बुधवार, २३ एप्रिल, २०१४

II मंत्र पुष्पांजली II - भाग १



Mantra Pusphanjali in marathi

केव्हा म्हणतात? 
देवाची साग्रसंगीत पूजा झाली की आरती, कापूरारती, घालीन लोटांगण म्हणत प्रदक्षिणा वा साष्टांग नमस्कार झाल्यावर ही पुष्पांजली वाहिली जाते. वाईला दशहऱ्यात कृष्णामाईची संध्याकाळी आरती होत असे. त्यावेळी आरतीनंतर देवे म्हटले जात व त्यात शेवटी मंत्र पुष्पांजली असे. म्हणून मनात आरती, देवे व मंत्र पुष्पांजली असा एक दृढ संबंध निर्माण झाला आहे.
यानंतर येते क्षमाप्रार्थना. काही चुकले माकले असेल तर क्षमा करा. आवाहनं न जानामि|मंत्रहीनं क्रियाहीनं अन हे सर्व का तर रक्ष रक्ष परमेश्वर!

रक्षण कशासाठी?
मानवी जीवनांत अन्न, वस्त्र, निवारा व निर्भयता जेंव्हा प्राप्त होते तेंव्हाच मानव स्वतःचा विकास, प्रगती करू लागतो. कुटुंब, समाज व राष्ट्र यांच्या संबंधात असलेल्या कर्तव्याचे त्याला स्मरण होते. जीवनाच्या हेतूचा शोध घ्यायला तो प्रवृत्त होतो. भौतिक विकास व अध्यात्मिक विकास हातांत हात घालून चालत राहतात. म्हणूनच सर्वात प्राचीन व अखंडपणे जिचा प्रवाह वाहत आहे अशा भारतीय संस्कृतीने अभ्युदय व निश्रेयस यांना समान महत्व प्रदान केले आहे.

रक्षणाची आस - 
या सर्वांसाठी जीवन सुरक्षित असायला हवे, हाच भाव वरचेवर प्रगट होत राहतो. मग ती रामरक्षा असेल, अथर्वशीर्ष असेल, गणेश कवच, विष्णू पुराण असेल किंवा अन्य आराधना असतील. संरक्षण विषय आला की आठवते सैन्य, सैनिक, त्यांना सहाय्यक ठरणारे अश्व, गज, शस्त्रास्त्रे वगैरे. मग श्रीसूक्तात उल्लेख येतो, अश्वपुर्वाम रथमध्यां वगैरे. तर देवे म्हणतांना "वृद्ध्सेनः, पृषद, अश्वासहः, अवनयः, रिश अदसः अर्थ मोठी प्रबळ सेना सज्ज ठेवणारे, धृष्ट पुष्ट घोडे जवळ बाळगणारे, सर्वांचे रक्षण करण्यास तत्पर असणारे, शत्रूंचा निःपात करणारे. आम्हाला सुखाने राहू देवोत. शत्रूपासून रक्षणाची ही व्यवस्था तर निसर्गापासून रक्षणही आवश्यकच. 

निसर्गापासून रक्षण
या साठी होते पंचमहाभूतांची प्रार्थना.पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश यांनी सहाय्यक व्हावे हा भाव प्रगट होतो. पण एवढ्यानेही भागत नाही. सर्व सजीवांनी परस्परांना साथ द्यायला हवी. त्यासाठी समाज नियम तयार झाले. यांचे स्वतःहून पालन होत होते तोपर्यंत सगळे ठीक होते पण हळू हळू त्यात बदल होऊ लागला. मग शासन यंत्रणेची आवश्यकता निर्माण झाली. स्वाराज्य, वैराज्य आदि राज्य प्रकार निर्माण झाले व मंत्रपुष्पांजलीत त्यांचा उल्लेख होऊ लागला.
याच सर्व गोष्टी आता आपण विस्ताराने विचारात घेऊ या. हे सर्व लिहित असतांना पुष्पांजलीतील काही शब्द, रचना समजल्या नाहीत हे जाणवते आहे. अभ्यासकांनी त्यावर अधिक प्रकाश टाकावा अशी विनंती. 

मंत्र पुष्पांजली 
मंत्र रूप पुष्पांजली. मंत्र हीच फुले कल्पिली आहेत. मंत्र पुष्पांजली म्हणतांना हातात फुले व अक्षता घेतात. सभासद इति असा शेवट झाला की ती फुले देवाला वहातात. 


मंत्र (मननात त्रायते इति मंत्र)
मननाने उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त होऊन ते आपले रक्षण करतात. अर्थात मननाने शब्दार्थ उलगडतोच शिवाय शब्दामागे दडलेला भाव लक्षात येतो. वारंवार चिंतनाने तो दृढ होतो. स्वाभाविकच आत्मविश्वास निर्माण होतो. शंका कुशंकांपासून रक्षण होते. बुद्धी स्थिर होते व एक प्रकारचे संरक्षक कवच निर्माण होते. अशा अनेक मंत्रांची ही पुष्पांजली आहे. 


मंत्राचे ३ प्रकार आहेत 
(१) बीजमंत्र- ओम, (गम), (र्हीन), क्लीं वगैरे एकाक्षरी मंत्र. 
(२) मूलमंत्र- १० ते २० अक्षरांपर्यंत असतात. रामाचा १३ अक्षरी- श्रीराम जय राम जय जय राम. गणपतीचा ७ अक्षरी- गणपतये नमः 
(३) माला मंत्र- अधिक विस्तृत असतात. यात साधारण पणे स्तोत्रमंत्र येतात. रामरक्षा, प्रज्ञाविवर्धन वगैरे. पुष्पांजली हा माला मंत्र आहे. 


देवे - ऐतरेय ब्राम्हणात मूळ ऋग्वेद देवे आले आहेत व पुष्पांजली हा त्या देव्यांचा शेवटचा भाग आहे. देवे हे नाव पडण्याचे कारण पं. श्री. दा. सातवळेकर सांगतात, "प्रत्येक मंत्राच्या शेवटी "देवाः" हा शब्द आला आहे. ऋग्वेदी देवे हा प्रार्थना मंत्र आहे. ऋग्वेद, अथर्ववेद, वाजसेनीय संहिता, तैतरीय संहिता, सामवेद, तैतरीय आरण्यक, ऐतरेय ब्राम्हण यात हे मंत्र आहेत. एकूण ५१ मंत्र आहेत, त्यातील २ ते ३१ मंत्रांशेवटी देवाः हा शब्द आला आहे.

देव्यांमध्ये व्यक्त अपेक्षा 
(१) सूर्य आम्हाला हर्ष देवो. आम्हाला मेधा - चपळ व तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होवो.(मंत्र ३). 
(२) नः वारीवस्यन्तु----नः आम्ही, आम्हाला शिरोभागी राहण्या इतके श्रेष्ठ बनव. (मंत्र ३) 
या श्रेष्ठत्वाची भारतीयांची संकल्पना काय आहे? श्री.दत्तोपंत ठेंगडी यांनी म्हटले आहे, "आम्हाला सर्वात अधिक संपत्तिवान होण्याची ईच्छा नाही किंवा जगातील सर्व भूप्रदेश जिंकून घेण्याचीही लालसा नाही. आम्ही आमची मते व धर्म लोकांवर लादणार नाही. पण आमच्या श्रेष्ठ विचारांनी, सहृदय व योग्य आचाराने, आमच्या ज्ञानाने, आमच्या शौर्याने, आमच्या प्रगतीने सारे जग आपण होऊन आम्हाला वंदन करेल अशी स्थिती प्राप्त करण्याची आमची मनीषा आहे." 
(३) (अशुशाणाम शु च यान्त) अग्नी जसा जवळ येणाराला शुद्ध करतो तसे आम्ही व्हावे. (मंत्र ४) 
(४) आम्ही प्रगतिशील, निष्कलंक, शूर वीर, आजीवन उन्नती साठी प्रयत्नशील असावे. त्यामुळे वाडवडिलांचे यश वाढेल, मातृभूचा गौरव होईल.(मंत्र ६ ). 
(५) परोपकारासाठी सदैव सिद्ध राहावे. त्यासाठी वेळ प्रसंगी आत्मसमर्पण रुपी यज्ञ करण्याचीही आमची तयारी असावी. (मंत्र ७ ) 
(६)आमच्या जवळ मोठी, प्रबळ सेना सज्ज असावी. धष्टपुष्ट अश्व असावेत.(रिश अद सः) शत्रूंचा निः पात करून सर्वांचे रक्षण करण्याची तत्परता व सिद्धता असावी. (मंत्र ९ ). 
(७) मित्रयुजदेवः न - मैत्री करणाऱ्या देवांसारखे सहाय्यक असावेत. (मंत्र ९ ). 
(८) उतस्थाः न - रथीमहारथी प्रमाणे पराक्रम असून जीवन सुखी व्हावे. 
(मंत्र ९) 
(९) रुभावः देवाः - रुभू हे देवांचे कारागीर आहेत. ते सर्वांशी मिळून मिसळून राहतात. देवांचे ऐश्वर्य वाढवतात. या कार्यात स्वतः ला विलीन करतात. तसेच मानव कारागीरांनाही करावे. (मंत्र १४). 
(१०) वीर युक्त धनध - नाबरोबर तेजस्विता, बल, वीरता, अन्न, पुष्टी, उत्तम वाणी हवी आहे. (मन्त्र२०). 
(११) क्षपः उस्त्राः विश्वं आयुः परीवस्यन्तु - पूर्ण आयुष्य लाभावे, अपमृत्यू नको. (मन्त्र२१). 
(१२)(अस्मे)(आमच्यासाठी)--(वृत्त हत्ये ) घेरणाऱ्या शत्रूच्या नाशासाठी,(भरुहुतौ) आव्हानपुर्वक आरंभलेल्या युद्धात (पर्वतासः)पर्वताप्रमाणे स्थिर राहून (रुद्रः देवा)वीरभद्रा सारखे दिव्य वीर (इंद्र ज्येष्ठाः) आपल्या अधिपतिसह (अस्मान अवन्तु )आमचे रक्षण करोत. (मन्त्र २२) 
(१३) अत्यंत पौष्टिक समजला जाणारा सोमरस, (इंद्र) शूर राजा व सेनापती,(भग) भाग्यवान व धनवान (पूषा ) 
सर्वांच्या पोषणाची चिंता वाहणारे (मित्र ) मित्राप्रमाणे योग्य वेळी सहाय्यास धावून येणारे यांनामिळावा. श्रीसूक्त...पिबसोमं पिबंतु(मंत्र २३) 
१४) आम्हाला बल, तेज, पौरुष प्राप्त होवो व ते सतत वाढते राहो. आम्हाला दीर्घायुष्य लाभो. (मंत्र २३). 
(१५) गुंगू... वक्तृत्व शक्ती, (सरस्वती) विद्या व ज्ञान शक्ती (सोनोवाली) अन्नाद्वारे पोषण होऊन प्राप्त होणारी शक्ती, (रांका) दातृत्व शक्ती (वरुणानी) जीवनशक्ती, (इंद्राणी ) प्रभुत्व शक्ती या सर्व प्राप्त होवोत. (मंत्र ३७).. 

वर ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्यातून काही गोष्टी उठून दिसतात. 
(१) व्यक्तिगत अपेक्षा नाही. सर्वांच्या कल्याणाची मनीषा आहे. सोमरस सर्वाना मिळावा. 'सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मां काश्च्छित दुः खामाक भवेत' या वैदिक प्रार्थनेतील विचारच पुन्हा एकदा व्यक्त झाला आहे. 
(२)विश्वाच्या शिरोभागी राहण्याची ईच्छा आहे त्यासाठी अशा राष्ट्रातले लोक कसे असावेत याचे वर्णन १, ३, ४, ५, ८, १०, ११, १४, १५ या मंत्रात व्यक्त झाले आहेत व तसे बनण्याचा प्रयत्न आम्ही करणार असेही सूचित केले गेले आहे. 
(३) दुर्बलाचे मनोरथ कधीच सिद्धीस जात नाही, सामर्थ्याची पाठराखण असावीच लागते. इतरांवर आक्रमण व हल्ला करण्यासाठी नाही पण स्वसंरक्षणासाठी शस्त्र व शक्ती असावीच लागते. आपले सर्व देव ही याचसाठी शस्त्रसज्ज मानले गेले आहेत. म्हणूनच सेना, वीर, शस्त्रे वगैरेची अपेक्षा आहे. 
(४) समाजातील विविध वर्गांचाही विचार आहे. समाजधारणेसाठी सर्वांचीच आवश्यकता असते व त्या दृष्टीने सर्वांचे महत्व सारखेच असते हा समतेचा व समरसतेचा विचार शस्त्रसज्ज शूर सैनिक, कुशल कारागीर, कर्तव्यदक्ष सेनापती, धनिक यांच्या उल्लेखातून प्रकट होतो. 
(५) हे सर्व आहे पण परस्पर संबंध चांगले नसतील तर? म्हणून (मित्रयुज देवःन ) मित्रता करणाऱ्या देवांसारखे सहाय्यक असावेत. तरीही अहंकार अशा मैत्रीचा नाश करतो.

म्हणून.... 
(अ) सेनापती इतर शूर सैनिकांच्या सहकार्यानेच मोठीमोठी शौर्याची कृत्ये करण्यास व प्रबळ शत्रूचा नाश करण्यास समर्थ होतो. (यात सैनिकांच्या सहकार्याचे महत्व दाखवून दिले आहे.) तर अनेक शूर सैनिक सेनापतीच्या बुद्धीकौशल्याने चालवलेल्या योजनेतील आपापली कामे करण्यास तयार होतात. सेनापतीचे योजकत्व व नियोजन योग्य असावे लागते हे सुचवतानाच प्रत्येकाने योजनेनुसार आपापली कामे, इतरांच्या कामात ढवळाढवळ न करता व मी श्रेष्ठ हा भाव जागा न होऊ देता करायची आहेत असे स्पष्ट पणे दिग्दर्शित केले आहे व तरच 
(१) यश मिळते. 
(२) दोघांचेही बल वाढते. ही सूचना देऊन सहकार्याचे सामर्थ्य पटवून दिले आहे. (मंत्र २४) 

(ब) इतरांकडून प्राप्त सहकार्याबद्दल कृतज्ञता बुद्धी हवी याची जाणीव देण्यासाठी म्हटले आहे "हे वीरपुत्र तुला अनेक स्त्रियांनी (भगिनी, माता, शुश्रुषा करणाऱ्या स्त्रिया, दासी व.)वाढवले आहे. वेगवान नद्यांनी तुझे भरणपोषण केले आहे. तुला जीवन (पाणी)व अन्न प्रदान केले आहे. (तुझ्या आयुष्यात निसर्गानेही तुला बरेच काही दिले आहे.) तसेच देवांनी शत्रुनाश करणाऱ्या युद्धासाठी वाढवले आहे. (शिक्षकाची तुझ्या जीवनात महत्वाची भूमिका आहे व जीवनाचे ध्येय ही स्पष्ट आहे.) (मन्त्र२८)
 
(क) असा तयार झालेला वीर सर्वांचे रक्षण करेल व राष्ट्राचे कल्याण करेल.(येथे जीवनाच्या ध्येयाचा स्पष्ट निर्देश केला आहे) व्यक्तिजीवन राष्ट्रासाठी समर्पित असले पाहिजे.
 
(ड) (सद्याजा तःयज्ञ व्यामिमीत) जन्मा पासून यज्ञ करणारा अग्निः देवांना पुरोगाः अभवत देवांचा पुढारी बनला. ऋतस्य हेतुः अस्य ऋताची शाश्वत सत्याची प्रतिष्ठापना करणे हा त्याचा हेतू आहे. प्रादेशि वाणी त्याची वाणी उत्तम दिशा दाखवणारी आहे. (स्वतः ची ध्येय भावना इतरांच्यात संक्रमित करता येण्यासाठी प्रभावी वक्तृत्व,श्रोत्याला समजून घेण्याची वृत्ती असावी लागते. ध्येय भाव संक्रमित झाला तरच अनुयायी सर्वार्थाने काम करेल), स्व -आ-हा-कृतं हवि. त्यासाठी तो पुढारीही स्वतः सर्वस्व त्यागासाठी तयार आहे.(आधी केले मग सांगितले). देवाः अदन्तु देवांना खायला मिळो. (मंत्र ३०).
 
अग्नी स्वतः जळतो व प्रकाश देतो, म्हणून तो पुढारी आहे असा त्याग सिध्द पुढारी आहे म्हणून अनुयायी देव त्याच्या तोंडातून मिळेल त्यावर (याज्ञाशिष्टशीनहः ) संतुष्ट असतात. दोघांमध्ये परस्पर सहकार्य, परस्परांना समजून घेण्याची वृत्ति आहे. असे पुढारी व असे अनुयायीसमाजात असावेत. 

(ई)तरीही पुढाऱ्यासाठी, संघाध्यक्षासाठी व संघभावनेसाठी काही नियम सांगितले आहेतच. 
(१) संघाध्यक्ष ज्ञानी व कर्तबगार असावा. (अशाच माणसाची योजना त्या पदावर व्हावी. घराणेशाही नको.) 
(२) त्याने संघामध्येच राहावे. अनुयायांना सोडून राहू नये. (त्याच्या जीवनात पारदर्शकता असली पाहिजे. मी वेगळा, श्रेष्ठ हा भाव ना त्याच्या मनात असावा ना अनुयायांच्या मनात निर्माण व्हावा. पण आदरयुक्त आज्ञापालन सहज होईल असे वातावरण निर्माण व्हायला हवे. अतिपरीचायाद्वज्ञ होऊ नये. सर्वांशी सतत संपर्क व कर्तव्यभाव असावा. 
(३) त्याची आज्ञा उल्लंघली जाऊ नये. (संघाध्यक्ष कर्तबगार असेल,तर त्याचे विचार अनुभवसिद्ध व दूरगामी असतील. सर्वांनाच त्याची भूमिका समजेल असे नाही पण आज्ञा पालन व्हायला हवे.) 
(४) ऐक्याने वागावे. संघ शक्ती कलौ युगे हे लक्षात ठेवावे. संघटन हे नेहमीच सामर्थ्यशाली ठरते. 
(५) निर्णय. त्याच्या अनुमतीने व सर्वांच्या विचाराने व्हावेत. लोकशाहीत असेच असते. सर्वांचा विचार घेतला जातो. तरीही राष्ट्रपतीची सही व्हावी लागते. 
(६ ) त्याचे गुणगान इतरांना प्रेरणा देईल. गुणाची पारख सगळ्यांकडे असतेच असे नाही. ती सारखीच असते असेही नाही. संघाध्यक्षाचा व्यवहार जर राष्ट्रहिताला पोषक असेल तर तो लोकांच्या दृष्टीस आणून द्यावा लागेल.(प्रसिद्धी माध्यमे) (मंत्र ३८ ). 

(उ ) पूर्ण ब्रम्हचर्यानंतर विवाह व्हावा. मंत्र २९. योग्य शिक्षण व व्यक्तित्वनिर्माण झाल्यानंतरच गृहस्थाश्रम म्हणजेच समाजासाठी स्वकर्तव्य पालन, समाजकल्याणाचे चिंतन व व्यवहार यासाठी व्यक्ती अधिक उपयुक्त ठरेल. 

आतापर्यंत अपेक्षा व्यक्त झाली. व्यक्ती व समाज यांच्या परस्पर व्यवहारांचा सामाजिक विचार झाला. तरीही समाजनियंत्रणासाठी शासनसंस्था आवश्यक वाटू लागली. तसे प्रयोग झाले व त्याचे वर्णन मंत्र पुष्पांजलीत उमटले. 
मानवी जीवन विकासाचे टप्पे समाजशास्त्राच्या अभ्यासात आपण पाहतोच. एकेकटा रहाणारा माणूस संरक्षणाच्या दृष्टीने टोळ्या करत राहू लागला. स्वाभाविकच परस्परव्यवहारांसाठी काही नियम ठरले. अर्थातच हे नियम उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिक्षा अस्तित्वात आल्या. शिक्षा करण्याचा अधिकार कोणाचा हा विचार पुढे आला व अशी राज्यशास्त्राची सुरवात झाली. बदलती परिस्थिती, मानसिकता,आवश्यकता या नुसार त्यांत बदल होत गेला. 

भारतीय जीवनदृष्टीचा विचार करता व्यक्तीविकासासाठी जीवनाची रचना- चार आश्रम संकल्पना स्थापित झाली. समाजविकासासाठी चार पुरुषार्थाची रचना झाली. धर्म या पुरुषार्थाची अभ्युदय निश्रेयस - भौतिक व आध्यात्मिक प्रगती ही प्रमुख अंगे ठरली तशीच अर्थ - अर्थनीती व दंडनीती यावर भर दिला गेला. 

व्यक्तीविचारांच्या विकासासाठी व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्टी असा सोपान मांडला गेला. तर समाजजीवनात व्यक्ति, कुटुंब, समाज, राज्य, राष्ट्र, विश्व यांच्यात सुसूत्र संबंध निर्माण केला गेला. अथर्ववेदात यांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. "उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्रथम विवाहसंस्था, कुटुंबव्यवस्था निर्माण झाल्या. मग समाज व्यवस्थेसाठी सभा, समिती, आमंत्रणपरिषद निर्मिती झाली. सर्वांच्या विचाराने व सहमतीने नीतीनियम (आजचे कायदे ) तयार झाले. यांतून हळूहळू विविध प्रकारच्या शासनव्यवस्था, शासनपद्धती तयार झाल्या व तसे उल्लेख आपल्या(वाग्मयात) आढळतात. 

मंत्र पुष्पांजलीचा मंत्र ऐतरेय ब्राह्मणात आहे. यांत आपल्या पूर्वजांच्या राज्यशास्त्रपद्धतीचा जसा उल्लेख आहे तसाच निर्देश संहितांमध्येही आहे. यांत जनराज्याचे नांव प्रामुख्याने आढळते. ब्रम्हसुत्र व कल्पसूत्र यातही तसे वर्णन आहे. राजसूय, वाजपेय, अश्वमेध अशा विविध प्रकारचे यज्ञ राजे करीत. त्यानुसार राज्यपद्धतीचा अवलंब केला जाई.
 
त्रेतायुगात भेटीला आलेल्या भरताला रामाने राजा व शासनाविना माजणाऱ्या अंधाधुन्दीचे व तिच्या परिणामांचे वर्णन करून सांगितलेले आढळते. तर द्वापार युगात शरपंजरी पडलेल्या भीष्मांनी युधिष्ठीराला वैराज्यवाद व राज्योत्पत्ती संबंधी माहिती दिलेली दिसते. आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रातही राज्यशासनाच्या विविध पैलूंचे व धोरणांचे वर्णन आहे. 

आजच्या राज्यशास्त्रातल्या प्रचलित संकल्पनाही आपल्या प्राचीन राजधर्मात आढळतात. धर्माचा अर्थ धारयति इति धर्मः असा असून सर्वांच्या सुखशांतीचा विचार करतांना आवश्यक कर्तव्यांचा निर्देश केला गेला व राजधर्म- राजाचे कर्तव्य व त्यासाठी राजनीती अस्तित्वात आली. आज त्यालाच आपण राज्यशास्त्र म्हणतो. आजच्या स्वातंत्र्य या शब्दाऐवजी 'स्वाधीनता' हा शब्द होता. 'स्व' संबंधी उपनिषदात म्हटले आहे,"अनुरेणीयाम महतो माहियान " म्हणजे 'स्व' हा रेणु पेक्षा हीं लहान आहे. तर 'मोठेपण' या शब्दाने सूचित केल्या जाणाऱ्या अर्थापेक्षाही मोठा आहे. म्हणजेच स्वाधीनता म्हणजेच बंधनयुक्त स्वाधीनता. 

आजच्या कम्युनिझमच्या समता संकल्पनेपेक्षा आमची समता संकल्पना विशाल आहे. समानोमंत्र, समितिसमानी, ( समान मस्तु वो मनः, समान हृदयानि वः)" आपले व्यक्तिगत प्रगटीकरण व सामुहिक निर्णय समान असोत, आपली मने व हृदय समान कार्ये करोत." 
एव्हढ्या विवेचना नंतर आपण मंत्र पुष्पांजलीत काय वर्णिले आहे, ते पाहू .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा