मानव वस्ती स्थिर झालेली आहे अशा भूभागाच्या व्यतिरिक्त एखादा भूभाग निश्चित केला जाई. तो समतल व वस्ती योग्य केला जाई. एखादा राजा यज्ञाचे यजमानपद स्वीकारे. एक यज्ञ करायचा तर त्यासाठी सर्वांचे सहाय्य आवश्यक असे. सर्व खर्चाची व्यवस्था करणे व सर्व कामे सुसूत्रपणे चालवीत यासाठी राजाचा धनकोश व सत्तेचा अधिकार उपयोजिला जाई. यज्ञ भूमी, यज्ञवेदी, यज्ञकुंड तयार करावयासाठी व व्यवस्थेसाठी अनेक कष्टकरी, सुतार, कुंभार, गवंडी, लोहार अशा सर्व व्यवसायी लोकांची मदत लागे. संरक्षणासाठी सैनिक व शिकारी लागत. प्रत्यक्ष यज्ञकर्म करण्यासाठी - दुपारच्या वेळेत मार्गदर्शन करण्यासाठी, विविध राज्यातल्या विचारवंताना पाचारण करण्यात येई. सर्व देशातली स्थिती कशी आहे, काही समस्या आहेत का, त्यावर उपाय काय असा विचार केला जाई. 

आलेल्या सर्वांवर,"अग्नेय स्वाहा.. इदं न मम" हा संस्कार आपोआप होई. अनेक प्रकारच्या कार्यातील सहभागामुळे त्या कार्यासंबंधी स्वतः चे दायित्व मनात निर्माण होत असे. त्या भूमीबद्दल ममत्व वाटू लागे. अनेकांचा परिचय होई. सहकारभाव व आपुलकी वाढत असे. समस्या निराकरणातील सर्वांच्या सहभागामुळे परस्पर विश्वास निर्माण होई. विस्तीर्ण यज्ञभूमीवर मानवी वस्ती साठी नगर निर्माण होई, तर त्याचे संरक्षण, रोजच्या जीवनाची व्यवस्था याची जबाबदारी यजमान राजा स्वीकारे. म्हणूनच "यज्ञनारायण"हा शब्द रूढ झाला.

पण यज्ञ हा मोठ्यात मोठा तसेच लहानात लहान पण होऊ शकतो. विशाल समाज एकत्र येऊन यज्ञ करतो त्याचप्रमाणे एकेक व्यक्तीही यज्ञ करते. एकेका व्यक्तीच्या कष्टाने, सहभागाने, त्यागाने मोठीमोठी कामे संपन्न होतात. म्हणूनच हा त्यागाचा, कर्तव्यपूर्तीचा धर्म 'प्रथामान्यासन्न"

अशा या यज्ञाने "ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः साती देवाः" देवांनी स्वर्गाचा महिमा स्थापित केला. त्यागमय जीवनानेच श्रेष्ठता प्राप्त करता येते हे प्रस्थापित केले. मग एक अगस्ती विन्ध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत उतरतो, तेथील वन्य बंधूंचे जीवन प्रगत करतो. अनेक ऋषीमुनी अनेक संकटाना तोंड देत जगाच्या विविध भागात जातात, विकसित संस्कृती निर्माण करतात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जण हौतात्म्य पत्करतात. तर मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी संशोधक विविध प्रकारचे शोध लावतात. स्वर्ग =सुबत्ता, शांतता, अमरत्व.
सृष्टीनिर्मात्या प्रजापतीने अनेकांना हाताशी धरून सृष्टी निर्माण केली. अनेकांनी तेंव्हा एकेक समिधा टाकली. याच पद्धतीने "पूर्वे देवाः साध्याः संती". पूर्वी देवांनी इष्ट ते निश्चित ठरवलेले त्यागमय मार्गाने साध्य केले.

ओम राजाधिराजाय..............महाराजाय नमः....२
या मंत्रात विश्रवा ऋषींचा पुत्र कुबेर याला वंदन केले आहे. वास्तविक जेष्ठ पुत्र म्हणून लंकेचा अधिकार त्याचाच होता. पण गृहकलह नको म्हणून विश्रवा मुनींनी आज्ञा केल्याबरोबर तो अधिकार सोडून कुबेर दूर निघून गेला. स्वकर्तृत्वाने त्याने स्वतः चे स्थान निर्माण केले.देवांना प्रिय बनला. त्यांचा कोषाध्यक्ष झाला. श्रेष्ठ दाता म्हणून कीर्ती प्राप्त केली व उत्तरेचा लोकपाल ही बनला. विश्रवापुत्र म्हणून वैश्रवण अशा कुबेराला वंदन असो. स्वतः चे श्रेष्ठ स्थान निर्माण केले व अबाधित राखले म्हणून त्या राजाधिराज महाराजाला वंदन! अनेकांच्या कामना पूर्ण करण्यास तत्पर असणाऱ्या त्या कामेश्वराला प्रणिपात! त्याने आमच्या कामना पूर्ण कराव्या ही विनंती.

ओम स्वस्ति......
स्वस्ति==सु+अस्ति. सर्वांचे कल्याण होवो. भारतीयांनी सर्वेपि सुखिनः सन्तु..हा उद्घोष जेव्हा केला तेंव्हा त्यांचा विचार मी, माझे कुटुंब, असा विस्तारत राष्ट्र पर्यंत तर पोचलाच पण त्यापुढे जाऊन विश्वाचाही समावेश त्यात झाला.सृष्टी - चराचर सृष्टी, सजीव निर्जीव सृष्टी.
ही नुसती कामनाच नाही तर हे करूच हा भाव...कृण्वन्तो विश्वआर्यम'...सर्व विश्वाला श्रेष्ठ बनवायचे आहे असा यांत व्यक्त झाला आहे. नुसताच व्यक्त झाला नाही तर भारतीयांनी हा विचार घेऊनच सर्व विश्वात संचार केला. जगातील एकही भूभाग असा राहिला नाही की तिथे ही आपली संस्कृती पोचली नाही. मनात होती विश्व कल्याणाची चिंता, पाठीमागे होता सहस्त्र वर्षांच्या प्रयोगांचा व यशस्वितेचा इतिहास. मनात होती येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याची जिद्द व सामर्थ्य. 

वैराज्य... 
याचा क्रमांक नंतर असला तरी राज्यपद्धतीचे वर्णन करतांनाच याचा विचार प्रथम करावा लागेल. वैराज्य म्हणजे जेथे शासन अस्तित्वात नाही ती स्थिती असे वर्णन पं. श्री. दा. सातवळेकर यांनी केले आहे, तर श्री. विनायक रामचंद्र घटाटे आपल्या अथर्ववेद राजनीती या पुस्तकात राज्य अस्तित्वात नसणे असे म्हणतात, एकूण अर्थ एकच.
महाभारतात म्हटले आहे,"राजा नाही, राज्य नाही, शिक्षा नाही, अपराधी नाही अशी स्थिती. प्रत्येक जण आपल्या धर्मानुसार वागणारा असे. मानवजीवन सुखाने व्यतीत होई. कौटिल्य म्हणतात, "स्वतःचे व इतरांचे हा भेदभाव नसतो ते वैराज्य.' अशा समाजात शांतता व सुराज्य असे.

मनात विचार येतो अशी स्थिती खरंच अस्तित्वात असेल का? मग आठवते वसिष्ठ नंदिनीची कथा. वसिष्ठांच्या आश्रमातील या कामधेनुबद्दल ती सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारी होती, त्यामुळे सर्वांच्या मनात आदर भाव व प्रेम होते. तिची सेवा करण्यास सर्व तत्पर असत. पण ब्रम्हर्षी पदावरून जेंव्हा विश्वामित्रांच्या मनात असूया निर्माण झाली तेव्हा स्वाभाविकच वसिष्ठांची सर्व बाबतीत बरोबरी केलीच पाहिजे असे वाटू लागले. मग एकदा नंदिनीमुळे वसिष्ठांना अनेक गोष्टी प्राप्त होतात हे लक्षात आले व ती आपल्याला मिळावी असे वाटू लागले.
ते वसिष्ठांकडे आले व म्हणाले, "मला ही नंदिनी द्या." वसिष्ठ म्हणाले, ' देणारा मी कोण? तिच्या जर मनात असेल तर तुमच्या बरोबर ती येईल.' विश्वामित्रांनी तिला ओढून न्यायचा प्रयत्न केला. वसिष्ठ आपले रक्षण करीत नाहीत हे कळल्यावर नंदिनीने स्वतःच्या शरीरातून सैन्य निर्माण केले व विश्वामित्रांना पळवून लावले.

या प्रसंगातून वसिष्ठांना रक्षणाची व्यवस्था करण्याची गरज वाटू लागली व पुढे शासनव्यवस्था निर्माण झाली. याचे विश्लेषण असे सांगितले जाते की सत्ययुगात शासनाची आवश्यकता जाणवत नव्हती.पुढे त्रेतायुगापासून हा विचार अस्तित्वात आला.रामाने भरताला अराजकापासून सावध केले होते हे आपण पाहिले आहेच. आजच्या भौतिकवादी समाजात अशी स्थिती अशक्यप्राय वाटत असली तरी अगदी अशक्य नाही. आजही काही कुटुंबे अशी आढळतात की परस्पर सहकार्याने,सर्वांचा विचार आधी मग स्वतःचा अशी वर्तणूक ठेवत सुखाने नांदत आहेत. अर्थातच हे प्रमाण फार कमी आहे.भारतीय समाजाचे हे अध्यात्मिक अधिष्ठान पाश्चात्यांच्या लक्षात येणे कठीण आहे. मग हॉब्ज ला वाटते, 'ही मानवाची अगदी प्राथमिक अवस्था होती. नीती, कल्याण, कर्तव्य याचा स्पर्शही झालेला नव्हता. 'तर रुसो म्हणतात, 'सुखसोयींची काहीच कल्पना नव्हती- घर, कुटुंब, संपत्ती सगळ्या बाबतीत अनभिज्ञता होती" म्हणून वैराज्याचा अर्थ त्यांनी 'अराजक, anarchy " असा लावला.

पं. सातवळेकर 'विराज" शब्दाची व्युत्पत्ती सांगताना अशी अशी स्थिती कायद्यांची आवश्यकता भासण्या पूर्वीची शासन यंत्रणा होती असे सांगतात. पुढे म्हणतात 'विराज' हा अराजक शब्दाचा समानार्थी नाही. पण कुठल्याच समाजात अशी आदर्श स्थिती फार काळ राहत नाही. महाभारतातल्या शांतिपर्वात याचे वर्णन आढळते. " हळूहळू ही स्थिती सांभाळणे कठीण झाले, मानवाची परस्परांना समजून घ्यायची शक्ती कमी होऊ लागली. स्वार्थ व लोभ वाढला. लोभातून मत्सर, राग निर्माण झाला. दुसऱ्याचे बळकावून घेण्याची वृत्ति वाढली. मास्यन्याय=मोठा मासा लहान माश्याला खातो. तो प्रस्थापित होऊ लागला. अंदाधुंदी माजली. जीवनातील स्थैर्य नाहीसे झाले. शासन व शासक यांची आवश्यकता भासू लागली. विविध प्रकारच्या संस्था निर्माण झाल्या. या संस्था म्हणजेही शांतता निर्मितीसाठी व समाज सुसूत्रपणे चालावा म्हणून केलेले विविध प्रयोगच होत. ऐतरेय ब्राम्हणात वैराज्य म्हणजे धर्माधारित, शासन विहीन राज्य असे म्हटले आहे. पं. सातवळेकर म्हणतात, 'लोकच स्वतःच्या नियमाने समाज चालवतात." पण असे राज्य मोठ्या भूभागावर स्थापन होऊ शकत नाही.

साम्राज्य 
शब्द वाचताच आठवतात अलेक्झांडर, नेपोलियन, हिटलर व ब्रिटीश साम्राज्य. साम्राज्य म्हणजे राज्यविस्तार
( अर्थात येनकेनप्रकारेण ). हीच आज आमची समजूत झाली आहे. मग अशा साम्राज्याचा उल्लेख मंत्रपुष्पांजलीत अशा आमच्या भुवया उंचावल्या जातात. साम्राज्याची भारतीय संकल्पना समजावून घ्यावी लागेल. साम्राज्यप्रमुख अर्थात सम्राट. शुक्ल यजुर्वेदात सम्राटाचा अर्थ दिला आहे सदाचरणी व ज्ञानी. महीधर म्हणतात, "न्यायाने राज्य करणारा". तर दयानंद सरस्वती म्हणतात, "सुचारू व ज्ञानप्रकाश पसरवणारा."अर्थातच या पद्धतीने राज्यविस्तार म्हणजे साम्राज्य.
वेदांमध्ये वर्णन आहे, युद्धात जय मिळाला की सम्राट जीत राष्ट्रातील विद्वानांना, धुरिणांना भेटायला जात असे व चर्चा करत असे. (ऋग्वेद ) जीत राष्ट्रात जेत्यांबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. जे धर्माचे पालन करतात, चांगली वर्तणूक असते, कर्तव्ये पार पाडण्यात तत्पर असतात त्यांनीच सम्राट व्हावे. याज्ञवल्क्य सांगतात,"जीत राष्ट्रांच्या चालीरीती व परंपरा यांचा मान राखूनच सम्राटाने राज्य करावे."
साम्राज्यासाठी युद्धे धर्मयुद्धाच्या नियमांनुसारच व्हावी.त्यातील काही नियम असे,
(१) निशस्त्राशी शस्त्रधारी लढणार नाही.
(२)युद्ध सकाळ ते संध्याकाळच चालावे.
(३) कमरेखाली वार करू नये.
(४).पळत्याला मारू नये.
(५).एकाशी अनेकांनी लढू नये.
(६).शरणागताला अभय द्यावे. इत्यादी.
श्रीराम, विक्रमादित्य यांनी युद्ध जिंकल्यावरही त्या भूमीचे राज्य तेथीलच लायक लोकांहाती सोपवलेले आपण पाहतोच. ऐतरेय ब्राम्हणात म्हटले आहे, 'विशाल भूभागात राहणाऱ्या राज्यांना एकत्र करून त्यांना आपल्या अधीन करणे म्हणजेच साम्राज्य स्थापन करणे. पं.सातवळेकर म्हणतात, 'शत्रूला जिंकून त्यांना आपली आर्यन घटना (राज्यघटना) देणे.' तर श्री.शंकर अभ्यंकर या बाबतीत "अनंत कोटी ब्रम्हांड नायक" कडे निर्देश करतात.
पाश्च्यात्यांची साम्राज्यवादाची संकल्पना पूर्णतः वेगळी आहे. किंबहुन विरोधी आहे. स्वतःच्या फायद्यासाठी आक्रमण करावयाचे. राज्य जिंकायची. जीत राष्ट्रांची लूट करायची. अनन्वित अत्याचार करायचे. स्वाभाविकच याची परिणती होते ती त्यांच्या विरुद्ध बंद, उठाव,युद्धे. आज २०११ मध्येही इजिप्त व शेजारच्या राष्ट्रांत चाललेल्या अंगावर शहारे आणणाऱ्या घडामोडी आपण रोज वाचतोच आहोत. 

सौराज्याम 
ही संरक्षणवादी राज्यव्यवस्था आहे, भौज्य मधील मूळ धातु भुज ज्याचा अर्थ आहे संरक्षण व राज्य करणे. ऐतरेय ब्राम्हणात सांगितले आहे, 'उंबराचे झाड पोषक फळे देते." हा वृक्ष औषधी आहे. लिव्हर संबंधी समस्या, अभिसरणसंस्था, श्वसनसंस्था यातील दोष नाहीसे करतो. अल्सर शोधतो व बरा करतो.
(अशीच 'प्रियंगु' नावाची एक वेलही औषधी आहे. बुध ग्रहाच्या मंत्रात प्रियन्गुकालिका असे वर्णन आहे) संरक्षण व पोषण दोन्ही कामे करणारा हा वृक्ष 'भौज्य' मानला जातो.
मात्स्य न्यायानंतर स्वाभाविकच ही पद्धति विकसित झाली. सर्वांची प्रार्थना होती, 'ऐहिक पापांपासून, अंतरीक्ष वगैरे उद्भवणाऱ्या संकटांपासून आमचे रक्षण कर.

संरक्षणाचे विषय कोणते? या बाबतीत अथर्व ऋषी म्हणतात.
अस्मिन ब्रम्हणी- अध्ययन, अध्यापन, समाजकारण, हितकर वातावरणनिर्मिती व धार्मिक कार्यपालन यात निर्माण होणारे संदेह.
अस्मिन कर्मणी - कर्तव्य व धार्मिक कार्यपालनात येणाऱ्या अडचणी.
अस्याम पुरोधायाम - पुरोहित हा राजाचा मुख्य सल्लागार असे. सल्ला देताना व दिलेल्या सल्ल्यांचे पालन करतांना येणारे अडथळे.

अस्मान प्रतीष्ठायाम - सद्गुणी लोकांच्या सहकार्याने प्राप्त कर्म करून शांतता प्रस्थापित करण्याचे कार्याची स्थापना.
अस्याम सित्याम - वैदिक विचारांचे संरक्षण.
अस्यात अकुलाम - वैदिक विचारांचे पालन करण्याचा केलेला निश्चय. यासाठी,
अस्याम आशी षी - सर्वेश्वराचा आशीर्वाद हवा.
अस्याम देव्हुत्याम - देवाच्या सत्कृत्यांपासून प्रेरणा घेऊन त्यानुसार कार्य करणे.
स्वाहा - या सर्व उच्च आदर्शानुरूप कार्य करण्यासाठी मी माझे सर्वस्व अर्पण करण्यास तयार आहे. तसे सामर्थ्य प्राप्त होवो. 
यालाच एक वाक्य अजून जोडलेले आहे द्विपाद अन चतुष्पादांचे रक्षण तसेच धनाचे रक्षण.
भौज्य या शासन व्यवस्थेत विविध सामाजिक गट व त्या प्रत्येक गटाला एकेक अधिपति असे.(गणपती) त्या गटाचे स्थैर्य परस्पर सहभाग, सद्वर्तन, सर्व उपलब्ध स्त्रोत्रांचा योग्य उपयोग याची जबाबदारी या अधिपतींची असे. या शासनातील नागरिक कायदेसंस्था व स्वतःचे सुख यांच्यात संतुलन राखण्यासाठी तत्पर असे. त्यासाठी अग्नीची प्रार्थना केली जाई.

थोडक्यात (१) वैदिक चालीरीतींचा आदर करून पालन केले जावे.
(२) शासनाद्वारा सर्वाना सुख प्राप्त व्हावे.
(३) परस्पर व्यवहार सौहार्दाचे असावे, निसर्गाचे सहाय्य असावे, धन प्राप्त व्हावे.

या तीन गोष्टी भौज्य शासन व्यवस्थेतील प्रमुख मानल्या जात. म्हणजेच सुजलाम सुफलाम भूमी असावी. सर्वाना पुष्टी, तुष्टी, शांति प्राप्त व्हावी. दीर्घायुष्य प्राप्त व्हावे. स्वाभाविकच राज्याच्या क्षमतेनुसारच राज्यविस्तार अपेक्षित असे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा