बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

नमस्कार

"हस्तांदोलन करा व लढत सुरु करा " हा पंचांचा मुष्टियोद्ध्यांना सल्ला असतो. "मग आवळलेल्या मुठींनी एकमेकांवर प्रहार करा. "खरे तर बाहेरही पुष्कळदा हस्तांदोलन हे थोडे बहुत अस्वस्थ करणारे असू शकते. भारत वा आशियाई देशातून कांही दिवसांच्या वास्तव्यानंतर जेव्हा पाश्चिमात्य राष्ट्रांत कोणी जातो तेव्हा, विशेषत: अनोळखी व्यक्तीचा, एकाएकी समोर आलेला हात त्याला भयकारक, अनिष्टसूचक वाटू शकतो. थोड्याच काळात हस्तांदोलनाचे भयकारक दर्शन नष्ट होउन तो परिस्थितीशी जुळवून घेतो.

कदाचित त्या क्षणाची भयकारकता ही हस्तांदोलनाच्या इतिहासातून उत्पन्न झाली असेल. मानववंशशास्त्रज्ञांच्या मतानुसार ही पध्दत सरदारशाहीच्या काळात मध्य युरोपमध्ये सुरु झाली. फारच थोडे जण शूर व उदार होते. पण बव्हंशी आपल्या प्रतिस्पर्ध्यासमोर छुप्या शस्त्रासह येत व योग्य अंतरावर आल्यावर सुरा वा तलवारीने त्याला मारत.

शत्रूच्या दुष्ट हेतुची भीती वाटत नाही असे दाखवण्यासाठी सरदार आपला वरवर मोकळा हात समोरच्याच्या पुढे करीत. ही क्रिया विश्वासाची हमीदर्शक असे. जणू काही सुचवत असे की मी निशस्त्र आहे. आपण सुरक्षितपणे भेटू या. नंतर काही काळानंतर हावभावातील घातकता कमी झाली व एकमेकांना भेटण्याची ती खूण झाली.

पूर्व युरोपमध्ये व अरब राष्ट्रांत आलिंगन देणे वा गालाचे चुंबन घेण्याची प्रथा आहे. जपानमध्ये खाली वाकून आदर दर्शवतात तर हवाई राष्ट्रात 'होनी'ची प्रथा आहे. होनी म्हणजे नाकाजवळ नाक न्यायचे व श्वासात ( जो प्राण वा जीव आहे) सहभागी व्हायचे.

हिंदू मात्र 'नमस्ते'ला प्राधान्य देतात. दोन्ही जोडलेले हात हृदयाशी धरून मस्तक नमवून नमस्ते म्हणावयाचे. नमस्ते म्हणजे एक मंत्र व एक मुद्रा. प्रार्थनेसह हातांची स्थिती म्हणजे मुद्रा -अंजली. (मूळ धातू अंज- भूषवणे, आदर दर्शवणे, सुशोभन करणे)

एकत्र जोडलेले हात द्वैतातून अद्वैत सुचवतात, आत्मा व भौतिक ह्यांना एकत्र आणतात. व्यक्तीची आत्म्याशी ओळख घडवतात. उजवा हात आपल्यातील दैवी गुण तर डावा हात भौतिक स्वभाव सुचवतात.
नमस- अर्थ -नमणे, वंदन करणे, सादर प्रणाम करणे.
नम- नम्रतापूर्वक शरण जाणे, शांत होणे.
ते- तुला, तुम्हाला
नमस्ते- मी तुम्हाला वंदन करतो. परस्परांना भेटण्याची कृती म्हणजे नमस्कार.
नमस्ते ही जे जे भारतीय त्याची प्रचीती आणून देणारी प्रतिमा आहे. खरे तर प्रवासी पुस्तिका, पत्रक, दिनदर्शिका, जाहिरात ह्या सर्वावर जोडलेल्या हाताची प्रतिमा असावी. त्यातून भारताची आतिथ्यशीलता, सभ्यता, अध्यात्मिकता व दयाळू वृत्ती प्रतिबिंबित होईल.

नमस्काराबाबत प्रगाढ पूज्यबुध्दी दर्शविण्यासाठी काहीवेळा जोडलेल्या हाताची बोटे कपाळाच्या मध्यभागी टेकवतात, जो भाग अध्यात्मात तिसरा डोळा मानला जातो.

तिसरा प्रकार म्हणजे जोडलेले हात डोक्यावर ठेवणे. ब्रम्हरंध्रावर जाणीवेला केंद्रित करण्यासाठी हा प्रकार, फक्त देव किंवा सद्गुरुना वंदन करताना उपयोजितात.
छोट्या कृतीतून आपल्या जीवनावश्यक संकल्पना व्यक्तिगतरित्या साकार होत असल्याने, प्रत्येक देश व वंश यांच्या दररोजच्या जीवनातील सांस्कृतिक पध्दती व रीतीभाती, त्यांच्या नैसर्गिक, भावनिक संकल्पना स्पष्ट करतात हे मोठे मौजेचे आहे. उदाहरणार्थ एकच काम करण्यासाठी जपानी व अमेरिकन हत्यार निर्माता वेगवेगळी कृती करतात. लाकूड कापणारी करवत अमेरिकन अशी हलवतो की ती शरीरापासून दूर असताना कापण्याचे काम करते तर जपानी ती करवत स्वत:कडे ओढत असताना कापण्याचे काम होते. छोटी कृती पण फरक मोठा.

अमेरिकन करवत वाकल्यानंतर मोठी शक्ती निर्माण करेल तर जपानी करवत स्वत:वरचे सुताराचे नियंत्रण, कामातील सौंदर्य अगदी थोड्या श्रमात साध्य करेल. दोन्ही करवतीना वैश्विक हत्यारांच्या पेटीत स्थान आहे पण प्रत्येक ( हस्तांदोलन व नमस्काराप्रमाणेच ) मानवाचे त्या वस्तूशी असलेल्या नात्याबद्दल त्यांच्या त्यांच्या संकल्पना स्पष्ट करेल.

पौर्वात्य व पाश्चात्य संस्कृती या स्वागत प्रकारात सामावलेल्या आहेत. हस्तांदोलन 'दुसऱ्याला' भेटण्यासाठी आडवे क्षितिजसमांतर पध्दतीचे असते तर नमस्कार हा लंबरेषात्मक असून अद्वैत दर्शवतो. हस्तांदोलन इतरांशी बरोबरी दर्शवते. स्वत:चे सामर्थ्य वा दौर्बल्य, आक्रमकता वा सहनशीलता व्यक्त करते, भौतिकता स्पष्ट करते.

आपण सर्वशक्तिमान परमेश्वराला, पवित्र व्यक्तीला, पवित्र स्थानालासुध्दा नमस्कार करतो. पवित्रता जाणण्याची आपली आंतरिक शक्ती त्यात प्रतिबिंबित होते. सर्व जीव दैवी आहेत, ही मानसिकता जाणवून देते. परमात्मा सर्वत्र भरलेला आहे व प्रत्येक प्राणिमात्रात त्याचा अंश आहे हा भाव व्यक्त होतो. जणू आपण व्यक्त करत असतो,"आपणां दोघांमधील दैवत्व मला दिसते आहे व त्याच्यापुढे मी लीन होत आहे".
शिवाय सार्वजनिक देवघेवीसाठी तो फारच चांगला आहे. एक राजकारणी, एक नट, एक वक्ता एकाच नमस्कारातून हजारो लोकांना एकाच वेळी भेटू शकतो व तेही त्याला प्रतिसाद देतात.

अंजली मुद्रा हे एक सोपे योगासन आहे, ज्याच्यामुळे शरीराच्या सर्व शक्ती संतुलित व सुसंवादित राहतात, केंद्रीभूत होतात, अंतर्भागात जमतात व मानसिक संरक्षण करतात. आपल्या दैवी जागृतीशी आपल्या आंतरशक्तीशी निगडीत ठेवतात.

सर्व सृष्टी पवित्र व दैवी आहे ही जाणीव जागृत होते. समोरच्यातील दैवी अंशाचा सन्मान व पूजन करते. परस्परसंबंध मृदू करते. मैत्री व दया जागृत करते. आभार व्यक्त करते. अहंभाव, स्वकेंद्रितता नष्ट करते. स्वसामर्थ्य संरक्षून पावित्र्य निर्माण करते.
-सुशील अभ्यंकर


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा